तेलतुंबडेंचा योगायोग
डॉ. आनंद तेलतुंबडे हे भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर पुढे आलेल्या प्रकाश आंबेडकर यांचे नातेवाईक. आनंद तेलतुंबडेंच्या मते गांधीवाद आणि आंबेडकरवाद काही कामाचा नाही, तर मार्क्सवाद आता उपयोगी आहे. काय म्हणावे याला? दलित स्कॉलर मिरवायचे आणि ज्या बाबासाहेबांनी कोटी कुळे उद्धरली, त्या बाबासाहेबांचा विचार मात्र नाकारायचा. आनंद तेलतुंबडे बाबासाहेबांना विसरले आहेत. त्यांनी बेधडकपणे तोंड वर करून सांगितले होते की, “बाबासाहेब काही विचारवंत नव्हते, खरे विचारवंत मार्क्सच.” असो. आनंद तेलतुंबडे यांच्या आयुष्यात विलक्षण योगायोग आहेत हे मात्र नक्की. त्यांचे माओवाद्यांशी काही संबंध नाहीत. मात्र, अनुराधा गांधी या माओवाद्यांशी संबंधित असलेल्या महिलेच्या संस्थेसंदर्भात त्यांचे नाते जगजाहीर आहे. कोरेगाव-भीमा घटनेशी त्यांचा काही संबंध नाही, असे ते म्हणतात. मात्र, त्यांच्यावरील आरोप मागे घ्यावेत, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवणारी प्रमुख सहभागी संस्था आहे - आंबेडकर इंटरनॅशनल मिशन - एआयएम. कोरेगाव-भीमाच्या घटनेनंतर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक व्हावी, यासाठी विदेशामध्ये आंदोलन करण्यात हीच संस्था पुढे होती. भारतामध्ये अनुसूचित जाती-जमीतींवर अत्याचार होतो, हे खोटेनाटे सांगण्याचा कांगावाच होता तो. आश्चर्य आहे, आनंद यांचा भीमा-कोरेगावशी काही संबंध नाही. मात्र, भीमा-कोरेगावसंबंधी देशाची प्रतिमा विदेशामध्ये मलिन करणाऱ्या या संस्थांना आनंद यांच्या सुटकेबद्दल भारी आस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात काम करणाऱ्या काही संस्था दिसतात. या पार्श्वभूमीवर तेलतुंबडेवरील आरोप मागे घ्यावेत, यासाठी स्वारस्य दाखवलेल्या संस्थांना आनंद तेलतुंबडेमध्ये स्वारस्य का आहे? जर वंचितांच्या हक्कांसाठी या संस्था काम करतात; तर त्यांच्या मते, आनंद तेलतुंबडेची वंचितता काय आहे, हेसुद्धा तपासायला हवे. भारतातल्या जातीप्रश्नाबरोबरच या संस्थांची जगभरातला दहशतवाद, वंशभेद, वर्णभेद यावर काय भूमिका आहे, हेही पाहणे गरजेचे आहे. कदाचित यातूनच आनंद तेलतुंबडे आणि त्यांच्यासारख्या इतर कित्येक विचारवंतांच्या आयुष्याचे योगायोग कळू शकतील.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/