तर राजाचे असे झाले...
सो चुहें खा के बिल्ली.. किंवा लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, कोल्ह्याला द्राक्षे आंबट या अशा नकारात्मक म्हणींना प्रत्यक्षात जगणे सोपे नाही. पण, सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत लष्कराच्या भाकऱ्या भाजत जगणे महाराष्ट्रातले एक व्यंगचित्रकार करत असतात. नाक खाजवून खर्जातल्या आवाजात ‘आयला-मायला’ शब्द उच्चारत नकला करणे, हासुद्धा त्यांचा जुना छंद. फारच छंदिष्ट. या कुंचलाधारी राजला कधी काय दिसेल, वाटेल याचा नेम नाही. राजाचा बेभरवशाचा नेम लोकांना माहिती झाल्यामुळे जेव्हा ‘राजाला साथ द्या,’ असा राजा म्हणाला, तेव्हा नेमके लोकांनी राजाला साथ न देता ‘सात’च दिले. पण, राजा बधला नाही की थांबला नाही. तोंडाची वायफळ टकळी चालवायचा वसा त्याने टाकला नाही. आता काही नादान लोक म्हणतील की, काय झालं न वसा टाकायला? राजा कितीतरी मुद्दे उचलून अर्धवट टाकतोच ना? लोक काहीही म्हणाले तरी ‘ब्लू प्रिंट’, ‘तोडपाणी’, ‘खळ्ळ्खट्याक्’ वगैरे शब्द संकल्पना मांडणी तसेच केलेली, न केलेली कार्यवाही याचे श्रेय राजाचेच! असते एकेकाचे नशीब. पण, नशीब असतानाही कमनशिबी बनण्याचे ग्रेट क्रेडिट कुणाला द्यायचे झाले तर राजालाच द्यावे लागेल. मराठीचा मुद्दा उपस्थित करत राजाने दुकानाच्या पाट्या बदलल्या. रातोरात राजा मशहूर झाला. पण नंतर कळले की तोडपाणी, कमिशनच्या चक्रामध्ये खळ्ळ्खट्याक् होऊन शहरातल्या मराठी टक्क्यांची पाटी कोरीच राहिली. (हे खळ्ळ्खट्याक् बहुधा प्रत्युत्तर न देऊ शकणाऱ्या निर्बलांसोबतच होत राहिले.) तरीही पहिल्याच निवडणुकीमध्ये राज विजयी झाला. त्यावेळी लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला, यापेक्षा आपण आपल्याच रक्ताच्या नात्याला कसे नमवले, याचा राक्षसी आनंद राजा लपवू शकला नाही. ‘अपून ने एकीच मारा लेकीन सॉलिड मारा’ची दर्पोक्ती राजाने केली. मात्र, त्यानंतर जनतेनेच मतपेटीतून राजाला सॉलिड नकार दिला. मग भाऊबंदकीचा विशेष प्रयोग रंगविण्यात आणि टाळ्या-बिळ्या मारण्यात राजा वेळ काढू लागला. गती नाही त्यामुळे राजाची मती खुंटली. याच मतीने राजाचे वाट्टोळे झाले. राजाचे दैव देते आणि कर्म नेते नाही तर दैव देते, पण अर्थहीन केलेली फुकटची वटवट सर्वच नेते असे झाले. राजाचे कसे झाले, तर राजाचे असे झाले!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat