जशास तशा प्रत्युत्तराची मोदीनीती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019   
Total Views |

 


 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके दमदार निर्णय घेऊ शकले, कारण त्यांच्या मागे लोकसभेमध्ये एकजिनसी बहुमत आहे. त्यांच्या धोरणामागे इथली जनता खंबीरपणे उभी आहे. पण, त्याचबरोबर मोदी सरकारने ज्या खेळी खेळल्या आहेत, त्यांनाही दाद द्यावी लागेल.
 

दि. २६ फेब्रुवारी, २०१९ हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल. आपण सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत, ही आपल्यासाठी परमभाग्याची गोष्ट आहे. १९७१ नंतर पहिल्यांदाच म्हणजे जवळजवळ ४८ वर्षांनंतर भारताने मनामध्ये कोणताही संदेह न बाळगता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये विमाने नेऊन तेथील काही ठिकाणांवरती जोरदार हल्ले चढवले. अगदी १९९९च्या कारगिल युद्धाच्या प्रसंगीसुद्धा ‘नियंत्रण रेषा न ओलांडता कारगिल परत ताब्यात घ्या,’ असे बंधन लष्करावर तत्कालीन वाजपेयी सरकारने घातले होते. आजच्या हल्ल्यासाठी मात्र मोदी सरकारने सैन्याला पूर्ण सवलत असल्याचे नि:संदिग्धपणे जाहीररीत्या सांगितले होते. १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानप्रणित शक्तींनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या काफिल्यावरती जो निर्घृण हल्ला चढवला, त्यामध्ये देशाचे ४० जवान कामी आले. यानंतर देशभरात एकच आक्रोश उठला. देशप्रेमी जनता पुलवामा हल्ल्याला सरकारने प्रत्युत्तर द्यावे म्हणून आग्रही होती. इतक्या व्यापक प्रमाणावरील जनमताच्या पाठिंब्यानंतर आणि स्वभावत:च मोदींनी अगदी २०१४ च्या प्रचार मोहिमेमध्ये जाहीर केल्यानुसार पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळणार, याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नव्हतीच. अगदी पाकिस्तानच्या मनामध्येही संदेह नव्हता. हल्ला कुठे होणार, कधी होणार, कशा स्वरूपाचा असेल, याविषयी मात्र काहीच माहिती उपलब्ध नव्हती. पण, अशामुळेच गेल्या काही दिवसांत पाकिस्तान रडकुंडीला आल्याप्रमाणे थेट युद्धाची तयारी करू लागला असल्याच्या बातम्या थडकत होत्या. मोदींनी २०१४ पासून पाकिस्तानशी कडक धोरण अवलंबले होते. “दहशतवादी हल्ले होत असतील, तर पाकिस्तानशी चर्चा करू शकत नाही. कारण, स्फोटांच्या आवाजात चर्चा ऐकूच येत नाही,” असे ते वारंवार सांगत असूनही पाकिस्तानने आपली वाकडी पावले कधी सुधारली नाहीत. उलटपक्षी भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ ठरेल, अशा पद्धतीने तो प्रतिक्रिया देत होता आणि इथल्या काही राजकारण्यांना हाताशी धरून आपली प्यादी पुढे सरकवत होता.

 

पठाणकोट आणि उरी हे दोन मोठे हल्ले मोदींच्या कारकिर्दीमध्ये झाले आणि मोदी सरकारने त्याला प्रत्युत्तर दिले. पण, पाकिस्तानने मात्र उरीनंतर भारत सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची चेष्टामस्करी करण्याचे, असा काही हल्ला झालाच नाही, असेल तर व्हिडिओ का नाही दाखवत, अशी मुक्ताफळे उधळली. मुख्य म्हणजे, अशाप्रकारे सैनिकी व्हिडिओ प्रसिद्ध केले, तर सैन्याची अनेक गुपिते शत्रूला कळू शकतात, हे माहिती असूनसुद्धा इथले मोदीविरोधक पाकिस्तान जे प्रश्न रावळपिंडीमध्ये विचारत होता, ते ते प्रश्न इथे मोदी सरकारला दिल्लीमध्ये विचारत होते. या मोदी विरोधकांमध्ये जसे राजकीय प्रतिस्पर्धी होते, तसेच सामील होती इथली सेक्युलर बुद्धिवंत लेखक-कलाकार पत्रकार मंडळी. या सर्वांनी मिळून केलेल्या गलक्याने सामान्य जनता बिथरेल आणि मोदी सरकार आपण पाकिस्तानवर हल्ला केल्याच्या आपल्याला थापा मारत आहे, प्रत्यक्षात तर हे सरकार नेभळट आहे आणि ते असे काही करूच शकत नाही, असा हा सूर जनतेला मोदींपासून दूर नेईल, या भ्रमामध्ये ही मंडळी होती. प्रत्यक्षात झाले ते उलटेच! जितका सेक्युलर मंडळींनी जोरात गलका केला, तितक्याच जोमाने जनतेचा मोदी सरकारने केलेल्या हल्ल्यावरती अधिकाधिक विश्वास बसत गेला. हे वास्तव स्वीकारण्यासाठी काँग्रेसप्रणित विरोधकांना उरीवर काढण्यात आलेल्या चित्रपटाच्या यशाने डोळे दीपवून घ्यावे लागले. अशा प्रकारे आधीच भाजलेल्या तोंडाची हे मंडळी डोळे एकदाचे उघडल्यामुळे आजच्या हल्ल्याचे पुरावे काही मागत बसली नाहीत. त्यांनी खुल्या दिलाने मोदी सरकारचे नव्हे, तर सैन्याचे कौतुक केले. सैन्याने केलेल्या कामगिरीला तोडच नाही, पण त्यांच्या मागे उभे राहण्याची राजकीय इच्छाशक्ती मोदींनी दाखवली. त्याबाबत काँग्रेस मूग गिळून गप्पगार बसली आहे, हे चाणाक्ष सामान्य जनतेच्या नजरेतून सुटेल का?

 

जेव्हा जेव्हा भारतावर परचक्र आले आणि काँग्रेस सरकार सत्तेमध्ये होते, तेव्हा तेव्हा येथील विरोधी पक्षाने सरकारबरोबर सहकार्य करण्याचे धोरण अवलंबले होते. पण, मोदी सरकारच्या भाग्यामध्ये असा देशप्रेमी विचारी विरोधी पक्ष नाही. बाहेरचे काय विरोध करतात ते सोडा, इथे अंतर्गत विरोधक काय म्हणतील आणि त्यांचा मुकाबला कसा करायचा, याचा सरकारला आज विचार करावा लागत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. उदा. आजच्याच हल्ल्यानंतर जेव्हा पाकिस्तान सरकारनेच आपल्या बालाकोट वरती भारतीय विमानांनी हल्ला केला, असे जाहीर केले तेव्हा इथले विरोधक आणि सेक्युलर पत्रकार मंडळी हे बालाकोट नेमके कोणते म्हणून चर्चा करत बसले होते. पूँछ जवळचे बालाकोट असेल, तर सरकारने फार काही मर्दुमकी गाजवली नाही एवढेच म्हणायचे त्यांनी बाकी ठेवले होते. या गँगमध्ये अग्रेसर होते, ते जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला. जसजसे हे स्पष्ट होऊ लागले की, हे बालाकोट पूँछ जवळचे नसून पाकिस्तानच्या खैबरपख्तुनख्वामधील आहे, तेव्हा मात्र यांची बोबडी वळली. मोदी सरकारच्या द्वेषाने त्यांना इतके पछाडले आहे की, अशा काहीतरी शंका उपस्थित केल्याने इथल्याच जनतेसमोर आपली नाचक्की होत आहे हेदेखील ते विसरून गेले आहेत. पाकिस्तान या हल्ल्याने गडबडून गेले नाही, तरच नवल. भारताची एकूण १२ ‘मिराज २०००’ विमाने बिनदिक्कत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसतात आणि आपल्याला हव्या त्या लक्ष्यावरती बॉम्बफेक करून सुखरूप निघून जातात आणि बलाढ्य पाकिस्तानचे वायुदल त्यांना साधे हटकू शकत नाही, हे विदारक चित्र आता पाकिस्तानी जनतेसमोर उघड झाले आहे. ‘मिराज २०००’ या विमानामधून अणुहल्ले घडवता येतात, हीच एक बाब पाकिस्तानला झोंबणारी आहे. अशी विमाने आपल्या हद्दीमध्ये येत असतील, तर आपण कितपत सुरक्षित आहोत असा विचार तिथली सामान्य जनता केल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे भारताने पाकला दमदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान तात्काळ आपली अण्वस्त्री डागेल आणि आण्विक युद्धाला प्रारंभ होईल, असे एक चित्र या दगाबाज सेक्युलरांनी आपल्यासमोर रंगवले होते आणि आण्विक युद्ध टाळायचे, तर उभयतांमधील चर्चेमधूनच प्रश्न सोडवता येईल. त्यासाठी चढाई हा पर्याय नाहीच, असे कंठरवाने आपल्याला सांगितले जात होते. अगदी ‘२६/११’च्या मुंबईवरील हल्ल्यानंतरसुद्धा आम्हाला हेच ऐकवले गेले होते. त्याप्रसंगी जनतेच्या मनामध्ये हेच होते की, भारताने दमदार उत्तर द्यावे. सैन्याने तर तशी तयारी केली होती आणि सरकारकडे परवानगी मागितली होती. पण समोर पाकिस्तान आहे म्हटल्यावर सेक्युलरांची धोतरे सुटतात हेच खरे. मग ११ जुलैचा मुंबई लोकलवरील हल्ला असो की २६/११चा, ‘सलाम मुंबई, तुमच्या संयमाला सलाम’ असे एकदा ऐकवायचे आणि ठंडा कारभार डोळे मिटून करत राहायचे आणि पाकिस्तान मारेल तेवढ्या थपडा खात राहायचे हेच ज्यांचे पाकिस्तान धोरण होते, तेच आजवर गेले पाच वर्षे मोदींची मर्दुमकी कुठे आहे हे भिंग लावून शोधत बसले होते. आज त्यांच्या भिंगाच्याच नव्हे, तर डोळ्यातील भिंगाच्याही ठिकऱ्या उडाल्या आहेत. ही लाजिरवाणी परिस्थिती त्यांना धड लपवून ठेवावी एवढेही भान उरलेले नाही.

 

इतके दमदार निर्णय मोदी घेऊ शकले. कारण, त्यांच्या मागे लोकसभेमध्ये एकजिनसी बहुमत आहे. त्यांच्या धोरणामागे इथली जनता खंबीरपणे उभी आहे. पण, त्याचबरोबर मोदी सरकारने ज्या खेळी खेळल्या आहेत, त्यांनाही दाद द्यावी लागते. १४ फेब्रुवारीनंतर पहिला आठवडा मोदी सरकारने जगातील महत्त्वाच्या देशांमधून आपल्या भूमिकेसाठी पाठिंबा मिळवण्याचे अवघड काम पूर्ण केले. यानंतर पाळी आली ती राजकीय खेळींची. यामध्ये पाकिस्तानचे हे बिरूद काढून घेणे पाकिस्तानी मालावरती २०० टक्के सीमा शुल्क आकारणे आणि ‘सिंधू जलवाटप करारा’वर तंतोतंत पाळत भारताच्या वाटेचा एकही थेंब पाकिस्तानला मिळू देणार नाही, ही घोषणा करणे यातून वातावरण निर्मिती करण्यात आली. आजच्या हल्ल्यानंतर जगामधल्या एकाही देशाने भारताचा निषेध केलेला नाही. किंबहुना भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे हे सूत्र सर्व जगाने मान्य केल्याचे दृश्य दिसत आहे. हे यश इतके मोठे आहे की, अगदी चीनने सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने एकही विधान केल्याचे दिसत नाही. ही मोदी सरकारची भरीव कामगिरी आहे.

 

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तर काय दिसते? पंतप्रधान इमरान खान आज खूश असतील. पाकिस्तानी लष्कराची जेवढी बेअब्रू होईल, तितके तिथल्या पंतप्रधानांचे राजकीय महत्त्व वाढेल, हे काय इमरानला समजत नाही काय? वरकरणी काहीही बोलले गेले तरी, हा संघर्ष तिथे तीव्रच राहणार. ओसामा बिन लादेन मारला गेला, तेव्हादेखील अमेरिकेची विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसली आणि ओसामाला मारून बिनदिक्कत बाहेर पडली. तेव्हा अमेरिकेला तेथील सैन्याची छुपी संमती होती असे राजरोसपणे म्हटले जाऊ लागले. क्षणभर विचार करा की, स्वत:चे स्थान वाचवण्यासाठी आजसुद्धा तेथील काही जनरल्सनी भारतीय विमानांना प्रत्युत्तर देण्याचे हटकण्याचे टाळले नसेलच, असे आपण खात्रीशीररीत्या म्हणू शकतो काय? पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळातच नव्हे, तर त्याच्या आयएसआय आणि सैन्यामध्येसुद्धा जबरदस्त फूट असल्याच्या बातम्या गेले काही वर्षे बघायला मिळत होत्या. ही फूट नेमकी कोणते स्वरूप धारण करेल, याविषयी आता आपण केवळ अंदाज बांधू शकतो.

 
सर्वथा लाज गेल्यानंतर आता पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न बुधवारी करुन बघितला. पण, चढाई करून युद्ध छेडले जाईल का, याविषयी सध्या कयास बांधले जात आहेत. मोदींनी बाजी पलटवली आहे. ‘Dialogue is the only way forward’ हे पालुपद आता पाकिस्तानला घोळवावे लागणार आहे. शहाणा असेल, तर पाकिस्तान याला उत्तर म्हणून थोडेफार दहशतवादी हल्ले करून गप्प बसेल आणि मूर्ख असेल, तर युद्ध पुढे वाढवेल. ऊठसूट आण्विक युद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने आतापर्यंत असे का केलेले नाही, याचे उत्तर त्यांना स्वत:ला माहिती नाही काय? त्याचे उत्तर अटलजींनीच त्यांना ऐकवले होते. “अणुबॉम्ब टाकून तुम्ही भारताचा १० टक्के प्रदेश उद्ध्वस्त कराल, पण नेमके काय झाले बघण्यासाठी पृथ्वीतळावरती पाकिस्तान शिल्लक राहणार नाही,” असे उत्तर वाजपेयींनी दिले होते, त्याची आज आठवण येते. हा एक आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि होणाऱ्या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. आजपर्यंत भारताला भवानीमातेचाच आशीर्वाद होता आणि मोदींनी ‘जय भवानी’ म्हटलेच आहे. कारण, त्याच आध्यात्मिक बळावरती त्यांनी आपले लक्ष्य ठरवले आहे, हे निश्चित.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@