भाजपविरोधी मतांची फाटाफूट?
उत्तर प्रदेशात आजही मुलायमसिंह यांना राजकीय स्थान आहे, त्यांच्या शब्दाला वजन आहे. पक्षाचे संस्थापक म्हणून त्यांना मानणारा एक मोठा कार्यकर्तावर्ग आहे. त्यामुळे अखिलेश यांची भलतीच गोची झाली आहे. तशातच, सपच्या पायात पाय अडकविल्याने बसपच्या मायावतींचीही कोंडी झाली आहे. पुन्हा, अखिलेश हे मुलायम यांच्या नावानेच मतं मागणार असल्याने मायावतींना मुलायम यांच्याविरोधात थेट काही बोलणंही परवडणारं नाही. “कुणाला उमेदवारी हवी असेल, तर माझ्याकडे या,” असं सांगून मुलायम यांनी आपल्या मुलाची आणखी अडचण केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या सगळ्या गोंधळाचे परिणाम सपला भोगावे लागणार, हे आताच दिसत आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आणि त्याचे परिणामही तितकेच अनाकलनीय असू शकतात, याचा प्रत्ययच उत्तर प्रदेशात घडणाऱ्या या घडामोडींतून पाहायला मिळत आहे. काँग्रेस भव्य महाआघाडीची स्वप्नं बघत असताना सप आणि बसपने काँग्रेसला झटकून टाकत स्वतंत्रपणे आघाडी केली. यामुळे उत्तर प्रदेशात आधीच केविलवाण्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसची आणखी बिकट अवस्था झाली. दुसरीकडे, बलाढ्य भाजपपुढे सप-बसप आघाडीमुळे फार मोठं संकट उभं राहिल्याचं चित्र रंगवण्यात आलं. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच दिसत आहे. काँग्रेसने प्रियांका गांधींना राजकारणात उतरवून लढतीत आणखी रंगत आणली. प्रत्यक्षात किती ते स्पष्ट होत नसलं तरी कागदावर आकडेमोड करताना तरी प्रियांकांच्या एंट्रीमुळे काँग्रेसची बाजू थोडी अधिक भक्कम झाली आहे, असं समजायला वाव आहे. त्यामुळे ‘भाजपविरोधी’ अशी वाटणारी ही लढत प्रत्यक्षात तिरंगी बनली आहे. त्यात पुन्हा, सप-बसप आघाडीतील या साऱ्या सावळ्या गोंधळामुळे ही आघाडीही संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच अपशकुनांचा सामना करत आहे. दुसरीकडे, भाजपने विजयाचं एकमेव उद्दिष्ट समोर ठेऊन निर्धारपूर्वक वाटचाल सुरू ठेवली आहे आणि त्यात त्यांना हळूहळू यशही मिळताना दिसत आहे. त्यामुळे मुळातच कमकुवत असलेली काँग्रेस, त्यात प्रियांकांनी आणलेली जान, सप-बसपच्या आघाडीमुळे दोन पक्षांत होत असलेली अंतर्गत धुसफूस, मुलायम यांचं अनाकलनीय वागणं इ. मुळे भाजपविरोधी मतांचं मोठं विभाजन होण्याची शक्यता दिसत असून याचा फायदा अर्थातच भाजपला मिळणार, हे स्पष्ट आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat