ठाणे : शिक्षण, आरोग्य, स्वयं रोजगार, सामाजिक समरसता, जागरण अशा विविध क्षेत्रात संघ ९० वर्षे काम करीत आहे. हे काम समाज पहात आहे. भारतातील विविधतेत विभिन्नता नाही तर विशेषता नांदते. या विविधतेतील एकता टिकवण्याचे काम संघ करीत आहे. शाखांच्या माध्यमातुन स्वयंसेवक समाजात असलेल्या नवचेतनांचा प्रवाह समाजापर्यंत नेतो असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे क्षेत्रीय प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी येथे केले. ठाणे शहर परिसरातील स्वयंसेवकांचे दोन दिवशीय नवचेतना शिबीर नुकतेच संपन्न झाले. त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात बापट हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
राष्ट्रध्वज, भारतीय घटना यांच्यासह नवभारताच्या विविध सन्मानचिन्हांचा गौरव साधण्याचे काम संघ करीत आहे. लोकतांत्रिक प्रक्रिया सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न करीत असतांना शाखा, संस्कार आणि व्यक्ती निर्माणाच्या माध्यमातुन भारत सबल, संपन्न, सुजलाम, सुफलाम, सुरक्षित, मार्गदर्शक व्हावा यासाठी संघ कार्यरत आहे. समाजातील मनातील संकल्प, आकांक्षा, चित्र शाखांच्या माध्यमातुन शाखेत प्रतित होत असतांत त्याला विचारात घेऊन कार्यविस्तार संघात घडत असतो. त्यामुळे एकप्रकारे शाखेच्या माध्यमातुन नवचेतनांचा प्रवाह समाजपर्यंत नेण्याचे काम संघ करत आहे अशा प्रकारे संघकामाचे विष्लेषण प्रमोद बापट यांनी शिबिराच्या समारोप प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर संघचालक अरविंद जोशी व शिबीर कार्यवाह मुकुंद जोशी उपस्थित होते.
गतवर्षी हिंदु चेतना संगमातुन निर्माण झालेल्या उर्जेला गती देण्यासाठी या नवचेतना शिबीराचे आयोजन केले गेले. आपल्या १ लाख ६० हजाराहुन अधिक सेवा कार्याच्या माध्यमातुन संघ राष्ट्राची सेवा करीत आहे. संघाचे चित्र समाजात काही जण चुकीचे उभे करत असले तरी संवाद आणि कृतीतुन संघ त्याला उत्तर देत असल्याचे देखील यावेळी बापट म्हणाले. शिबीराला डॉ. लता घनशामानी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, स्वयंजागृती, स्वयंशिस्त आणि स्वसहभाह या त्रिसुत्रीतुन व्यक्ती अथवा देश मोठा होत असतो. संघ स्वयंसेवकांमध्ये देखील हे तीन गुण प्रकर्षाने दिसुन येतात. आपल्या पुर्वजांच्या रुढी, परंपरा आणि सवयी या निसर्गपुरक होत्या. त्या आपण विसरलो म्हणून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यापुन्हा अंगिकारण्याची आज गरज असल्याचे डॉ. घनशामानी यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
दोन दिवशीय नवचेतना शिबारात ४०७ संघस्वयंसेवक उपस्थित होते; बिरसा मुंडा, गुरू तेजबहादुर सिंह व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने तीन बौध्दीक कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षात संघ आयुनुसार यावेळी बौध्दीक वर्ग घेण्यात आले. पर्यावरण स्नेही व स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागावा म्हणून शिबीर स्थळी सौरउर्जा व बायो टॉयलेटचा वापर करण्यात आला. शिबीरात ४८ शिक्षक व २७ गण पालकांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी योगदान दिेले तर ६०० कुटुंबांनी रोजच्या लागणारया पोळ्या देवुन शिबीरात कृतीरूप सहभाग घेतला. यावेळी इतिहास भारती संस्थेच्या माध्यमातुन ठाणे जवळील दिगाशी येथे ४ एकर जागेत उभे राहत असलेल्या वनवासी जनजाती संरक्षण, संवर्धन व प्रशिक्षण केद्रासाठी सपत्नीक पुर्णवेळ म्हणून निघालेल्या मोहन अत्रे व शिला अत्रे यांचा संघचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबीर समारोप प्रसंगी कार्यवाह अजय जोशी, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मेनन, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल साठे ठाणे जिल्हा कार्यवाह जितेंद्र झोरे, ठामपा सभागृह नेते नरेश म्हस्के, ठाणे भाजपा अध्यक्ष संदीप लेले, विहीपचे सुधीर रानडे, अच्युतराव वैदय यांच्यासह मोठ्या संख्येने स्वयंसेवक व नागरीक उपस्थित होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat