पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय देशांकडून पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली असताना, अगदी चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानबरोबर एकही सामना खेळू नये, अशी मागणी जोर धरत होती.
‘नवा पाक’ होणे नाही!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रभाव टिकवून ठेवण्यासाठी क्रिकेट हा एकमेव मार्ग होता. मात्र, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या ४० हून अधिक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आणि यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा वगैरे करण्याची भानगडीच नको, अशी प्रतिक्रिया क्रिकेटजगतातूनही उमटू लागली. यात आता क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी देखील एक महत्त्वाचे विधान केले. गावस्कर आणि इमरान खान यांचे मैदानावरील वैर आणि मैदानाबाहेरची मैत्री तशी सर्वांच्याच परिचयाची. आपल्या उभरत्या काळात इमरान यांच्या गोलंदाजीचे वाभाडे काढणारे गावस्कर यांनी या घटनेनंतर, “पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेऊ नये,” अशी मागणी केली, तर भारताला डिवचणार्या इमरान खानला आपण मित्रत्वाचा सल्ला द्यावा का? असा प्रश्नही सुनील गावसकर यांना पडला आहे. म्हणून या आपल्याला डिवचणार्या या संघाशी विश्वचषकात दोन होत न करता, त्यांना गुण का द्यावे, असा सवाल करत गावस्कर यांनी भारताने पाकिस्तानच्या विरोधात खेळावे आणि त्यांना हरवावे, असे आवाहनही केले. तर, “पाकिस्तानातील निवडणूकपूर्व काळात तुम्हाला आम्ही निवडून आलो तर ‘नवा पाकिस्तान’ दिसेल,” अशा बढाया मारणार्या इमरान खान यांनी ‘नव्या पाकिस्तान’च्या दिशेने एक पाऊलही उचलले नाही. त्यामुळे ‘नवा पाक’ कधीच होणे नाही, अशी खोचक टीकाही गावस्कर यांनी केली, तर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने, “देशापेक्षा काहीच मोठे नाही, त्यामुळे विश्वचषकात पाकिस्तानसोबत भारताने काय, कोणत्याही देशाने खेळू नये,” अशी मागणीवजा आवाहन केले आहे. दरम्यान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर इमरान यांनी भारतासमोर मैत्रीचा हात तर पुढे केला, पण मैत्रभाव टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न मात्र केले नाहीत. याउलट ‘अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ,’अशा कुरापतींमध्येच पाकिस्तान आघाडीवर राहिले. त्यामुळे क्रिकेट आणि राजकारण यांच्यात सरमिसळ होऊ नये, असे कितीही म्हटले तरी पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, तर त्यासाठी चहुबाजूंनी त्यांची कोंडी करायला हवी. त्यामुळे पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने होवोत अथवा न होवोे, पण ‘नवा पाक’ होणे नाही, हे मात्र नक्की...
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat