स्वा. सावरकर साहित्य संमेलनातील दिलीप करंबेळकर यांचे अध्यक्षीय भाषण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019   
Total Views |


स्वा. सावरकर
, भगवान बुद्ध व म. गांधी

 

स्वा. सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल या संमेलनाच्या आयोजकांना मी धन्यवाद देतो. सावरकरांच्या प्रेरणेतून ज्यांनी मराठी साहित्यिक व सांस्कृतिक विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले, अशा पु.भा. भावे यांच्या जन्मस्थानी हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या या नगरीला त्यांचेच नाव देण्याचे औचित्य आयोजकांनी दाखविले आहे. पु.भा. भावे यांच्या लिखाणात भाषासौंदर्य, तेजस्विता व निर्भयता यांचा संगम झाला होता. त्यांच्या वक्तृत्वातही त्याचा प्रत्यय येत असे. अखंड भारत हे त्यांचे श्रद्धास्थान. जीवनातील दिव्यत्व, पराक्रम व सौंदर्य याचे ते उपासक होते. भारताची फाळणी व त्यानंतर झालेला वंशसंहार हा मानवतेला बसलेला मोठा धक्का. परंतु मराठीतच काय, भारताच्या साहित्यिक इतिहासात बोटावर मोजणाऱ्या लोकांनी त्याविषयी साहित्यनिर्मिती केली आहे. पु.भा. भावे हे त्यातील एकमेव अपवादात्मक मराठी साहित्यिक. ते नाटककारही होते व चित्रपटाच्या कथाही त्यांनी लिहिल्या आहेत. नाट्य संमेलनाचे व साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले होते. अशा या साहित्यिकाच्या नगरीत आपण दोन दिवस चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर मराठीतील एक प्रतिभावंत विद्वान व इतिहासतज्ज्ञ वि.का. राजवाडे यांचीही ही कर्मभूमी आहे. नानासाहेब देव यांच्या प्रेरणेने १२५ वर्षांपूर्वी धुळ्यात सत्कारोत्तेजक सभेची स्थापना झाली. एखाद्या संस्थेचे काम सहा पिढ्यांनी सातत्याने चालविणे किती अवघड असते, याची कल्पना सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्यांना येऊ शकते. नानासाहेब देव यांच्यामुळे इतिहासाचार्य राजवाडे यांनी महाराष्ट्र संशोधन केंद्र धुळ्यात आणले. समर्थ रामदासांचे सर्व साहित्य संकलन करण्याचे, त्याचे प्रकाशन करण्याचे व त्यावर विचारमंथन घडवून आणण्याचे काम ही संस्था सातत्याने व समर्पित बुद्धीने करीत आहे.

 

स्वा. सावरकरांचे जीवन हे मातृभूमीला समर्पित केलेले महाकाव्य आहे. साहित्यामध्ये काव्य हा सर्वात उत्कट प्रकार मानला जातो. त्यात शब्द आणि अनुभव एकात्म होऊन प्रकटतात. त्यात कृत्रिमता नसते. त्यामुळे सावरकरांचा विचार करणे, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे, त्यांच्याबद्दल ऐकणे किंवा त्यांच्याबद्दल बोलणे या सर्वच गोष्टी राष्ट्रभक्तीचा ऊर्जास्रोत आहेत. त्यांच्या जीवनाबद्दल आपण बोलतो, तेव्हा ते त्यांच्या एकट्याचे राहत नाही, तर त्यांच्या रूपाने समग्र हिंदू संस्कृतीतील चैतन्यतत्त्व आपल्या आत्म्याला येऊन भिडत असते. पुढील दोन दिवस आपण सर्व जण त्या चैतन्यतत्त्वाने न्हाऊन निघणार आहोत. सावरकरांचे सर्वच साहित्य भावोत्कट, मनातील उदात्ततेची क्षितिजे विस्तारणारे आणि मन उन्नत करणारे आहे. परंतु त्या सर्व साहित्यातील चमकता तारा म्हणजे ‘जयोस्तुते’ हे मातृभूमी गीत. जगातील मातृभूमीस्तवनपर गीतांची स्पर्धा ठेवली, तर त्यात हे पहिल्या क्रमांकाचे ठरेल. भारत पारतंत्र्यात असताना १९०३ साली पुणे येथे त्यांनी हे गीत लिहिले. त्या वेळी ते अवघ्या वीस वर्षांचे होते. ज्या हिंदू राष्ट्रासाठी त्यांनी आपल अवघे जीवन अर्पण केले, त्या राष्ट्राचे त्यांना झालेले साक्षात दर्शनच जणू या काव्यात प्रकट झाले आहे. ही केवळ मातृभक्तीची पूजा नाही, तर या मातृभूमीचे मूल्यसंचित काय ? तिचे या जगातील कर्तव्य कोणते? आणि तिच्याप्रती असलेले माझे कर्तव्य काय? या सर्व गोष्टी त्यांनी अवघ्या चार कडव्यांमधून स्पष्ट केल्या आहेत. हे गीत म्हणजे स्वतंत्र भारताची जगात भूमिका कोणती असेल व ती पार पाडण्याकरिता त्यातील नागरिकांचे असलेले कर्तव्य यांचा जणू जाहीरनामाच आहे.

 

नीतियुक्त समृद्धी, संपन्नता हे हिंदू राष्ट्र चैतन्यतत्त्वाचे स्वरूप असल्याचे सांगून ते म्हणतात - तुझ्यात सूर्याचे तेज आहे व सागराचे गांभीर्यही. राष्ट्रातील नागरिकांचे राष्ट्रीय चैतन्यतत्त्वाशी जोडलेले संबंध हे केवळ घटनात्मक तरतुदीत शब्दबद्ध केल्याप्रमाणे कराराधिष्ठित नसतात, तर ते आत्मतत्त्वाचेच सामूहिक प्रकटीकरण असते. या राष्ट्रीय समूहतत्त्वाशी एकात्म होणे म्हणजेच ज्याला योगी लोक परब्रह्माची प्राप्ती करून घेणे म्हणतात, त्याच परब्रह्माची प्राप्ती होय. जगातील जे जे उदात्त आणि उन्नत आहे, त्याचे सामूहिक प्रकटीकरण म्हणजे आमचे राष्ट्रचैतन्य. हे राष्ट्रचैतन्य सर्जनाची पूजा करणारे व दुर्जनाचा विनाश करणारे आहे. अशा राष्ट्रीय चैतन्यासाठी मरण पत्करले, तरी ते समूह संचितात विलीन होत चैतन्यतत्त्वाच्या रूपाने चिरकालत्व प्राप्त करून घेते. त्या चैतन्यतत्त्वाची अनुभूती नसेल, तर जगणे अर्थशून्य, मरणासमानच आहे. या गीतात वर्णिलेला सावरकरांचा राष्ट्रवाद वंशवादी नाही, साम्राज्यवादी नाही, दुर्बलांचे शोषण करू पाहणारा शोषक नाही, शेजाऱ्यांना भीतिदायक वाटेल असा आक्रमक नाही, तर नैतिकतेची कास धरून समृद्धीची उपासना करणारा, जगातील उदात्त व जीवन उन्नत करील अशा तत्त्वांची जोपासना करणारा आहे. तो विश्वचैतन्याचाच भाग असल्याने राष्ट्रचैतन्याचा साक्षात्कार हाच मुक्तीचा मार्ग आहे. राष्ट्रसाधना हीच ऐहिक, नैतिक, कलेची, सौंदर्याची व आत्मिक किंवा आध्यात्मिक समूह साधना आहे. ही साधना केवळ स्वसुखापुरती मर्यादित नाही, तर जगातील सर्जनशक्तीच्या संरक्षणाची जबाबदारीही या राष्ट्रवादाने घेतली आहे. प्रसंगी त्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार आणि क्षमताही त्याच्यापाशी आहे. ‘परित्राणाय साधूनाम, विनाशायच दुष्कृताम’ असा हा अवतारस्वरूप असलेला राष्ट्रवाद आहे.

 

राष्ट्रवादाचे विभिन्न आविष्कार

 

सावरकरांच्या या गीतानंतर जवळजवळ एका शतकानंतर, आज आपण एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वेगळ्या प्रकारचा प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद अनुभवत आहोत. विसावे शतक हे राष्ट्रवादाचे व विचारसरणीचे शतक म्हणून ओळखले जात असले, तरी त्याचा शेवट बाजारपेठीय जागतिकीकरणात झाला. युरोपमध्ये सुमारे गेली तीनशे वर्षे राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा विकास दोन मार्गांनी होत होता. समानतेच्या व व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारावरील लोकशाही हा एक मार्ग व वंशवादावर आधारित नाझी किंवा फॅसिस्ट राष्ट्रवाद हा दुसरा मार्ग. या दोन्ही संकल्पनांमधील संघर्ष युरोपीय देशांचा अंतर्गत संघर्ष होता. या दोन्ही गटांतील देशांना साम्राज्यशाहीचे वावडे नव्हते. दोन्ही जागतिक महायुद्धे ही या दोन गटांतील राष्ट्रांच्या साम्राज्यलोभाचा परिणाम म्हणून होती. परंतु या साम्राज्यविस्ताराचा परिणाम म्हणून विविध देशांतील राष्ट्रवादाच्या भावना जाग्या झाल्या व राष्ट्रनिर्माणाच्या जागृत झालेल्या भावनांनी दुसऱ्या महायुद्धाने दुबळ्या झालेल्या युरोपीय साम्राज्यवादी देशांना आव्हान दिले. त्याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर क्रमाने एक एक देश स्वतंत्र झाले. आज संयुक्त राष्ट्रसंघाची सदस्यसंख्या १९३ इतकी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर व्यक्तिस्वातंत्र्याधिष्ठित लोकशाहीवर आधारित राष्ट्रवादाबरोबरच मार्क्सवाद-समाजवाद आणि गांधीवाद या दोन विचारप्रणालींचाही जगावर प्रभाव पडला. यांतील लोकशाही राष्ट्रवाद व साम्यवाद यांच्या संघर्षामुळे झालेल्या शीतयुद्धाचा प्रभाव १९५० ते १९९० असा चाळीस वर्षे होता. १९९०च्या सुमारास तीन प्रमुख घटना घडल्या. रशियाचे विघटन झाले व त्याआधी चीनने कम्युनिझमच्या राज्यकेंद्रित अर्थव्यवस्थेचा त्याग करून खाजगी मालकीच्या उद्योग धोरणाचा स्वीकार केला, जागतिक मंदीवर मात करण्यासाठी भांडवलशाही देशांनाही बाजारपेठ विस्तारण्याची आवश्यकता वाटू लागली व संपर्क तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे संगणकाच्या पडद्यापुढे राष्ट्रीय सीमारेषा पुसट होऊ लागल्या. यातूनच विसाव्या शतकाच्या अखेरीस बाजारपेठेवर आधारित जागतिकीकरणाची संकल्पना प्रभावी होऊ लागली. या संकल्पनेला वीस वर्षे होण्याच्या आतच वेगवेगळ्या देशांत जागतिकीकरणाची प्रतिक्रिया म्हणून प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद प्रभावी होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर स्वा. सावरकरांनी हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जे स्वरूप स्पष्ट केले आहे, त्याचा विचार केला पाहिजे.

 

भारतीय राष्ट्रवादाच्या दोन परंपरा

 

ब्रिटिशांच्या विरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी दोन महापुरुषांनी केली. या दोन्ही मांडणीत प्राचीन हिंदू संस्कृतीच्या दोन वेगळ्या पैलूंवर भर दिला होता. ते पैलू बाह्यत: परस्परविरोधी वाटत असले, तरी त्यात आंतरिक एकात्मभाव आहे. अनेक वेळा समाजपरिवर्तनाचे वेगवेगळे विचार त्या काळात परस्परविरोधी वाटतात, पण कालांतराने त्यात परस्परपूरकता आहे, हे लक्षात येते. टिळक व आगरकर हयात असताना आधी राजकीय की सामाजिक असा लढा हिरिरीने लढला गेला. तो लढत असताना टिळक व आगरकर यांनी असभ्य भाषेत एकमेकांवर टीकाही केली. पण त्याच वेळी त्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेवरून आपण त्यांचे मूल्यमापन करीत नाही. एकाच कालखंडात त्या दोघांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केले, त्यासाठी आपल्या जीवनात जो त्याग केला, त्याचे आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण करत असतो. स्वा. सावरकर व म. गांधी यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दल तसाच विचार करावा लागेल. वास्तविक पाहता स्वा. सावरकरांनी म. गांधींच्या राजकारणावर तिखट टीका केली आहे. त्या टीकेला तत्कालीन राजकारणाचा संदर्भही आहे. परंतु गेल्या साठ वर्षांत म. गांधींच्या तत्त्वज्ञानाचा वेगवेगळ्या पैलूंतून अभ्यास होत असून लोकशाही भांडवलवाद, लोकशाही समाजवाद, साम्यवाद याप्रमाणे विसाव्या शतकात गांधीवाद हेही राजकीय चळवळींचे तत्त्वज्ञान बनले आहे. रशियन राज्यक्रांतीनंतर जगभर साम्यवादी विचारांचा प्रभाव वाढू लागला. जगातील आर्थिक शोषण संपवायचे असेल तर मार्क्सवादावर आधारित क्रांती अपरिहार्य आहे, अशी या सर्व विचारवंतांची धारणा झाली होती. तिचा प्रभाव भारतीय विचारवंतांवर व स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांवर पडला होता. त्या वेळी म. गांधींनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. कम्युनिस्ट क्रांती फक्त व्यवस्था परिवर्तनाचा विचार करते. जर व्यक्तीमध्ये परिवर्तन झाले नाही, केवळ व्यवस्था परिवर्तन झाले, तर शोषकांचा वर्ग बदलेल, शोषण मात्र कायम राहील. ज्या ज्या देशात कम्युनिस्ट क्रांती झाली, अशा सर्व देशांत तसा अनुभव आला. व्यक्तिपरिवर्तनासाठी हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवला पाहिजे, हा गांधीवादाचा पहिला महत्त्वाचा घटक. गांधीवादाचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अहिंसेचे मूल्य. केवळ अहिंसेचे तत्त्वज्ञानच शांततामय सहजीवन निर्माण करू शकते, असे त्यांचे प्रतिपादन होते. गांधींचा तिसरा आग्रह साधनशुचितेचा होता. हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवून अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करूनच आपले साध्य साधता आले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. याचसोबत निसर्गसंस्कृतीचा स्वीकार, यंत्रसंस्कृतीला विरोध, गरजा किमान ठेवण्याचा आग्रह अशी गांधीवादाची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत.

 

याउलट सावरकर हे शक्तीचे उपासक आहेत. या जगात जगण्यासाठी केवळ आत्मशक्तीच्या बळावर जगता येते, यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणारे नाहीत. सावरकरांच्या तत्त्वज्ञानावर भाष्य करण्यापूर्वी सावरकरांची राष्ट्राची संकल्पना काय आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता हेगेल या जर्मन विचारवंताच्या तत्त्वज्ञानाची थोडी ओळख असणे गरजेचे आहे. हेगेलच्या मते जगाची धारणा करणारे परमतत्त्व हे अत्यंत गतिमान, जिवंत, प्राणमय व चैतन्याने उफाळणारे आहे. हे परमतत्त्वच व्यक्तीच्या मनाला स्पर्श करते व तिच्या मनात स्वातंत्र्याच्या आकांक्षा निर्माण करते. हेच परमतत्त्व विभाजित होते, विसंवादी, विरोधी बनते, परंतु त्यातील एकत्वाची आकांक्षा लुप्त होत नाही. ते चैतन्यतत्त्व जेव्हा समूहरूपाने प्रकट होते, त्यालाच आपण राष्ट्र असे म्हणतो. ज्या ज्या व्यक्तींच्या जीवनात हे चैतन्यतत्त्व समूहरूपाने प्रकट होते, अशा व्यक्तींची गुणसंपदा ही राष्ट्राची मूल्यपरंपरा बनते व ती परंपराच राष्ट्राला जिवंत ठेवते. राष्ट्राच्या या चैतन्यदायक परंपरेलाच सावरकर आवाहन करत असतात. कोणत्याही समाजाचे राजकीय स्वातंत्र्य हे त्या समाजाचे आंतरिक स्वातंत्र्य व सामर्थ्य दृश्यमान करीत असते. त्यामुळे आपल्या राजकीय स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही कोणत्याही समाजाची प्राथमिक जबाबदारी असते, कारण राजकीय स्वातंत्र्यात अन्य सर्व स्वातंत्र्ये अंतर्भूत असतात. प्रत्येक राष्ट्र म्हणजे एका विशिष्ट मूल्यसंपदेचे प्रकटीकरण असते. त्या विशिष्ट समाजाची जी संस्कृती असते, त्यातून सर्वसामान्य लोकांच्या अंतर्मनात ऐतिहासिक परंपरेतून आलेल्या मूल्यभानाची बीजे दडलेली असतात. आपल्या विचारांनी व आचाराने समाजमनात सुप्तावस्थेत असलेल्या मूल्यभानाला जागृत करण्याचे काम नेते करीत असतात. एखाद्या देशाला आलेले पारतंत्र्य हे मूल्यभान क्षीण झाल्याचेच लक्षण असते. त्यामुळे हे सुप्त मूल्यभान जागृत करून जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न स्वा. सावरकर व म. गांधी या दोन्ही नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये केला. आपण एका विराट चैतन्यतत्त्वाचा भाग आहोत व त्या चैतन्यतत्त्वाचे आकलन करून घेणे हे व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून आपले उद्दिष्ट आहे, या विचारांच्या आधारावरच हिंदू संस्कृतीतील चैतन्यतत्त्व टिकून राहिले आहे. त्यामुळे सावरकर हे राष्ट्रभक्तीला मोक्ष मिळविण्याचे साधन मानतात, तसेच म. गांधीही राजकारणाकडे आध्यात्मिक साधनेच्या स्वरूपातच पाहतात. फक्त सावरकरांचा मार्ग हा वीरत्वाचा आहे, तर गांधींचा संतत्वाचा आहे. दोघांचेही विचार भारताच्या दोन सांस्कृतिक परंपरांचे प्रतिनिधित्व करतात.

 

वीरत्वाच्या ऱ्हासाचे परिणाम

 

भारताच्या वीरत्वाच्या परंपरेचा र्हास झाल्याने आधी मुस्लिमांच्या व नंतर ब्रिटिशांच्या आक्रमणाला भारत बळी पडला. या काळात संत परंपरेनेच भारताचा सांस्कृतिक प्रवाह जिवंत ठेवला. सावरकर ज्या वीरत्वाच्या परंपरेला जागृत करू पाहत होते, त्या परंपरेचे सामाजिक मनातून काळाच्या ओघात विस्मरण झाले होते, तर म. गांधी ज्या संत परंपरेचे प्रतिनिधित्व करीत होते, ती परंपरा समाजमनात जिवंत होती. एका परंपरेचे सामर्थ्य मनगटातून किंवा ऐहिक सामर्थ्यातून आले आहे, तर संत परंपरेतील सामर्थ्य आध्यात्मिक संकल्पनेतून व सहनशीलतेतून आले आहे. स्वातंत्र्यलढ्यात गांधींचा मार्ग यशस्वी होण्याची चार प्रमुख कारणे होती. मध्ययुगीन काळापासून भारतातील सर्व राज्यांत व भाषांत संतांची व त्यांच्या साहित्याची दीर्घ परंपरा होती व समाजातील सर्व वर्गांवर त्याचा प्रभाव होता, हे पहिले कारण. ब्रिटिशांच्या विरोधात देशव्यापी सशस्त्र उठाव संघटित करणे ही अशक्यप्राय गोष्ट होती, हे दुसरे कारण. त्यामुळे क्रांतिकारकांचे प्रयत्न विखुरलेले राहिले. अहिंसात्मक चळवळीत व्यापक लोकसहभाग शक्य होत होता, हे तिसरे कारण व गांधींचे राहणे व जीवनशैली ही सर्वसामान्य हिंदू मानसिकतेला भावणारी होती, हे चौथे कारण. भारताला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ काँगे्रसच्या लढ्यामुळे असे सांगितले गेले. परंतु त्याची दोन अन्य प्रमुख कारणे म्हणजे दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवूनही सर्व दृष्टींनी कमकुवत झालेले इंग्लंड व आझाद हिंद फौजेचा परिणाम म्हणून भारतीय सैन्यदलात निर्माण झालेली स्वातंत्र्यविषयक जाणीव. परंतु आपल्या अहिंसक मार्गानेच भारताला स्वातंत्र्य मिळाले असा भ्रम काँग्रेस नेतृत्वाने करून घेतला आणि स्वातंत्र्यानंतर लष्करी बळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा परिणाम १९६२च्या चीनबरोबरच्या युद्धात भोगावा लागला. त्या वेळेस लक्षात आले की वीरत्वाची परंपरा जोपासल्याशिवाय संतत्वाची परंपरा टिकविता येत नाही.

 

कोणत्याही समाजाचे मूल्यसंचित हे त्या त्या समाजाच्या ऐतिहासिक परंपरेचा भाग असतो. त्यामुळे जर ते मूल्यसंचित टिकायचे असेल, तर तो समाज टिकणे गरजेचे असते. वास्तविक पाहता भारत व पाकिस्तान एकाच वांशिक गटाचे आहेत व त्यांचा इतिहासही समान आहे. परंतु हिंदू समाज जे मूल्यसंचित मानतो, ते मुस्लीम समाज मानत नाही. त्यामुळे पाकिस्तानची काय स्थिती झाली आहे ते आपण पाहत आहोत. पाकिस्तानमध्ये परधर्मसहिष्णुता, व्यक्तिस्वातंत्र्य, सार्वजनिक जीवनातील सुसंस्कृतता आदी मूल्ये उद्ध्वस्त झाली आहेत व तिथले लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार हे तेथील धर्मांध अतिरेकी व भारतद्वेषाने पछाडलेले लष्कर यांच्या हातचे बाहुले बनले आहे. पाकिस्तानपेक्षा भारतामधील विविधता अधिक असूनही इथे लोकशाही, परधर्मसहिष्णुता आदी मूल्ये टिकली आहेत, याचे कारण हिंदू समाजाचे मूल्यसंचित अजूनही टिकून आहे, त्यामुळे. जर स्वतंत्र भारतातील हिंदू समाज अल्पसंख्य बनला किंवा दुबळा झाला, तर ज्या मूल्यसंचिताच्या आधारावर इथली लोकशाही व परधर्मसहिष्णुता आदी मूल्ये टिकली आहेत, तीही धोक्यात येतील. त्यामुळे या समाजाच्या भवितव्याचा प्रश्न हा ज्या मूल्यसंचिताचा आपल्याला अभिमान आहे त्याच्याशी निगडित आहे. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात सेक्युलर या संकल्पनेचा वापर हिंदू समाजाला दुबळे करण्याकरिता केला गेला. हिंदू समाजातील जातवादी अस्मितांचा प्रभाव वाढविणे व जात संघर्षाला उत्तेजन देणे, धर्मसहिष्णुतेच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या जातीयवादाला संरक्षण व उत्तेजन देणे, अल्पसंख्याकांचे वेगळेपण जपणारे कायदे व वातावरण निर्माण करून स्वत:ला हिंदू समाजापासून तोडण्यात अधिक फायदा आहे अशी हिंदू समाजातील अनेक समाजगटांना लालूच दाखविणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. ज्या ज्या गोष्टी हिंदू परंपरेशी संबंधित आहेत, त्या सर्वांना जातीयवादी ठरविले जाऊ लागले. मग आरोग्यासाठी सूर्यनमस्कार घालण्याचे धोरण असो वा गीतेचे पाठ शिकविण्याचा विचार असो, या सर्वांवर जातीयवादी म्हणून शिक्का मारला गेला. याची प्रतिक्रिया म्हणून आत्मरक्षणाच्या भावनेने हिंदू समाज राजकीयदृष्ट्या जागा झाला आहे व तो प्रतिक्रिया देत आहे. त्या प्रतिक्रियेचे स्वरूप कसे असले पाहिजे, याचा आराखडा तयार करण्याकरिता सावरकरांना स्वातंत्र्यदेवतेचे वर उल्लेख केलेले जे स्वरूप अपेक्षित होते, ते कसे प्रत्यक्षात येईल याचा विचार केला पाहिजे.

 

सावरकरप्रणीत राष्ट्रवादाचे वेगळेपण

 

विसाव्या शतकाने राष्ट्रवादाची अनेक रूपे पाहिली. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, जपान आदींचा साम्राज्यवादी राष्ट्रवाद, जर्मनी, इटली यांचा वंशवादी राष्ट्रवाद, लोकशाही व मुक्त अर्थव्यवस्थेच्या बुरख्याआड दडलेला अमेरिकेचा राष्ट्रवाद, रशिया व चीन यांचा मार्क्सवादाची भाषा बोलणारा राष्ट्रवाद इत्यादी. जागतिकीकरणाची प्रतिक्रिया म्हणून एकविसाव्या शतकात पुनरुज्जीवित झालेल्या प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादापेक्षा सावरकरांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप वेगळे आहे. या राष्ट्रवादात समृद्धीची इच्छा आहे, पण ती नीतियुक्त असणे ही त्याची पूर्वअट आहे. ती समृद्धी इतर देशांच्या शोषणावर अवलंबून नाही. जगात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर आहे, त्यांच्या साहचर्याने राहणारा हा राष्ट्रवाद आहे. तो सौंदर्याचा पूजक आहे. आपल्या सामूहिक जीवनातून उदात्त मूल्यांचे प्रकटीकरण करण्याचे त्याचे ध्येय आहे. त्यामुळे इतर देशांना गुलाम करू पाहणारा किंवा त्यांच्यावर अत्याचार करू पाहणारा हा राष्ट्रवाद नाही, या राष्ट्रवादाची आकांक्षा जगावर साम्राज्य प्रस्थापित करण्याची नाही, तर सामूहिक मुक्तीची आहे. तो सर्जनाची पूजा करणारा आहे. पण त्याचबरोबर त्याला हे माहीत आहे की या जगात सर्जन नष्ट करू पाहणाऱ्या, जगाला गुलाम करणाऱ्या, त्यांचे शोषण करणाऱ्या अधम प्रवृत्तीही आहेत. आवश्यकता पडली, तर आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी व अधम प्रवृत्तीपासून जगाचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रवृत्तींच्या विरुद्ध प्रत्यक्ष रणांगणावर लढण्याचे सामर्थ्य व मानसिकताही हा राष्ट्रवाद बाळगून आहे. या राष्ट्रवादाचे सामर्थ्य हे बाह्य साधनांबरोबरच देशाच्या रक्षणासाठी स्वत:चे प्राण अर्पण करण्याच्या नागरिकांच्या निर्धारावर आधारित आहे. सावरकरप्रणीत राष्ट्रवाद हा गुणात्मकरीत्या इतर राष्ट्रवादांहून निराळा आहे.

 

मूल्याधिष्ठित सामर्थ्याची उपासना

 

सावरकरप्रणीत राष्ट्रवादाचे हे वेगळेपण लक्षात न घेता सावरकरांच्या सामर्थ्यशील हिंदू राष्ट्र कल्पनेवर आक्रमक राष्ट्रवाद म्हणून टीका केली जाते. इतर देश सामर्थ्यशाली बनल्यावर त्यांनी जे केले, तसेच भारत करणार असे गृहीत धरून ती टीका केली जाते. सावरकरांनी स्वातंत्र्य स्तोत्र लिहिले, तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सावरकरांना राजकीय उपेक्षा सहन करावी लागली. त्यामुळे त्यांनी समर्थ भारताच्या धरलेल्या आग्रहाचा विचार सकारात्मकदृष्ट्या करण्याऐवजी त्यांचा उपहास केला गेला. परंतु चीन हल्ल्याचा अनुभव आल्यानंतर नाइलाज म्हणून का होईना, भारत लष्करीदृष्ट्या सामर्थ्यसंपन्न झाला पाहिजे हे धोरण स्वीकारावे लागले. सावरकर जेव्हा लष्करी सामर्थ्याची भाषा बोलतात, तेव्हा ते ती आक्रमकाच्या भूमिकेतून बोलत नसून अजूनही जग हे न्यायाच्या पातळीवर परस्पर संबंध असावेत असे वागण्याइतके सुसंस्कृत झालेले नाही या वास्तववादी आकलनातून. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेचा नोबेल सन्मान मिळताना त्यांनी जे भाषण केले, त्यात त्यांनी मार्टिन ल्यूथर किंग यांच्या हिंसाचार कधीही कायमची शांतता निर्माण करू शकत नाही. तो कोणतेही सामाजिक प्रश्न सोडवू शकत नाही, तो फक्त नवे व अधिक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करतो’ या विधानाचा उल्लेख केला व त्याच्या मर्यादाही सांगितल्या. अमेरिका त्या वेळी दोन देशांत युद्ध करीत होती. त्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, ‘‘जगामध्ये अशा काही शक्ती आहेत की ज्यांच्याशी शांततामय संवाद शक्य नाही. अहिंसात्मक मार्गाने हिटलरच्या सैन्याला थांबविता आले नसते. शांततामय वाटाघाटींनी अल कायदाला शस्त्रत्याग करणे भाग पाडता आले नसते. त्यामुळे काही वेळा शक्तीचा वापर करणे अपरिहार्य आहे असे म्हणणे हा सिनिसिझम नाही, तर ऐतिहासिक अनुभवाला दिलेली मान्यता आहे, मानवी अपूर्णतेची व त्याच्या तर्कबुद्धीच्या मर्यादांची स्वीकृती आहे.’’ सावरकर जेव्हा सामर्थ्यसंपन्न हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करतात, तेव्हा हेच वास्तव सांगत असतात.

 

नव्या मिथकाची गरज

 

मानवजातीच्या इतिहासाचे अभ्यासक व सेपियन्स : अ ब्रीफ हिस्टरी ऑफ ह्युमनकाइंड’ आणि ‘होमो डेअस : अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टुमॉरोआदी ग्रंथांचे लेखक प्रा. युवाल नोवा हरारी यांनी वेगवेगळ्या मानवसमूहात होणाऱ्या संघर्षाबाबत मार्मिक निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यांच्यामते, ‘यातील बरेचसे संघर्ष, समाजाच्या मूलभूत आवश्यकतापेक्षा ज्या मिथकांवर समाज चालतो त्या आधारावर होतात. समाज एकत्रित ठेवण्याकरिता मिथके निर्माण केली जातात व त्याआधारेच समाज चालतो. जग हे मायारूप आहे असे हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञान सांगते. हे अंतिम सत्य आहे. परंतु प्रत्यक्षात जग हे देव, देश, धर्म, विचारप्रणाली, अर्थसत्ता आदींच्या मिथकांवर चालते असे इतिहास सांगतो. जर जग बदलायचे असेल, तर मिथके बदलायला लागतील.’ एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. परंतु ते अधिक संघर्षमयही झाले आहे. कारण अजूनही सर्व जगाला एकत्र आणेल असे मिथक तयार झालेले नाही. सर्व जगाला त्याच्या बहुविधतेची वैशिष्ट्ये जपत सर्जनशीलतेला जपणारे मिथकच एकत्र आणू शकेल. कोणते मिथक एकविसाव्या शतकात जगाला एकत्र आणू शकेल व त्यात सावरकरप्रणीत राष्ट्रवादाची कोणती भूमिका असेल, याचा विचार करू. जगाला एकत्र आणण्यासाठी सेमेटिक धर्म, कम्युनिझम, बाजारपेठेचे जागतिकीकरण यांनी मिथके पुरविण्याचा प्रयत्न केला. युरोपमधील प्रबोधनकाळात ख्रिश्चन सेमेटिक धर्म असे मिथक पुरवू शकत नाही, असे लक्षात आल्याने तिथे इहवादी राष्ट्रवादाच्या संकल्पनेने जन्म घेतला. आज जगभरातील जिहादी शक्ती दहशतवादाच्या बळावर सर्व जगावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याविरोधात जगभर वातावरण तयार झाले आहे. विसाव्या शतकात मार्क्सवादाच्या आधारावर शोषणाविरोधात वैश्विक क्रांती घडविण्याचे प्रयत्न झाले, पण ते विफल झाले. या क्रांतीचे नेतृत्व करणारे रशिया व चीन हे दोन्ही देश कट्टर राष्ट्रवादी बनले असून आपापल्या देशाच्या हिताच्या दृष्टीकोनातूनच जागतिक संबंधांची आखणी करत आहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस तंत्रज्ञानातील - विशेषत: संपर्क तंत्रज्ञानातील शोधामुळे जग एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले. त्याचा उपयोग करून बाजारपेठेच्या पातळीवर जग एकत्र आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्नही झाले. परंतु त्यामुळे जागतिकीकरणात हितसंबंध असणारा व जागतिकीकरणामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेलेले आहे असे दोन वर्ग तयार झाले आहेत. त्यात समाजमन विभागले गेले आहे. त्याचे पडसाद प्रत्येक देशाच्या राजकारणावर पडत असून त्यातून प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादाचा जन्म झाला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपल्या देशाच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी तो लोकांना आवश्यक वाटत आहे. या परिस्थितीत कोणते मिथक जगाला एकत्र आणू शकते, याचा विचार केला पाहिजे.

 

स्वातंत्र्याकांक्षी राष्ट्रवाद

 

प्रत्येक देशाला स्वातंत्र्य का हवे असते? कारण ते स्वातंत्र्य हे त्या त्या देशांतील सामूहिक स्वातंत्र्याचे प्रकटीकरण असते. प्रत्येक व्यक्तीच्या आत्मोन्नतीला जे पोषक वातावरण लागते, ते राजकीय स्वातंत्र्याशिवाय मिळू शकत नाही. पाशवी शक्ती वापरूनही राष्ट्राच्या स्वातंत्र्याकांक्षांना नष्ट करता येत नाही, याचा अनुभव अमेरिकेने व्हिएतनाममध्ये व रशियाने पूर्व युरोपीय देशात व रशियन प्रजासत्ताकातील देशांनीही घेतला. सावरकरांचा राष्ट्रवाद हा सर्जनपूजक आहे व जगातील जे जे उदात्त, उन्नत आहे त्याचे प्रकटीकरण करणारा आहे. या मूल्यांनुसार आपले जीवन जगणाऱ्या व्यक्ती समाजात असतात, परंतु जर समाजाचे समूहमन असे बनवायचे असेल, तर तशा प्रकारचे सामाजिक संस्कार समाजमनावर करावे लागतात. तसे ते करायचे असतील, तर त्या समाजाच्या परंपरेतील त्या मूल्यांना पोषक असलेला भाग समाजमनावर बिंबवावा लागतो. त्यामुळे सावरकर इतिहासाचा अभ्यास करतात तो इतिहासात रमण्यासाठी नाही, तर हिंदू समाज वर्तमानातील आव्हाने पेलण्यास समर्थ होऊन त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी उदात्त, उन्नत मूल्यांची जोपासना करणारे, सर्जनशीलतेचे पूजन करणारे राष्ट्र कसे असू शकते त्याचे उदाहरण जगापुढे ठेवण्यासाठी. अंधाऱ्या जगात चमचमणारी चांदणी असावी असे आदर्शभूत हिंदू राष्ट्र असले पाहिजेअसे सावरकरांचे स्वप्न आहे. अशा आदर्श हिंदू राष्ट्राकडे आपल्या गुणसंपदेने जगाचे राज्ञीपद यावे, हे स्वाभाविकच नाही काय? जर सर्वच देश त्यानुसार बनले, तर त्यातून निरोगी सहजीवन जगणारा विश्वसंघ तयार होईल. पण हे आव्हान सोपे नाही. जेव्हा सावकरांच्या काव्यकाळ हा भारताच्या पारतंत्र्याचा काळ होता. गेल्या शंभर वर्षांत जगाची उलटापालट होऊन गेली आहे. ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेत त्यांनी ‘त्वस्वामित्वा सांप्रत जी मिरविते’ असे आंग्लभूमीचे वर्णन केले होते, ती आंग्लभूमीच आपल्या भवितव्याविषयी शंकित झाली आहे. केवळ इंग्लंडच नव्हे, तर एकेकाळी सर्व जगावर राज्य करणारे युरोपीय देश वेगवेगळ्या आंतरिक प्रश्नांत गुंतले आहेत. रशिया व चीन या दोन्ही देशांनी आपली साम्राज्यवादी धोरणे राबवायला सुरुवात केली आहे. चीनच्या विस्तारवादामुळे दक्षिण आशियाई देश भयभीत झाले आहेत. आजवर जगाचा रखवालदार म्हणून काम करणाऱ्या अमेरिकेने आपली एक एक जबाबदारी कमी करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशासमोर दोन प्रकारची आव्हाने आहेत. पहिले आव्हान आहे अंतर्गत व दुसरे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे.

 

नवी आव्हाने

 

पाच वर्षांपूर्वी देशात जे ऐतिहासिक सत्तांतर झाले, त्या वेळी भारताच्या राजकीय व सामाजिक प्रवाहाने निर्णायक वळण घेतले असे वाटत होते. परंतु भारतीय राष्ट्रवादाला दुबळ्या करणाऱ्या जातवादी, राजकीय संधिसाधूपणा करणाऱ्या, डाव्या अतिरेकी, अराजकवादी, अल्पसंख्याकांच्या हिताच्या बुरख्याखाली धार्मिक जातीयवादाला आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्ती निर्णायकरीत्या पराभूत झालेल्या नाहीत. आपले अस्तित्व धोक्यात आल्यामुळे या सर्व शक्ती एकत्र आल्या आहेत व अशा एकत्रित झालेल्या शक्तींना उत्तर देण्याइतकी ताकद राष्ट्रवादी शक्तींना दाखवावी लागेल. या आव्हानाला तात्कालिक व दीर्घकालीन कसे उत्तर देणार, याचा प्रथम विचार केला पाहिजे. त्यासाठी ज्या ज्या कारणांमुळे आपली राजकीय व सामाजिक कोंडी झाली आहे, ती कोंडी फुटण्याकरिता कोणती धोरणे स्वीकारली पाहिजेत, यावर विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या कारणांमुळे हिंदू समाजाचे जे आंतरिक खच्चीकरण झाले आहे, त्या कारणांचा शोध घेऊन त्यावर मात केली पाहिजे.

 

जातवादाचे निर्मूलन

 

जातीवर आधारित संघर्षाच्या मानसिकतेने विभाजित झालेला हिंदू समाज हे हिंदू समाजाचे पहिले मर्मस्थान आहे. सावरकरांनी ज्या वेळी ज्यात्युच्छेदक निबंध’ लिहिले, त्या वेळची स्थिती वेगळी होती. जातव्यवस्था हा हिंदू धर्माचा एक अंगभूत भाग मानला जात होता. जातिगत उच्च-नीच भाव सामाजिक असंतोषाचे मोठे कारण बनला होता. समाजमनावर स्मृतींचा व धर्मशास्त्राचा पगडा होता. त्यामुळे हिंदू धर्माचे नव्याने विवेचन करणे आवश्यक होते. परंतु आता जातींच्या प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेने जातिवाचक भेदाभेद पाळणे हा गुन्हा ठरविला. ही नवी मूल्ये समाजमनात रुजायला वेळ लागला. मागास जातींसाठी आरक्षणाची सुविधा देण्यात आली. त्याचे अनेक सकारात्मक परिणामही आपण अनुभवले आहेत. परंतु त्याचबरोबर जात हे निवडणुकीत फार मोठे शस्त्र बनले. प्रारंभीच्या काळात निवडणुकीत सार्वजनिकरीत्या जातींच्या नावाचा उल्लेख करून मते मागायला संकोच वाटायचा. परंतु कालांतराने तो संकोचही संपला आणि जातींच्या आधारावर पक्षही निर्माण झाले. आता तर राखीव जागांच्या आंदोलनामुळे जातीय अस्मिता अधिक बळकट होत चालल्या आहेत. ही जातीय अस्मितांची लढाई हिंदुत्वाच्या चळवळीवर नकारात्मक परिणाम करणारी आहे. जे प्रश्न आज जातीच्या आधारावर लढले जात आहेत, ते वास्तविक वंचित समाजाचे आर्थिक प्रश्न आहेत. केवळ राखीव जागा देऊन ते सोडविता येणार नाहीत. केवळ सावरकरांनी केलेली नव्हे, तर स्वातंत्र्यपूर्व काळात जातीच्या प्रश्नासंदर्भात झालेली चर्चा आता संदर्भरहित व कालविसंगत झाली आहे. शेतकरी, खेड्यातील भूमिहीन, शहरात रोजगार शोधू पाहणारा व शहरातील व्यवस्थेबाहेरील गट यांच्यासाठी अर्थशास्त्राची नव्याने मांडणी करावी लागेल. या वर्गाला केवळ शासनावर आपले भवितव्य टांगून ठेवून राजसत्तेचे लाचार बनविण्यापेक्षा आपण स्वबळावर स्वाभिमानाने जगू शकतो अशा ऐहिक आकांक्षा जागृत कराव्या लागतील. आपण आपल्या बळावर विकास करू शकतो असा सामाजिक स्वभाव बनवावा लागेल. त्याकरिता आवश्यक आर्थिक, राजकीय, तंत्रज्ञानविषयक, सांस्कृतिक पर्यावरण निर्माण करावे लागेल. हे आपल्यापुढचे मोठे आव्हान आहे. याकरिता पारंपरिक गतानुगतिकतेत न रमता अत्याधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने अद्ययावत बनण्याचा पुरस्कार करणारा सावरकर विचार आपल्या मदतीला येणार आहे. त्यामुळे ज्या श्रद्धेने, निष्ठेने, निर्धाराने सावरकरांनी त्या वेळी सहभोजनांचा पुरस्कार केला, पतितपावन मंदिराची स्थापना केली, त्याच श्रद्धेने, निष्ठेने, निर्धाराने आमचा नवा जाती-चक्रव्यूह भेदण्यासाठी वंचितांचे नवे अर्थशास्त्र निर्माण करण्याची गरज आहे. दलित समाजामध्ये उद्योजकता निर्माण करणारी डिक्कीसारखी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. नवउद्योजकतेसाठी समाजात आपल्या गुणवत्तेच्या बळावर आपल्या जीवनात ऐहिक यश मिळवू शकतो, अशा विश्वासाची जोपासना करणे आवश्यक आहे. त्यामुळे नवउद्योजकतेसाठी अशा सामाजिक संस्कृतीची जोपासना करणे हा कृती कार्यक्रम झाला पाहिजे.

 

धार्मिक साम्राज्यवादाचा धोका

 

भारताचा स्वातंत्र्यलढा सुरू असताना मुस्लीम लीगने भारताच्या फाळणीची मागणी केली व देशभरात दंगली घडवून ती मागणी मान्य करायला लावली. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्यलढा हा जसा ब्रिटिशांच्या विरुद्ध केलेल्या संघर्षांचा इतिहास आहे, तसाच हिंदू-मुस्लीम संघर्षाचाही इतिहास आहे. त्यामुळे सावरकरांनी मुस्लीम समाजाच्या मानसिकतेचा अभ्यास केला व त्यातून काही मूलगामी निष्कर्ष काढले. मुस्लीम समाजाच्या समूहप्रेरणा या मध्ययुगीन धर्मग्रंथावर आधारित आहेत. सर्व जगाला इस्लाममय करणे हे त्याचे उद्दिष्ट असल्याने अन्य समाजाबरोबर त्या समाजाचे सहअस्तित्व अशक्य होऊन बसते. त्यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या मृगजळामागे लागण्यापेक्षा हिंदूंचे ऐक्य घडवून त्यांना संघटित करून त्या आधारेच फाळणी टाळता येईल, हे वास्तव त्यांनी रोखठोकपणे मांडले. परंतु हिंदू समाजाची सामूहिक मानसिकता राजकीय नसल्याने व सहिष्णू असल्याने, सावरकरांचा तर्कशुद्ध रोखठोकपणा त्या वेळी त्याच्या पचनी पडू शकला नाही. इस्लामच्या प्रभावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे एकदा त्या धर्माचा स्वीकार केला, तर त्या समाजाच्या इस्लामपूर्व संस्कृतीच्या स्मृती नष्ट होतात. म्हणजेच त्या देशाच्या वेगळ्या राष्ट्रीय परंपरेची वैशिष्ट्ये नष्ट होतात. त्यामुळे इराक, इराण, इजिप्त, अफगाणिस्तान यासारख्या देशांतील जुन्या संस्कृती नष्ट झाल्या आहेत. इंडोनेशियाही त्याच वाटेने चालू लागला आहे. त्यामुळे या सर्व देशांची स्वत:ची स्वतंत्र राष्ट्रीय ओळख नष्ट झाली असून त्यांची ओळख शिया की सुन्नी एवढीच उरली आहे.

 

भारताची फाळणी झाल्यानंतरच जो भाग मुस्लीम बहुसंख्य होता, तो पाकिस्तानमध्ये गेला. पाकिस्तानने स्वत:ला मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले. भारताने मात्र स्वत:ला सेक्युलर राष्ट्र म्हणून घोषित केले. भारताची राजकीय परंपरा एखाद्या विशिष्ट धर्माचा पुरस्कार करणारी नाही. त्याचबरोबर हिंदू संस्कृती ही विशिष्ट राजकीय मर्यादेत बसणारी संकल्पना नाही, ती जीवनव्यापी संकल्पना आहे. त्यामुळे भारताला सेक्युलर राष्ट्र म्हणून घोषित केले म्हणून तक्रारीचे कारण नसून सेक्युलॅरिझमचा जो अर्थ लावला गेला, तो आक्षेपार्ह होता व आहे. या संकल्पनेद्वारा हिंदू संस्कृतीशी निगडित असलेल्या सर्व गोष्टी जातीयवादी ठरविल्या गेल्या व अल्पसंख्याकांच्या संबंधातील प्रत्येक गोष्ट रक्षणीय मानली गेली. त्याचा परिणाम म्हणून समाजाच्या मुख्य प्रवाहाचा हिंदू संस्कृतीशी आत्मीय संबंध राहिला नाही. राष्ट्रीय प्रवाह अखंडित राहण्याकरिता समाजातील प्रत्येक पिढी मागच्या पिढीतील मूल्यसंचित घेऊन त्यात आपली भर टाकून ते संचित पुढच्या पिढीच्या हाती ठेवत असते. शालेय शिक्षणापासून विद्यापीठीय संशोधनापर्यंत सर्वांवर या तथाकथित पुरोगामित्वाचा प्रभाव पडला. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांपासून सामाजिक सुधारणांपर्यत अल्पसंख्याकांचे संरक्षण म्हणजे सेक्युलॅरिझम असा अर्थ न्यायालयापासून सर्वांनी लावला. श्रीरामजन्मभूमी लढ्यानंतर हे वातावरण बदलायला सुरुवात झाली. परंतु अजूनही आजवरच्या दांभिक सेक्युलॅरिझमला जे वैचारिक उत्तर दिले गेलेले आहे, त्याची नीट कालसापेक्ष मांडणी झालेली नाही. हिंदू परंपरा नाकारण्याला केवळ त्या परंपरेचा पूर्वगौरव हे उत्तर असू शकत नाही किंवा निव्वळ मुस्लीमद्वेष हेही उत्तर असू शकत नाही. मुस्लीम समाजात मूलगामी परिवर्तन घडल्याशिवाय आधुनिक नागरी समाजाच्या सांस्कृतिक पर्यावरणात हा समाज येऊ शकत नाही, अशा सकारात्मक मांडणीची आज आवश्यकता आहे. मुस्लीम तुष्टीकरणाने मुस्लीम समाजातील सुधारणांच्या सर्व वाटा बंद केल्या आहेत. त्या जोवर खुल्या होत नाहीत व शांततामय सहजीवनासाठी मुस्लीम मानसिकता तयार होत नाही, तोवर भारतातील मुस्लीम प्रश्न संपणार नाही व पाकिस्तानच्याही प्रश्नावर उत्तर मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने तलाकविरोधी निर्णय देऊनही, त्यासंबंधी कायदा करण्यात स्वत:ला सेक्युलरवादी म्हणवणारे पक्ष ज्या अडचणी आणत आहेत, ते पाहिले तर या विषयासंबंधात हिंदू समाजातच किती जागृती करणे आवश्यक आहे, ते लक्षात येते.

 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी मुस्लिमांच्या सामूहिक मानसिकतेवर सावरकरांनी जे भाष्य केले होते, त्याचा प्रत्यय केवळ भारतातच नव्हे तर जगभर येत आहे. अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, फ्रान्स हे सर्व प्रमुख देश जिहादी दहशतवादाचे बळी ठरले आहे. जिथे मुस्लीम समाज बहुसंख्य आहे, तिथले अनेक देश यादवीने ग्रस्त आहेत व जिथे त्यांची संख्या लक्षणीय आहे, तिथे दहशतवादाचा किंवा दंगलींचा त्रास आहे. हा प्रश्न केवळ कायदा व सुव्यवस्थेचा नसून सामूहिक मानसिकतेचा आहे. जोवर या मानसिकतेत बदल होत नाही, तोवर विश्वबंधुत्वाची कल्पना प्रत्यक्षात येणे अवघड आहे. सावरकरांनी ज्या तर्कशुद्ध परखडतेने या प्रश्नांची चिकित्सा केली, तशी करणारे अनेक विचारवंत व राजकीय नेते जगभर तयार होत आहेत. आज कोणताही प्रश्न केवळ एका देशापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे पडसाद जगभर उठत असतात. त्यावर जागतिक लोकमत तयार होत असते. मानवी हक्क, पर्यावरण, अण्वस्त्रबंदी यासारख्या अनेक विषयांवर आंतरराष्ट्रीय व्यासपीठे तयार झाली आहेत. तसेच शांततामय सहजीवन, राष्ट्रीय परंपरांचे पुनरुज्जीवन, विश्वबंधुत्व व आधुनिक जीवनमूल्यांचा स्वीकार आदी मुद्द्यांच्या आधारे जगातील पंचवीस टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लीम समाजात सुधारणा करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठे निर्माण करण्याची गरज आहे. असे केले, तरच या नव्या हिंसक धार्मिक साम्राज्यवादापासून जगाची सुटका होऊ शकते.

 

संरक्षण साधनात स्वावलंबन

 

स्वा. सावरकरांनी मांडलेला तिसरा महत्त्वाचा मुद्दा लष्करी सामर्थ्याचा आहे. स्वातंत्र्यानंतर त्या वेळच्या सत्ताधार्यांनी लष्करावरचा खर्च कमी करून विकासावर खर्च करू असा विचार केला गेला. वास्तविक आजवरचा इतिहास असे सांगतो की तंत्रज्ञानातले अनेक शोध हे प्रथम लष्करी गरज म्हणून लागतात व नंतर त्याचा नागरी उपयोग होतो. भारताने संरक्षणाकडे दुर्लक्ष केले याचा परिणाम चीनबरोबरच्या युद्धात तर झालाच, परंतु संरक्षण युद्धसामग्रीबद्दलही आपण विदेशावर अवलंबून आहोत. याचे चार विपरीत परिणाम होतात. जिथे उत्पादन होते, तिथेच पुढचे संशोधन सुरू राहिल्याने ते देश संशोधनात नेहमीच अग्रभागी राहतात. दुसरा परिणाम म्हणजे जो व्यवसाय भारतातील व्यावसायिकांना मिळून आपल्या देशात संपत्ती व रोजगार मिळायला हवा, तो विदेशात जातो. तिसरा परिणाम म्हणजे संरक्षण उत्पादनाची निर्यात करून विदेशी चलन मिळविण्यापासून वंचित राहतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा युद्ध सुरू झाल्यावर जर जिथून आयात केली तो देश दुरुस्तीसाठी आवश्यक साधनसामग्री द्यायला तयार नसेल, तर खरेदी केलेली सामग्री निरुपयोगी ठरते. नवे युद्ध हे केवळ मानवी लष्करी बळाच्याच आधारावर नव्हे, तर प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे लढले जाणार आहे. या सर्व घटकांचा विचार न झाल्याने भारतात संरक्षण उत्पादकांचे खाजगी क्षेत्र उभेच राहिले नाही. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात ज्या शासकीय संस्था निर्माण केल्या गेल्या, त्या नोकरशाही संस्कृतीने ग्रस्त झाल्या. विद्यमान सरकार सत्तेवर आल्यानंतर या धोरणात स्वागतार्ह बदल होत आहे. आपण आंतरिक्ष क्षेत्रात स्वबळावर उभे राहू शकतो, तर इतर लष्करी साहित्य का निर्माण करू शकणार नाही?

 

ज्ञानसंस्कृती संवर्धन

 

सावरकरांचा चौथा महत्त्वाचा मुद्दा स्वभाषेचा व ज्ञानप्रसाराचा आहे. जर समाजातील तळागाळात ज्ञानसंस्कृती रुजायची असेल, तर जगातील अधिकात अधिक ज्ञान स्वभाषेत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. आठशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून संस्कृतमध्ये लिहिलेल्या तत्त्वज्ञानाचा बहुजनांना समजेल अशा भाषेत परिचय करून दिला. आता विज्ञानेश्वरीच्या रूपाने तसाच परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. ज्ञानाची उपासना करणारा वर्ग व प्रत्यक्ष कामात त्याचा उपयोग करणारा वर्ग यांची झालेली फारकत हे भारताच्या अवनतीचे एक कारण सांगितले जाते. उच्च शिक्षण घेणाऱ्या बहुसंख्य वर्गाचे डोळे विदेशाकडे लागलेले असतात. आधुनिक वैज्ञानिक संस्कृतीपासून वंचित राहिल्याने समाजातील मोठ्या गटाचे भावविश्व विस्तारू शकत नाही. ते जोपर्यंत विस्तारणार नाही, तोवर भारताच्या विकास प्रक्रियेचा तो अंगभूत घटक बनू शकत नाही. त्या काळात इंग्लिश शब्दांना मराठीतही तितकेच समर्थ प्रतिशब्द मिळू शकतात, हे सावरकरांनी सिद्ध केले. आजचे आव्हान त्यापेक्षा अधिक व्यापक आहे. केवळ प्रतिशब्द देऊनच नव्हे, तर एकविसाव्या शतकातील भावविश्वाशी लोकांना जोडायचे आहे. मोबाइलच्या व सोशल मीडियाच्या रूपाने नवे संपर्क माध्यम लोकापर्यंत पोहोचले आहे. पण त्यातून कोणत्या प्रकारची माहिती पोहोचविली गेली पाहिजे याचा विचार केला पाहिजे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन तयार व्हावा, यासाठी सकारात्मक प्रयत्न करणारे अनेक समाजगट आहेत. त्यांच्या सहयोगाने स्वभाषेतून जागतिक स्तरावरील माहिती मिळावी, यासाठी ज्ञानप्रसाराची चळवळ सुरू करण्याची गरज आहे, तरच विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यशाखा व कलाक्षेत्र यात जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींची माहिती सर्वसामान्यांना मिळेल व त्या आधारे आगामी वैश्विक स्पर्धेत जिंकण्यासाठी तो सक्षम होईल.

 

मातृभूमीशी जैविक नाते

 

आपल्या देशांतील प्रमुख प्रश्न हा भ्रष्ट सार्वजनिक आचरणाचा आहे. आजवर देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात कितीतरी कायदे झाले, आंदोलने झाली, पण परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडतच गेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे भ्रष्टाचाराच्या उगमस्थानाचा जोवर विचार केला जात नाही, तोवर या बाह्य उपाययोजना कधीही यशस्वी होत नाहीत. सामाजिक कार्यामागची प्रेरणा कोणती असते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ती स्वार्थाची, काहीतरी मिळविण्याची असेल, तर त्यात अंगभूतच भ्रष्टाचार असतो. जर त्यामागची घटनात्मक कराराची असेल, तर करारात आपला अधिक फायदा झाला पाहिजे असा प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. परंतु ही प्रेरणा जैविक असेल, तर सार्वजनिक कामाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलतो. आपल्यापाशी जे सर्वोत्कृष्ट आहे, ते अपेक्षारहित भावनेने देण्यातच आनंद असतो. सावरकरांच्या काव्यात तर याची अनेक उदाहरणे आढळतात.

 

‘अशीच सर्व फुले फुलावी ! श्रीरामचरणी अर्पण व्हावी !

काही सार्थकता घडावी ! ह्या नश्वर देहाची

अमर होय ती वंशलता ! निर्वंश जिचा देशाकरिता

दिगंती. पसरे सुगंधिता ! या नश्वर देहाची?’

या वहिनीला सांत्वनपर पत्रातील ओळी असोत किंवा

‘हे मातृभूमी ! तुजला मन वाहियेले

वक्तृत्व वाग्वैभवही तुज अर्पियेले

 

हे त्यांचे मृत्युपत्रातील आत्मकथन असो, मातृभूमीशी आपले जैविक नाते आहे, त्या कर्तव्यापोटी आपण तिची सेवा करीत आहोत हा त्यामागचा त्यांचा भाव आहे. असा भाव तेव्हाच येतो, जेव्हा तो आपल्या देशाला परब्रह्माच्या स्वरूपात पाहतो. तिची भक्ती हाच मुक्तीचा व मोक्ष मिळविण्याचा मार्ग आहे अशी भावना दृढ होते. ‘जयोस्तुते’ हे स्तोत्र सावरकरांनी लिहिले, तेव्हा देश पारतंत्र्यात होता. त्यामुळे त्यातील ही ओळ कालसापेक्ष आहे -

 

‘तुजसाठी मरण ते जनन। तुजवीण जनन ते मरण’

ती ओळ आजच्या संदर्भात बदलून अशी म्हणता येईल -

‘तुझसाठी जनन ते नमन। दिनरात घडो तव स्मरण’

 

समाजाची सामूहिक नीतिमत्ता ही सामाजिक नेतृत्वाच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते. जर सामाजिक नेतृत्वाची नैतिकता उच्च दर्जाची असेल, तर त्याचा परिणाम आपोआपच सर्व क्षेत्रांवर होतो. सावरकरांच्या संकल्पनेत जे भारतीय स्वातंत्र्याचे राज्ञीपद आहे, त्याचा आधार नैतिकाधिष्ठित कर्तृत्वाचा आहे. ही नीतिमत्ता उत्कट देशभक्तीच्या भावनेतून येते. परंतु देशभक्तीची भावना लादता येत नाही. ऐतिहासिक परंपरांचा डोळस व चिकित्सक अभ्यास व त्यातून निर्माण होणारा आत्मीय भावच व्यक्तीचे समाजाशी आत्मीय नाते प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे आपल्या इतिहासातील कर्तृत्व संचिताचा वसा पुढच्या पिढीकडे सोपविणे व मागच्या पिढीने केलेल्या चुका टाळणे यासाठी या दृष्टीकोनातून विचार करणाऱ्या चिकित्सक व आंतरशाखीय इतिहास संशोधकांना एका व्यासपीठावर आणण्याच्या प्रयत्नांची गरज आहे. त्यातूनच आपल्या परंपरेतील मानवकेंद्री राष्ट्रभक्तीचा साक्षात्कार होऊ शकेल.

 

सावरकरप्रणीत नव पंचसूत्रे

 

एकविसाव्या शतकात आपल्या देशासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी व सावरकरांच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करायचे, याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी वरील पंचसूत्रीची अंमलबजावणी करावी लागेल. जातवादावर आधारित संघर्षाचे निर्मूलन, धार्मिक साम्राज्यवादी प्रवृत्तींना आवर, राष्ट्रीय सुरक्षेसाठी संरक्षण उत्पादनातील स्वावलंबन व स्वयंपूर्णता, वैज्ञानिक ज्ञानसंस्कृतीचा प्रसार व सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वासाठी व कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय भूमिकेतून चिकित्सक व आंतरशाखीय इतिहास संशोधनातून निर्माण झालेल्या इतिहासाची ओळख या पंचसूत्रीवर काम करावे लागेल. स्वत: सावरकरही शब्दप्रामाण्यापेक्षा जे उपयुक्त तेच स्वीकारार्ह या मताचे होते. आपल्या इतिहासदत्त मूल्यसंचितांवर आत्मविश्वासाने उभा असलेला अशा प्रकारचा समृद्ध, कर्तृत्वसंपन्न व नीतिसंपन्न भारत निर्माण करणे, ज्याची प्रत्येक व्यक्ती या उदात्त संस्कृतीची वाहक म्हणून काम करेल, असे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. असा भारतच आगामी काळात प्रत्येक देशांतील सकारात्मक राष्ट्रवादावर आधारित सर्जनतेला प्रोत्साहन देऊन विश्वबंधुत्वाचे नवे मिथक तयार करेल.

 

हेगेल व सावरकर

 

पण हा रस्ता सोपा नाही. ते ध्येय गाठेपर्यंत आंतरिक व बाह्य संघर्षावर मात करूनच ते करावे लागेल. जर्मन तत्त्वज्ञ हेगेलने चैतन्यवादी आध्यात्मिक राष्ट्रवादाची जी भूमिक मांडली आहे, त्याचे बहारदार शब्दात डॉ. ग.मा. जोशी यांनी आपल्या ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास’च्या तिसऱ्या खंडात वर्णन केले आहे. त्याचा सावरकरांच्या राष्ट्रवादाला लागू पडेल असा संपादित अंश असा, अमेरिकन तत्त्वज्ञ राइस यांनी हेगेलच्या भूमिकेचे जे वर्णन केले आहे, ते त्याचा संदर्भ देऊन जोशी लिहितात, ‘राइस म्हणतो की, हेगेलला जो आत्मा आणि जे आध्यात्मिक जीवन अभिप्रेत आहे, ते शांत, क्रियाविहीन, निश्चेष्ट, मरगळलेले स्थिरावलेले शून्यवत जीवन नाही, तर ते चैतन्याने सळसळणारे, उचंबळणारे, विरोध आणि व्याघांताना न टाळता त्यांचे आव्हान स्वीकारून त्यांच्याशी मुकाबला करून आणि त्यांचा पराभव करून त्यांच्यावर विजय मिळवून स्वतःचे सामर्थ्य आणि ओज प्रकट करणारे, वर्धिष्णू, जयिष्णू, सतत क्रियाशील रसरशीत जीवन आहे. एकाद्या महत्त्वाकांक्षी लढवय्या पराक्रमी जयिष्णू वीराप्रमाणे आहे. अस्वस्थतेला, विरोधांना, अडचणींना, संकटांना, आपत्तींना अपूर्णतेला भीक न घालणारे, व्यथित न होता त्यांच्यावर स्वार होऊन त्यांना पादाक्रांत करून शौर्याने त्यांचा पराभव करून त्यांना शरण आणून त्यांच्या खांद्यावर स्वतः आरूढ होऊन, हसत स्वतःच्या विजयपताका मिरविणाऱ्या पराक्रमी, साहसी, निर्भय लढवय्या शूरासारखे आहे. हेगेलचे परमसत् किंवा अंतिम सत्ता ही ब्रह्मासारखी किंवा निर्वाणासारखी निवृत्तिपर, शांतिप्रिय, क्रियाहीन, परिवर्तनाकडे आणि गतिमानतेकडे तिरस्काराने पाहणारी, संघर्षाकडे तुच्छतेने पाहणारी, आत्मतुुष्ट, उदासीन, आत्मविनिवर्तित, जगन्विमुख, पलायनशाली नसून ती पराक्रमात आनंद मानणारी, युद्धाला आवाहन देऊन दिमाखाने शस्त्र परजणारी, जगातील दुरिताचा, तिमिराचा, अमंगल प्रवृत्तींचा संहार करून स्वतःचे प्रभुत्व सिद्ध करण्यास उत्सुक असणारी, संकटांना, आपत्तींना आणि धोक्यांना न डगमगणारी, उलट जगातील अपूर्णता, वैगुण्ये, न्यूनता, दुरिते, अमंगलता, कुरूपता यांना पाहून स्फुरण पावणारी आणि पापांचा संहार करून स्वतःचे अंतस्थ सुप्त सामर्थ्य प्रकट करून स्वतःची अस्मिता सिद्ध करणारी आणि अशा रितीने आत्मगौरव प्रस्थापित करणारा जणू एखादी रणरागिणी कालीदेवता आहे. तिला अनेकांचे, भेदांचे, विरोधांचे आणि व्याघातांचे भय वाटत नाही; उलट त्यांच्यावर आपले स्वामित्व आणि प्रभुत्व प्रस्थापित करण्यास तिला प्रचंड स्फुरण चढते. ती संकटांना आणि आपत्तींना डरत नाही; तर त्यांना आवाहन देते, आणि त्यांना शरण आणण्यात धन्यता अनुभवते. रॉइस म्हणतो की हेगेलची परमसत्ता एक शूर, पराक्रमी योद्धा आहे. मानवजातीच्या आध्यात्मिक जीवनाच्या युगायुगांची धूळ आणि रक्त यांच्या खुणा त्यांच्या अंगावर आहेत. तो जखमांनी रक्तबंबाळ झालेला, परंतु विजयाने धुंद होऊन आपल्यासमोर येतो. ज्याने सर्व विरोधांना आपल्या शौर्याने जिंकले आहे आणि जो आपल्या सर्वव्यापकत्वाने मानवाची निष्ठा, सहिष्णुता आणि दुर्दम्य विजिगीषा यांची संपन्नता उपभोगत असतो, आणि जो सर्व लहान मोठ्या, क्षुद्र उदात्त गोष्टींना व्यापून राहून त्यांचे स्वतःमध्ये ऐक्य घडवितो, आणि त्या सर्वांमधून स्वतःची अभिव्यक्ती करतो, असा ईश्वर आध्यात्मिक जाणिवेची समग्रता होऊन राहतो.- अशी हेगेलची अंतिम सत्ता आहे. या जगातील प्रश्न अडचणी, संकटे ही मिथ्या न मानता ती खरी मानून त्यातून मानवाची यात्रा पुरुषार्थी आणि पराक्रमी करतो. संघर्षावर मात करून आणि त्यांच्यावर स्वामित्व मिळविण्याने मानवी आत्मे सतत बलवान आणि व्यापक होत असतात. अंतिम परमसत्ता दृश्य जगातही वास करीत असते आणि सर्व विरोधांमध्ये स्वतः उपस्थित राहून चांगले-वाईट, मंगल-अमंगल, शिव-दुरित अशी परस्परविरोधी द्वंद्वे निर्माण करून त्यांच्यामधून स्वतःचे स्वरूप, सामर्थ्य व्यक्त करीत असते. परम-आत्मा किंवा परम-सत्ता विश्वातील सर्व गोष्टी आणि शक्ती यांच्यापेक्षा अनंत पटींनी बलवान आणि सर्वसामर्थ्यसंपन्न असते, हे दाखविण्यात आणि आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्यात परमानंद, धन्यता आणि समाधान मिळत असते.’

 

परंतु हेगेल व सावरकर यांच्यात एक मूलभूत फरक असा की हेगेल हा निरंतर संघर्षवादी आहे, मात्र सावरकर तसे नाहीत. संघर्ष हे मानवी आकलनशक्तीच्या मर्यादेतून तयार होतात, असे ते मानतात. आज त्या मर्यादा गृहीत धरूनच वागावे लागेल, हे वास्तवही ते मान्य करतात. कधी ना कधी माणूस त्या मर्यादेतून बाहेर पडेल याचा त्यांना विश्वास आहे. बौद्ध धर्माच्या उदात्त तत्त्वज्ञानाचा गौरव करताना ‘हिंदुत्व’ या ग्रंथात सावरकर म्हणतात, ‘‘खुद्द बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या भक्तांच्या मनात, अखिल जगात जो पवित्रतम संघ आहे, त्या बौद्ध संघाबद्दल जो आदर आणि जे प्रेम असेल, तेच प्रेम आणि तोच आदर बाळगणाऱ्या बौद्ध धर्माचा मी एक चाहता आहे.’’ सावरकरांचा गौतम बुद्धांविषयी व बौद्ध धर्माविषयी असलेला आदर आणि प्रेम पाहता त्यांनी मग त्या धर्माची दीक्षा का घेतली नाही? असा प्रश्न निर्माण होतो. त्याविषयी सावरकर म्हणतात, ‘‘बौद्ध धर्माची दीक्षा मी घेतली नाही याचे कारण, हा संघ माझ्या योग्यतेचा नाही असे नव्हे, तर मी त्या संघाच्या पवित्र मंदिरात पदार्पण करण्याला पात्र नाही हे होय.’’ शेवटी भगवान बुद्धांची क्षमा मागताना सावरकर म्हणतात, ‘‘हे तथागत! सर्व मनुष्यजातीतला मी हीन-दीन, केवळ माझी नितांत रिक्तता व माझे नितांत अज्ञान यांचाच आहेर घेऊन तुझ्याकडे येतो. जरी आपल्या बोधाचा सारांश मला आकलन करता येत नाही, असे मला वाटते, तरी मला पूर्ण खात्री आहे की, ते तसे होणेच स्वाभाविक आहे. कारण आपला उपदेश हा देवलोकीच्या वाणीतून निसृत झाला आहे; परंतु माझी श्रावणेंद्रिये आणि माझी आकलनशक्ती ही ह्या ऐहिक प्रत्यक्ष प्रमाणमय जगाचा शब्दघोष ऐकायला शिकली आहे! ह्या जगाला आपल्या भरारीबरोबर चालता येत नाही व आपल्या देदीप्यमान निशाणाकडे दृष्टी लावता-लावताच ती अंधुक होऊन दिपून जाते!’’ याचा अर्थ बुद्धाच्या संघात प्रवेश करण्यास सावरकर सक्षम नाहीत असा नसून ते वास्तववादी असल्याने आपण सीमित आकलनशक्ती असलेल्या जगात आहोत, हे ते विसरू शकत नाहीत. वेगळ्या शब्दात, ओबामा यांच्या आधी उल्लेख केलेल्या भाषणात त्यांनी अमेरिकन अध्यक्ष केनेडी यांच्या उद्गारांचा उल्लेख केला आहे. न्याय्य युद्धाच्या अपरिहार्यतेबद्दल बोलताना केनेडी म्हणतात, ‘‘आपण अधिक व्यवहार्य मार्गावर आपले लक्ष केंद्रित करू या. मानवी मनामध्ये एकदम क्रांती होऊन शांतता प्रस्थापित होईल अशी अपेक्षा न करता मानवनिर्मित संस्था उत्क्रांत होत जाईल अशी अपेक्षा करू या.’’

 

कधी ना कधी जग या मर्यादेतून बाहेर पडेल यावर सावरकरांचाही विश्वास आहे. म्हणूनच ‘हिंदुत्व’ या आपल्या प्रबंधाच्या अखेरीस ते भगवान बुद्धांना उद्देशून म्हणतात, ‘‘भगवान, आपणही आमचेच आहात आणि ज्याप्रमाणे आपले शब्द हे आमच्या राष्ट्रीय आत्म्याचेच बोल होत, त्याप्रमाणे आपल्याला दिसणारी दृश्ये ही आमच्या जातीचीच सुखस्वप्ने आहेत आणि जर कधी सत्याच्या तत्त्वाचा विजय होऊन सर्व मानवजात ते शिरोधार्ह करू लागली, तर हे भगवान, आपणाला असे आढळून येईल की ज्या भूमीने आपल्याला पाळण्यात खेळविले, ज्या जातीने आपले लालनपालन केले, तीच भूमी आणि तीच जाती, ह्या तत्त्वाचा जगभर जयजयकार होण्यास, प्रामुख्याने कारण झाली आहे.’’ आज, भारतीय संस्कृतीचे अपत्य असलेल्या योगाच्या लोकप्रियतेने जगात एका अत्यंत सीमित क्षेत्रात का होईना, विश्वबंधुत्वाचे वातावरण तयार केले आहेे, ते याच प्रक्रियेचा भाग आहे. युरोपीय प्रबोधनकाळात जी द्वंद्वात्मक मीमांसा झाली, त्याच्या पलीकडे जाऊन एकात्म दृष्टी देण्याचे काम योगातून निर्माण झालेला दृष्टीकोन करतो. आज योग हा केवळ व्यक्तिगत, शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक उन्नतीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. त्याचे जेव्हा व्यवस्थात्मक उपयोजन होईल, तेव्हा नवा मार्ग दिसेल. भारताचे हे भाग्य आहे की भारतीय प्रबोधनकाळात वीरत्व व संतत्व या दोन परंपरांचे महान प्रतिनिधी येथे उत्पन्न झाले. पहिला महापुरुष वास्तवाकडे पाहत व्यवहार सांगत होता, तर दुसरा अवघ्या मानवजातीला एक स्वप्न देत होता. आजचा व्यवहार सांभाळला गेला, तर उद्याचे स्वप्न साकार होण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्यामुळे आजच्या सत्तास्पर्धेत आपले राष्ट्र टिकवायचे असेल व जगापुढे आदर्श म्हणून उभे करायचे असेल, तर सावरकरांच्या विचारांवर आधारित कृती कार्यक्रम राबविण्याशिवाय पर्याय नाही. अशा उदात्त व उन्नत मूल्यसंचितांवर उभे राहिलेले समर्थ राष्ट्रच म. गांधींच्या स्वप्नातील शांततामय सहजीवनाच्या विश्वबंधुत्वाचा आधार बनेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@