चेन्नई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर वादग्रस्त विधानाप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत सापडला असतानाच अभिनेता कमल हसन देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये पाकव्याप्त काश्मीरचा 'स्वतंत्र काश्मीर' असा उल्लेख केला. तर काश्मीरमध्ये जाऊन तेथील स्थानिकांचे जनमत का घेत नाहीत? असा प्रश्नही त्याने विचारला. यावरून कमल हसन सोशल मीडियावर ट्रोल झाला असून त्याच्याविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
कमल हसन मक्कल निधी मैय्यम या राजकीय पक्षाचा प्रमुख आहे. अनेक वादग्रस्त विधान करून तो सतत चर्चेत असतो. असेच एक वादग्रस्त विधान त्याने रविवारच्या एका मुलाखतीमध्ये केले. तो म्हणाला, "जनमत घेतल्यानंतर काश्मीरी लोक भारतासोबत येऊ इच्छितात, पाकिस्तानसोबत जाऊ इच्छितात की स्वतंत्र देश म्हणून राहू इच्छितात हे स्पष्ट होईल." काश्मीर प्रश्नाला भारत-पाकचे नेतेच जबाबदार असल्याचेही तो म्हणाला. यानंतर त्याच्या विरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat