यवतमाळ : पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पुलवामा हल्ल्यातील दोषींना शिक्षा कधी, कशी, केव्हा, कोण आणि कोणत्या प्रकारे दिली जाईल हे आपले जवान ठरवतील. त्यामुळे धीर धरून आपल्या जवानांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. ते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जाहीर सभेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. यावेळी जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना गंभीर इशारा दिला. ते म्हणाले, ''पुलवामा हल्ल्यानंतर देशातील जनतेचा संताप मी समजू शकतो. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानही शहीद झाले आहेत. मी कालही सांगितले होते. आजही तेच सांगतोय, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशदवाद्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. तुम्ही धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आपले जवान ठरवतील."
यावेळी मोदींनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, फाळणीनंतर जन्माला आलेल्या देशात दहशतवादाला आश्रय दिला जातो. आज हा देश दिवाळखोर होण्याचा मार्गावर असून दहशतवादाचे दुसरे नाव बनला आहे." यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर इत्यादींची उपस्थिती होती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat