जम्मू-काश्मीर : पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट दिसून येत आहे. तर दुसरीकडे सुरक्षादलांनी आपली कारवाई सुरू केली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये धरपकड सुरु झाली असून या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरु आहे. काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली.
संशयितांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्याचा कट पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात रचण्यात आली. याच ठिकाणी २०१६ साली हिजबुलचा टॉप कमांडर बुरहान वानीचा खात्मा करण्यात आला होता. दरम्यान, या हल्ल्याचा कट जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने रचल्याची माहितीदेखील समोर येत आहे. कामरान हा पाकिस्तानचा रहिवासी असून दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल या भागात तो जैश-ए-मोहम्मदचे काम सांभाळतो. सध्या पोलीस कामरानच्या मागावर आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat