मुंबई : गुरुवारची रात्र ही देशाला हादरून टाकणारी होती. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४२ सीआरपीएफ जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत अनेक लोक रस्त्यावर उतरले. देशासह राज्यातही 'पाकिस्तान मुर्दाबाद'चे नारे लावत पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. काही ठिकाणी पुतळे जाळण्यात आले तर काहीठिकाणी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुंबई, ठाणे तसेच इतर उपनगरांमध्ये नागरिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत 'पाकिस्तान मुर्दाबाद'चे नारे लगावले. मुंबईत भेंडी बाजार येथे पुलवामा आत्मघातकी हल्ल्याचा निषेध करत मुस्लिम समाजातील लोकांनी दुकानं बंद ठेऊन निदर्शने केली. हल्ल्यात शहिदांचा बलिदान व्यर्थ न जाता, जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटन जैश-ए-मोहम्मद विरोधात त्वरित कारवाई केली पहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पुलवामा येथील आत्मघातकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना मुंबईकरांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध केला. पुणे, धुळे, नागपूर, जळगावसह ठिकठिकाणी या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. काही ठिकाणी जैश-ए-मोहंमद संघटनेच्या प्रतिकात्मक पुतळ्याच दहन करण्यात आले. जळगावमधील अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. यावेळी छोट्या जवानांनी मानवी साखळीने 'HATE' हा शब्द तयार करून तीव्र निषेध व्यक्त केला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/