जीवनप्रवासाची यशोगाथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019
Total Views |


 


सुमारे १५० वर्षांपूर्वी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार व प्रचार सुरू झाला होता, त्या काळात १८व्या शतकात काहीतरी वेगळे करण्याच्या वृत्तीची माणसे होती, अशा या काळात गोपाळ विनायक जोशी हे शिक्षणाच्या ध्येयाने पछाडलेले होते. त्यांनी आनंदी या त्यांच्या पत्नीला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. इतकेच नाही, तर त्यांनी वैद्यकीय अभ्यास पूर्ण करण्यासाठी तिला अमेरिकेला पाठवले आणि आनंदीबाई गोपाळराव जोशी यांनीसुद्धा आपल्या हिंमतीने, जिद्दीने तो अभ्यास पूर्ण केला. गोपाळराव यांच्या सोबतीने आनंदीबाई फक्त शिकल्याच नाहीत, तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. त्यांच्या दोघांच्या नातेसंबंधावर असलेला सहयोगाचा प्रवास आनंदी गोपाळमध्ये सादर केला आहे.

 

‘झी स्टुडिओज’, ‘नम: पिक्चर्स’ व ‘फ्रेश लाईम फिल्म्स प्रॉडक्शन’ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. निर्माते ‘झी स्टुडिओज’चे मंगेश कुलकर्णी, किशोर अरोरा, शारीनमंत्री केडिया, अरुनवा जॉय सेनगुप्ता, आकाश चावला हे आहेत. दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले असून, पटकथा करण श्रीकांत शर्मा, संवाद इरावती कर्णिक, छायाचित्रण आकाश अग्रवाल यांचे आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना संगीत ऋषिकेश दातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी यांनी दिले आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेत ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद हे आहेत. सोबत अंकिता गोस्वामी, गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, जयंत सावरकर, अथर्व फडणीस हे कलाकार आहेत.

 

‘आनंदी गोपाळ’ हा एक चरित्रपट आहे. दोघांच्या जीवनाचा प्रवास यामध्ये प्रभावीपणे मांडला आहे. हा प्रवास दाखवताना त्यांचे नातेसंबंध कसे होते, समाजाचा विरोध असूनसुद्धा नेटाने आणि हिंमतीने त्यांनी आपले योजलेले कार्य पूर्ण केले. गोपाळराव यांचा स्वभाव हा हेकेखोर, विक्षिप्त, हट्टी, रागीट असल्याने आनंदीबाई यांना खूप सोसावे लागले. त्या काळात मुलींनी शिकावे, हे समाजाने मान्य केले नव्हते. गोपाळराव हे टपाल खात्यात नोकरी करायचे. इंग्रजी भाषेशी त्यांचा संबंध आला. इंग्रजीचे ज्ञान आपल्याकडील लोकांनी घ्यायला हवे, अशी त्यांची तळमळ होती. आपल्या बायकोने शिकावे, असे त्यांना वाटत होते. पहिल्या बायकोला त्यांनी शिकविण्याचा प्रयत्न केला पण, तिचे आयुष्य कमी होते. गोपाळरावांनी दुसरे लग्न करताना बायकोने शिकले पाहिजे, ही अट घातली होती. आनंदीबाईला तिच्या वडिलांनी शिकवलं होते आणि आता नवरासुद्धा शिकवणार होता. त्यांच्या प्रयत्नाने आनंदीबाईला शिक्षणाची गोडी लागली आणि त्या डॉक्टर झाल्या.

 

दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी त्या काळाचे चित्रण खूप छान केले आहे. तो काळ दाखविण्यासाठी केलेली मेहनत जाणवते. आनंदीबाईच्या आजूबाजूची माणसे, तिच्या मैत्रिणी हे सारे त्यांनी प्रभावीपणे दाखवले आहे. त्याकाळी कोणते खेळ खेळले जात असतील, त्यांचे यथार्थ चित्रण त्यांनी केले आहे. अभ्यास हासुद्धा खेळ असायचा, त्यातूनच तिला गोडी निर्माण झाली. त्यातूनच आनंदीबाईची झालेली प्रगती दाखवली आहे. अभ्यासाबरोबर तिच्या मनात आणि गोपाळराव यांच्या मनात काय घडत होते इ. भावनिक प्रसंग आणि त्यांचा मानसिक जडणघडणीचा प्रवास प्रामुख्याने दाखवला आहे. आनंदीबाई-गोपाळराव यांच्या आयुष्यात जे जे टप्पे येत गेले, त्याचा बारकाईने विचार करून ते सादर केले आहेत.

 

आनंदीबाईची भूमिका भाग्यश्री मिलिंद हिने प्रभावीपणे सादर केली आहे. त्यांची अभ्यासाविषयी असलेली ओढ आणि खेळण्याचे वय यामधील फरक छान व्यक्त केला आहे. गोपाळरावांची भूमिका ललित प्रभाकर यांनी समर्थपणे सादर केली आहे, गोपाळरावांचा विक्षिप्तपणा, तिरसटपणा, रागीट वृत्ती हे दाखवताना त्यांचे शिक्षणाविषयी असलेले प्रेम त्यांनी उत्तमपणे साकारले आहे. समाजविरोधात असतानाचे प्रसंग आणि त्यावेळची मानसिक स्थिती त्यांनी छान व्यक्त केली आहे. चित्रपटाची गतिमानता करण श्रीकांत शर्मा यांनी लिहिलेल्या पटकथेने साध्य केली असून, सहज-सुलभ-संवाद-लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. चित्रपटाचे संगीत हे ऋषिकेश दातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी यांनी दिलेले असून ती एक जमेची बाजू आहे. एकंदरीत चित्रपट हा मनोवेधक झाला आहे.

 

- दीनानाथ घारपुरे

9930112997

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@