अजमेर : काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या मनात खोलवर रूजलेला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याप्रतीचा द्वेष पुन्हा एकदा बाहेर आला. सावरकरांनी ब्रिटीशांची एकामागोमाग एक अशी ९ वेळा माफी मागितली, असा दावा राहुल गांधी यांनी गुरूवारी राजस्थानातील अजमेर येथे केला. काही दिवसांपूर्वीच राहुल यांनी सावरकरांवर जाहीर व्यासपीठावरून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले होते.
अजमेर येथे आयोजित काँग्रेस सेवा दलाच्या अधिवेशनात राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले की, देशात सध्या सुरू असलेली लढाई ही द्वेषाची आहे. एका बाजूला रा. स्व. संघ, भाजपची द्वेषाची विचारधारा आहे तर दुसरीकडे काँग्रेसची प्रेमाची विचारधारा आहे. त्यांच्या द्वेषभावनेला आपण द्वेषाने उत्तर द्यायचे नाही, असे राहुल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र याच भाषणात स्वा. सावरकरांविषयी राहुल यांनी त्यांच्या मनात असलेला द्वेषभाव पुन्हा एकदा उघड केला. सावरकरांनी एकामागोमाग एक ९ वेळा ब्रिटीशांची माफी मागितल्याचा दावा राहुल यांनी केला.
काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे आल्यापासून स्वा. सावरकरांवर आरोप करून त्यांची बदनामी करण्याची एकही संधी राहुल यांनी सोडलेली नाही. त्यापूर्वी एकदा थेट लोकसभेतही सावरकरांविषयी बोलताना राहुल यांचा तोल ढासळला होता. गेल्या काही दिवसांपूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार यांच्यावर टीका करत असताना राहुल थेट सावरकरांवर पोहोचले व हातात कागद-पेन घेऊन सावरकर ब्रिटीशांची माफी मागत आहेत, असा प्रसंग नक्कल करत राहुल यांनी करून दाखवला. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने भारतीय इतिहासातील एका थोर व्यक्तिमत्वावर अशाप्रकारे खालच्या स्तरावर जाऊन चिखलफेक केल्याने देशभरातून राहुल गांधींवर टीका झाली होती. मात्र, गुरूवारी पुन्हा एकदा राहुल यांनी सावरकरद्वेषाची गरळ ओकली.
डॉ. आंबेडकर, आझाद काँग्रेसचे! राहुल यांचे अगाध इतिहासज्ञान
स्वा. सावरकरांवर टीका करत असतानाच खा. राहुल गांधी यांनी आपल्या भारतीय इतिहासाबद्दलच्या अगाध ज्ञानाचे दर्शनही घडवले. काँग्रेस सेवा दलावर ब्रिटिशांनी १९२७ साली बंदी आणली, असा दावा करतानाच सेवा दलाच्या कोणाही नेत्याने ब्रिटीशांची माफी मागितली नाही, असे ते म्हणाले. मात्र यावेळी बोलताना राहुल म्हणाले की, “आपल्या नेत्यांची यादी काढा. गांधी, पटेल, आंबेडकर, आझाद, सुभाषचंद्र बोस इ. सर्वांनी १० ते १५ वर्षे तुरूंगवास भोगला आहे. मात्र कोणी ब्रिटीशांची माफी मागितली नाही.” अशारितीने काँग्रेस सेवादलाचा इतिहास सांगत असतानाच राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना थेट काँग्रेस आणि सेवादलाचे नेते म्हणून संबोधले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat