अजमेर : काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या मनात असलेला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतीचा राग एव्हाना साऱ्या देशाला ठाऊक झाला आहे. मात्र, सावरकरांवर दोषारोप करता करता गुरूवारी राहुल गांधी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाकडे वळले आणि बोलता बोलता थेट भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी धक्कादायक वक्तव्य करून बसले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चंद्रशेखर आझाद हे काँग्रेसचे नेते होते, असा शोध राहुल यांनी लावला. निमित्त झाले ते राजस्थानातील अजमेर येथे आयोजित काँग्रेस सेवादलाच्या अधिवेशनाचे. या अधिवेशनात बोलताना राहुल यांनी सेवादलाच्या इतिहासावर भाष्य केले. ते म्हणाले की, “१९२७ मध्ये काँग्रेस सेवादलावर ब्रिटिशांनी १९२७ साली बंदी आणली. परंतु, सेवादलाच्या कोणाही नेत्याने ब्रिटीशांची माफी मागितली नाही. आपल्या नेत्यांची यादी काढा. गांधी, पटेल, आंबेडकर, आझाद, सुभाषचंद्र बोस इ. सर्वांनी १० ते १५ वर्षे तुरूंगवास भोगला. मात्र कोणी ब्रिटीशांची माफी मागितली नाही.” अशारितीने राहुल यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आणि क्रांतिकारक आझाद यांना काँग्रेस आणि सेवादलाचे नेते म्हणून संबोधले.
‘सेवादल-काँग्रेसच्या कोणाही नेत्याने ब्रिटीशांची माफी मागितली नाही. त्यांनी त्यासाठी तुरूंगवास भोगला. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची ९ वेळा माफी मागितली.’ अशा आशयाचा मुद्दा मांडत राहुल गांधी यांना नेहमीप्रमाणे सावरकरांवर चिखलफेक करायची होती. ती त्यांनी केलीदेखील. मात्र त्याचवेळी आपल्या इतिहासाच्या अगाध ज्ञानाचेही त्यांनी प्रदर्शन घडवले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/