मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने येत्या माघ पौर्णिमेला ‘यक्षरात्र’ या काव्यसुरांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. पौर्णिमा महोत्सवानिमित्त निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि पानशेत-वरसगाव धरणाच्या कुशीत वसलेल्या एमटीडीसीच्या पानशेत रिसॉर्ट येथे ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांची ही काव्यमैफल रंगणार आहे. येत्या मंगळवारी म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत पानशेत रिसॉर्ट (ता. वेल्हा, जि. पुणे) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या उपक्रमाविषयी माहिती देताना एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले, पर्यटकांमध्ये साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी, थोर साहित्यिकांचा त्यांना सहवास लाभावा या उद्देशाने पौर्णिमा महोत्सवाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. एमटीडीसीच्या राज्यभरातील रिसॉर्टमध्ये दर पौर्णिमेच्या रात्री हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या पौर्णिमेला ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांना आमंत्रित करण्यात आले असून पर्यटक आणि साहित्य रसिकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या विविध भागात निसर्गरम्य पर्यटनस्थळी वसलेल्या एमटीडीसीच्या रिसॉर्टचा पर्यटकांना परिचय व्हावा हाही या उपक्रमाचा उद्देश आहे.
अरूणा ढेरे यांचे ‘काळोख आणि पाणी’सारखे महाभारत व लोकपरंपरांचा परस्पर अन्वय लावणारे पुस्तक, ‘कृष्ण किनारा’सारखे राधा, कुंती, द्रौपदी यांचे भावबंध उलगडणारे पुस्तक, महाव्दार किंवा मैत्रेयी यांसारख्या लघु कादंबऱ्या अशा विविध साहित्यकृतींमधील कविता, गीतकाव्याच्या मैफिलीचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. भारतीय कथा आणि लोकपरंपरांचा अद्भूत मिलाफ अनुभवण्याची ही संधी आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat