नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्तरावर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासह प्रतिदिन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गत भाजपने ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ ही आगळीवेगळी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
‘मेरा परिवार, भाजप परिवार’ अभियानाचा प्रारंभ करताना भाजप अध्यक्ष अमित शाह
चौकीदारावर प्रामाणिक लोकांचा पूर्ण विश्वास
कुरुक्षेत्र : देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची मोहीम वेगाने राबवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. “या चौकीदारावर प्रामाणिक लोकांचा पूर्ण विश्वास आहे, पण काही भ्रष्ट लोकांना मात्र या चौकीदारापासून समस्या आहेत,” अशी टीका त्यांनी नाव न घेता विरोधकांवर केली.
‘स्वच्छ भारत मोहिमें’तर्गत येत्या दि. २ ऑक्टोबरपासून स्वच्छता मोहीम सुरू केली जात असून, त्यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करण्यासाठी येथे ‘स्वच्छ शक्ती २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. “प्रामाणिक आणि पारदर्शी सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही २०१४ मध्ये मला मत दिले. आता सरकारने गरिबांचे हक्क हिरावणार्या मध्यस्थांना यंत्रणेतून उखडून बाहेर फेकलेआहे,” असे त्यांनी सांगितले. “देशातील प्रत्येक प्रामाणिक व्यक्ती या चौकीदारावर विश्वास ठेवते. मात्र, देशातील भ्रष्ट व्यक्तींना मोदीपासून समस्या आहेत. तपास यंत्रणा करीत असलेल्या तपासामुळे हरियाणातील काहीजण चिंतातूर झाले आहेत,” असे त्यांनी सांगितले. जमीन सौद्यातील अनियमिततेमुळे तपास यंत्रणा सध्या हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा आणि रॉबर्ट वडेरा यांच्या विरोधात तपास करीत असल्याकडे त्यांनी नाव न घेता लोकांचे लक्ष वेधले. विरोधकांच्या महाआघाडीवर टीकास्त्र सोडत त्यांनी ही एक ‘महा-मिलावट’ असल्याचे सांगितले. या महाआघाडीतील सर्वच चेहरे आपल्याला धमकी आणि शिवीगाळ करीत आहेत. मात्र, हा चौकीदार घाबरणार नाही किंवा त्यांच्या धमक्यांना भीकही घालणार नाही. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सफाई मोहीम अधिक वेगाने राबवू. या मोहिमेसाठी तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण देश मोदींच्याच पाठीशी
अहमदाबाद : “संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आगामी लोकसभा निवडणूक ही भारताला जागतिक महासत्ता करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडताना, “सत्तेच्या लोभापायी एकत्र येत असलेल्या विरोधकांनी त्यांचा नेता देशापुढे सादर करावा,” असे थेट आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मंगळवारी येथे दिले.
“केंद्रातील सत्तेवर डोळा ठेवून महाआघाडीत एकत्र येत असलेले सर्व पक्ष हे प्रादेशिक आहेत. या आघाडीतील नेत्यांना त्यांच्या राज्याबाहेर कुठलेही महत्त्व नाही. अशा नेत्यांचा सहभाग असलेल्या महाआघाडीला देशातील जनता कदापि मत देणार नाही,” असे अमित शाह यांनी ठामपणे सांगितले. “गुजरातमध्ये ‘मेरा परिवार भाजप परिवार’ मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी आणि देशभरातील गरीब जनता, शेतकरी व युवा वर्गाला शक्ती प्रदान करण्यासाठी भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताने निवडून आणायचे आहे,” असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. “अलीकडील काळात मी संपूर्ण देशाचा दौरा केला. देशातील जनता मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचेच मला दिसून आले. जनतेच्या डोळ्यात मोदींविषयी मला प्रेम आणि विश्वास दिसला आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मला, देशातील विविध राज्यांमध्ये स्थापन होत असलेल्या आघाड्यांविषयी विचारले. या आघाड्यांचा भाजपाच्या निवडणूक भवितव्यावर किंचितही परिणाम होणार नाही, हेच मी त्यांना सांगितले आहे. आगामी अनेक वर्षे विरोधकांचे सत्तेचे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही, पुन्हा एकदा केंद्रात भाजपाचेच सरकार येणार आहे,” असा दावा त्यांनी केला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/