नवी दिल्ली : गंगा नदीतील पाण्याचे शून्य प्रमाणात प्रदूषण करणारे वाराणसी हे पहिले शहर बनण्यास सज्ज झाले आहे. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत, गंगा नदीतील सांडपाण्याचे रुपांतर शुद्ध पाण्यात करण्याची वाराणसी शहराची क्षमता वाढून ४०० दशलक्ष लीटर प्रतिदिन (एमएलडी) पेक्षा जास्त होणार आहे. सध्या गंगा नदीतील सांडपाण्याच्या प्रवाहाची पूर्णपणे तपासणी सुरु आहे. २०२० पर्यंत गंगा शुद्ध करण्याच्या दिशेने उचललेले हे एक मोठे पाऊल असेल. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारने सुरु केलेल्या ‘नमामी गंगे’ या प्रकल्पाअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. वाराणसी घाटाच्या निरंतर स्वच्छतेमुळे तसेच गंगेतील पाण्याचे प्रदूषण तपासण्यासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांमुळे गंगा नदी पूर्वीपेक्षा स्वच्छ झाली आहे. असे वाराणसीमधील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. वाराणसीतील ८४ घाटांच्या स्वच्छतेसाठी सरकारने एका खासगी कंपनीला तीन वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. यासाठी दरवर्षी ५ कोटी रुपयांचा खर्च सरकारकडून करण्यात येत आहे.