बारामतीतील घड्याळाची टीकटीक...
अजितदादा विधानसभा सोडून लोकसभेसाठी लढण्याची शक्यता अगदीच धूसर वाटते. ते काय छगन भुजबळ किंवा सुनील तटकरे थोडीच आहेत! म्हणजे ते शिरूरमधून लढण्याबाबत वृत्त जरी विविध माध्यमे देत असली तरी, त्याकडे लक्ष देण्याची फारशी गरज वाटत नाही. लक्ष दिले पाहिजे ते त्यांच्या चिरंजीवांच्या संभाव्य राजकारणप्रवेशाचे. या युवराज्याभिषेकाची खमंग चर्चा गेल्या वर्षा-दीड वर्षापासून आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर कधी एकदा धाकले साहेब निवडणुकीत उतरतात, अशी आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणे. आधी स्वत: पवार साहेब, मग अजितदादा, मग सुप्रियाताई आणि आता पार्थ पवार... असे पवार घराण्यातील एकेक सदस्य राजकारणात उतरत असतील, तर त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत नव्या युवा नेतृत्वाला पुढे येण्यास बळ मिळू शकेल. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात काय होईल आणि काय नाही हा पवारांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यात आपण काही वक्तव्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न उरतो तो बारामतीचा. पवारसाहेबांचा अभेद्य किल्ला म्हणून बारामती राज्यात नाही, तर सार्या देशात ओळखली जाते. हा किल्ला इतका अभेद्य की राष्ट्रवादी काँग्रेसचा... माफ करा, पवार कुटुंबातील कोणी उमेदवार इथे अगदी तीन-सव्वातीन लाखांच्या मताधिक्याच्याही खाली आला तरी ती अप्रतिष्ठा मानली जाते. जिंकणं-हरण्याचा तर काही विषयच नाही. २०१४ मध्ये ताईंचं मताधिक्य ७० हजारांवर आलं, हा भाग अलहिदा. त्यावेळी म्हणे महादेव जानकर कमळ चिन्हावर लढते तर ताई पडल्या असत्या. पवार साहेब किंवा त्यांच्या कन्या निवडणुकीत पराभूत होणार आणि तेही बारामतीतून, हे साताजन्मात तरी शक्य आहे काय? त्यात सुप्रिया सुळे या काही साध्यासुध्या नेत्या नाहीत. ‘सेल्फी विथ खड्डा’ किंवा अशा अनेक मोहिमांतून त्यांनी केवढी ती जनजागृती केली. सुप्रियाताई स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या नेत्या आहेत. मात्र, यावेळची निवडणूकही ताईंना अवघड जाणार, असं काही नतद्रष्ट म्हणत आहेत. असो. आधी निवडणूक आणि उमेदवार्या जाहीर तर होऊ द्या. केवळ बातम्या किंवा वक्तव्यांवरून आपण लगेच स्वर्ग गाठण्यातही काही अर्थ नाही. कारण, पवार साहेबांनी काही सांगितलं, म्हणजे ते होईलच, याची शाश्वती खुद्द परमेश्वरही देऊ शकणार नाही!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/