ओवेसीला सत्य समजेल का?
वंचित शोषित आघाडीचे काय होणार देवाला माहिती. या आघाडीच्या नेत्यांच्या तोंडात सदान्कदा जातीपातीचे गुऱ्हाळ सुरू असते. या आघाडीचे नेते या आघाडीच्या व्यासपीठाचा उपयोग मनातली जातीय गटारगंगा ओकण्यासाठी करतात. याचे सर्वोत्तम उदाहरण असदुद्दीन ओवेसी आहेत. वंचित आघाडीच्या माध्यमातून आपले विघातक बोलणे आणि विचार पसरवण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे, अशा समजूतीमध्ये असदुद्दीन ओवेसी आहेत. त्यामुळेच नेहमी ‘मुसलमान खतरे में’ची बांग देणाऱ्या ओवेसीने यावेळी ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोत्तम सन्मानामध्येही विकृतपणे जात-धर्म शोधला आहे. ओवेसी म्हणाले की, “‘भारतरत्न’ हा तर ब्राह्मण आणि सवर्णांचा क्लब आहे. सांगा किती मुसलमानांना आणि दलितांना ‘भारतरत्न’ मिळाले आहे ते?” ओवेसी यांना खंत वाटणे साहजिकच आहे. कारण, त्यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन पार्टीचा इतिहास फुटिरतावादी रझाकारांच्या पाळामुळांशी जोडलेला आहे. असदुद्दीन यांचे वडील अब्दुल वहाद ओवेसी यांना १९५७ साली कुणी आणि कसे या पार्टीचे अध्यक्ष केले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आपल्या खानदानामध्ये कोणालाही ‘भारतरत्न’ मिळणार नाही, याची खात्री असदुद्दीन यांना आहेच. ओवेसींना माहिती आहे का की ‘भारतरत्न’ हा भारतीय नागरिकाचा सर्वोच्च सन्मान आहे. साहित्य, कला, संस्कृती जनसेवा वगैरे या ना त्या कारणासाठी आयुष्य वेचलेल्या भारतीयांना किंवा अभारतीयांनाही या पुरस्काराने गौरवले गेले आहे. खान अब्दुल गफार खान (पाकिस्तान)आणि नेल्सन मंडेला (आफ्रिका) झाकिर हुसेन, मदर तेरेसा, खान अब्दुल गफारखान, मौलाना अबुल कलाम आझाद, बिसमिल्ला खान या सर्व विभूतींना जातधर्म पाहून नाही, तर त्यांची सर्वोत्कृष्टता पाहून त्यांचा सन्मान केला होता. आता असदुद्दीन यांनी सवयीप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांचीही जातपात शोधावी. कारण, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या समन्वयानेच ‘भारतरत्न’ जाहीर केले जाते. पण ओवेसी यांची जातपडताळणीपर्यंत पोहोचणारच नाही. कारण, तसे केले तर या देशात सर्वांना आपापल्या कर्माने संधी मिळते हे सिद्ध होईल. हे सत्य ओवेसी आणि त्यांचे साथीदार समजून घेतील का?
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/