मुंबई : विविध प्रलंबित मागण्यासांठी बेस्ट संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. दरम्यान दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बेस्ट कर्मचारी, बेस्ट महाव्यवस्थापक आणि महापालिका नेते व समिती अध्यक्षांची बैठक आयुक्तांच्या दालनात झाली. या बैठकीला बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शंशाक राव यांनी आधी आक्षेप घेतला. मात्र, अखेर ते या बैठकीला उपस्थित राहिले, परंतु त्यात कोणताच तोडगा निघाला नसल्याची प्रतिक्रीया राव यांनी दिली.
यावर बोलताना शंशाक राव म्हणाले, की संप आम्ही केलेला आहे. शिवसेनेच्या युनियनने नैतिक पाठिंबा दिला आहे. पालिका आयुक्तांबरोबर चर्चा का करण्यात येत आहे, असा वाद ही त्यांनी घातला. पुढे त्यांनी सांगितले, की बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नसून संप सुरूच राहणार आहे.
राव म्हणाले “बैठक का बोलवली हाच मुळात प्रश्न आहे. सर्व मागण्या बेस्ट समिती मान्य करू शकते, असे आयुक्त सांगतात मग बेस्टमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेने गेल्या अडीच वर्षात काय केले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या बेस्ट समिती सदस्यांना भूखंड विकायचे आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माघार घेतल्याने पालिका आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी शशांक राव बैठकीला सभागृहात हजर झाले होते.
दरम्यान दिवसभरात १० बसेसची तोडफोड झाली असून यात एक चालकही जखमी झाला आहे. संपामुळे सुरू परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदवीका विभागाच्या एकूण १७ परिक्षा होत्या. उशीरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाने हिले आहेत. गोरेगाव, पुर्व उपनगरे आणि इतर भागात रिक्षाचालकांनी बेस्ट संपामुळे दुप्पट भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांना ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर झाला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/