राजकारण की साहित्य?
पूर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण या विषयावरून वादविवाद, भांडण, झगडे वगैरे या पठडीतले गोंधळ व्हायचे. आता सध्याच्या संमेलनाचा हा मुद्दा सुखेनैव सुटला. तर वाद रंगला तो साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोण करणार यावर. त्यानंतर तो वाद रंगला की, संमेलनाच्या आयोजकांनी नयनतारा सहगल यांना सुरक्षिततेच्या मुद्द्यासाठी संमेलनास न येण्याच्या केलेल्या विनंतीमुळे. यावर बहुसंख्य लोकांचे म्हणणे आहे की, नयनतारा यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आयोजकांनीच उचलला, हे बरे. कारण नाही तरी नयनतारा यांना या देशात फारच असहिष्णूता आहे, असे वाटते. या देशात चांगल्या म्हणजे तथाकथित निधर्मी विचारवंतांचे जगणे असह्य झाले आहे, असेही त्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर नयनतारा यांच्या मनातली हाक ऐकून आयोजकांनी त्यांना साहित्य संमेलनाला न येण्याची विनंती केली, हे बरेच झाले. आता यावर अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे म्हणत कित्येक भुवया वक्र होतील. पण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा लाभ घेतच बहुसंख्य साहित्यप्रेमींना वाटते की, साहित्यामध्ये साहित्य असावे. राजकारण नको. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे उद्घाटक म्हणून निस्पृहता, सत्यता आणि विश्वासार्हता या मापदंडावर नयनतारा यांनी साहित्य संमेलनात काय भूमिका मांडली असती, ते सगळ्यांनाच माहिती आहे. साहित्य संमेलन हे राजकीय मत व्यक्त करण्याचे आखाडे आहेत का? आता कुणी आचार्य अत्रे, दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे यांची नावे घेऊ नका. त्यांनी साहित्य संमेलनामध्ये आवाज उठवला, तो अखंड सार्वभौम भारतीयत्वाच्या सुरक्षिततेसाठी. कोणा एका राजकीय पक्षाची तळी उचलून त्याची दलाली करण्यासाठी त्यांनी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरले नव्हते. कोणीही यावे आणि फुसका बार सोडून द्यावा आणि मग त्यानंतर महिनोन्महिने महाराष्ट्र त्या आगीत होरपळत राहतो, हे काही नवीन नाही. अनेक तथाकथित विचारवंत, साहित्यिक जे केवळ आणि केवळ सत्तार्थाने आणि स्वार्थांधाने भूमिका ठरवतात आणि लोकांच्या माथी आपले विचार थापतात. त्यांना साहित्याच्या दरबारात बोलवावे का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण सामान्यांना इतकेच वाटते की, साहित्य साहित्यच राहावे. राजकारण करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/