गोलमाल है भाई...
पवारांचं राजकारण म्हणा समजण्यापलीकडचं. बोलायचं एक आणि करायचं दुसरचं, ही त्यांची खासियतच. त्यामुळे महाराष्ट्रात मनसेला आघाडीसोबत घेण्याचा त्यांचा विचार हा मराठी मतांना अधिकाधिक आपल्याजवळ खेचण्याचाच तर प्रयत्न नाही ना, या शंकेला हवा देणारा आहे. सध्या राज्यातील वातावरण काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी प्रतिकूल आहे. अशा परिस्थितीत जमतील तेवढ्या पक्षांना सोबत घेऊन विजयश्री आपल्याजवळ खेचून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. एकीकडे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेण्यासाठी काँग्रेसने बैठकींचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे आंबेडकरांनी एमआयएमशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांनाही महाआघाडीत सामील करण्याच्या हालचाली सुरु आहेत. केवळ सत्ताधारी पक्षाला शह देण्यासाठी सुरू असलेलं हे शहाणपण. असाच विचार काँग्रेस आणि मनसेमधूनही विस्तव जात नाहीच. दोन्ही पक्षांच्या विचारसरणी, नेतेमंडळी, कार्यपद्धती अगदी एकमेकांच्या विरुद्धच! संजय निरूपम आणि मनसे यांच्यातील सौख्य आणि प्रेम हे तर अगदी सर्वांच्याच परिचयाचे. त्यामुळे या महाआघाडीत मनसेची जर साथ मिळाली तर त्यांच्यात खटके उडणार हे निश्चितच. परंतु, महाआघाडीच्या हितासाठी पवारांचं हे ‘राज’कारण नाकारणं, हे काँग्रेससाठी हितावह ठरणार नाही. ‘राज’पुत्राच्या लग्नात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची उपस्थिती ही बाब नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाही. राज यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही लग्नाचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, काँग्रेसच्या वतीने राहुल यांचे निकटवर्तीय अहमद पटेल उपस्थित राहिले. लग्नादरम्यान राज-पटेल यांच्यात खासगीत जवळपास २० मिनिटे चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पण, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे मात्र कळू शकले नसले तरी महाआघाडीत मनसेच्या समावेशाबाबतची चर्चा झाल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, तर मनसेच्या ‘इंजिना’ने अचूक ‘वेळ’ साधून ‘हात’ धरण्याचा निर्णय घेतला तर ‘गोलमाल है भाई...’ असंच म्हणावं लागेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/