सातत्याने बदलणाऱ्या घटनाक्रमांचा एक विशाल रंगमंच म्हणजेच बलुचिस्तान. बलुचिस्तानने आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी नेहमीच संघर्ष केला आणि आता तर हा संघर्ष एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचल्याचे दिसते. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या सशस्त्र संघर्षाला प्रदीर्घ इतिहासही आहे. अब्दुल करीम आगा खान यांच्यापासून ते नवाब अकबर खान बुगती यांच्यापर्यंत या संघर्षाच्या नायकांनी इथे महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष करणारी प्रमुख संघटना आहे. १९७० च्या दशकात या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानवरील नियंत्रणावेळी सर्वाधिक सक्रिय राहिली. परंतु, सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानातील माघारीनंतर संघटनेची सक्रियता घटली. कारण, या संघटनेला आवश्यक असलेला रसदपुरवठा सोव्हिएत संघच करत होता. पुढे १९९० च्या दशकाच्या अखेरीस मात्र ही संघटना पुन्हा सक्रिय झाली. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ (बीएलए) एक गुप्तरितीने काम करणारी संघटना असून मर्री जनजातीच्या समूहाशी तिचा संबंध असल्याचे म्हटले जाते. ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा उद्देश बृहत बलुचिस्तानच्या निर्मितीचा असून यात अफगाणिस्तान आणि इराणच्या अखत्यारितील बलुचिस्तानचा भागही समाविष्ट केला जावा, अशी मनिषा बाळगणारा आहे. मीर बलाच मर्री हे या संघटनेचे कमांडर होते. नवाब अकबर खान बुगती यांच्याबरोबरीने पाचव्या बलुच संघर्षात मर्री यांची महत्त्वाची भूमिका होती. २००७ मध्ये मात्र मीर बलाच यांच्या मृत्यूनंतर हिर्बयार मर्री संघटनेच्या प्रमुखपदी आले. एका अंदाजानुसार, या संघटनेत मुख्यत्वे मर्री समुदायातील तीन हजार लढाऊ तरुण आहेत. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ला २००६ साली ब्रिटन आणि पाकिस्तानने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.
‘बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टी’ या संघर्षात भाग घेणारी एक प्रमुख संघटना आहे. २००६ साली बळी पडलेल्या नवाब अकबर खान बुगती यांचे नातू ब्रह्मदाग बुगती यांनी या संघटनेची स्थापना केली. अकबर खान बुगती यांच्या ‘जम्हूरी वतन पार्टी’मधून बाहेर पडत ही संघटना सुरू झाली होती. ही संघटनादेखील बृहत बलुचिस्तानच्या स्थापनेचे स्वप्न पाहते. सोबतच जागतिक समुदायाकडून बलुचिस्तानमध्ये सुरू असलेला नरसंहार रोखण्यासाठी आणि मानवाधिकाराच्या स्थापनेसाठी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी करते. असे मानले जाते की, ‘बलुच लिबरेशन आर्मी’ ही ‘बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टी’ची एक सशस्त्र शाखा आहे. सध्या ब्रह्मदाग बुगती निर्वासित असून स्वित्झर्लंडने त्यांना आश्रय दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केला, त्यावेळी सर्वात आधी त्याचे समर्थन करणाऱ्या बलुची नेत्यांमध्ये ब्रह्मदाग बुगती हेदेखील होते. पाकिस्तान असाही आरोप करतो की, बुगती यांना भारताकडून मदत मिळते आणि ते भारताच्या पासपोर्टवरच प्रवास करतात.
‘बलुच नॅशनल मूव्हमेंट’देखील स्वतंत्र बलुचिस्तानसाठी संघर्ष करणारी एक प्रमुख संघटना आहे. मात्र, ही संघटना कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घेण्याविरोधात आहे. या संघटनेचे नेते गुलाम मोहम्मद बलुच यांनी बलुच राष्ट्रवादी दलांना एकत्र करण्याचेही काम केले. २००९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने एका षड्यंत्राद्वारे त्यांची हत्या केली, ज्याची निंदा संयुक्त राष्ट्र संघानेही केली. ‘दी नॅशनल पार्टी’ हीदेखील बलुचिस्तानमधील एक प्रमुख राजकीय संघटना असून तिची विचारधारा मध्य वामपंथी अशी आहे. ही संघटना कलात स्टेट नॅशनल पार्टीची उत्तराधिकारी आहे. या संघटनेने मीर गौस बख्श बिजेंजो, मीर गुल खान नासिर आणि मीर अब्दुल अजीज कुर्दसारखे अनेक नेते बलुचिस्तानला दिले. या संघटनेचा प्रभाव बलुचिस्तानच्या मध्यमवर्गावर सर्वाधिक आहे. तसे पाहिले, तर या संघटनेने नेहमीच निवडणुकांत सहभाग घेतला. परंतु, २००८ मध्ये एक अनपेक्षित निर्णय घेत या संघटनेने निवडणुकांवरही बहिष्कार टाकला होता. या संघटनेच्या कितीतरी नेत्यांच्या संशयास्पद परिस्थितीत हत्याही करण्यात आल्या. अब्दुल मलिक बलोच आणि हासिल खान बिजेंजो या संघटनेचे नेते आहे. अब्दुल मलिक बलोच ७ जून, २०१३ पासून २३ डिसेंबर, २०१५ पर्यंत बलुचिस्तानच्या मुख्यमंत्रिपदीही होते. उल्लेखनीय म्हणजे ते बलुचिस्तानचे पहिलेच बिगरजनजातीय मुख्यमंत्री होते.
‘बलुचिस्तान नॅशनल पार्टी’ बलुचिस्तानची प्रमुख राजकीय संघटना असून १९९६ मध्ये तिची स्थापना करण्यात आली. १९७२ मध्ये बलुचिस्तानच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाचा कारभार पाहणाऱ्या सरदार अताउल्ला मैंगल हे या संघटनेचे संस्थापक होते. यांच्याच सरकारला झुल्फिकार अली भुत्तो यांनी लोकशाहीला पायदळी तुडवत, असंवैधानिक रुपाने बरखास्त केले होते. ही संघटना शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही संघर्षाच्या माध्यमातून बलुचिस्तान प्रांतासाठी अधिक प्रांतीय अधिकार आणि अधिक स्वायत्ततेची मागणी करते. यामध्ये संघिय सरकारच्या अधिकारांचे संरक्षण, परराष्ट्रविषयक मुद्दे आणि चलनाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. या संघटनेचे अनेक नेते पाकिस्तान सरकारच्या क्रौर्याला बळी पडले आहेतच आणि ही संघटना आता बलुचिस्तानच्या आत्मनिर्णयावर एका जनमत चाचणीची मागणी करत आहे.
‘बलुच स्टुडंट ऑर्गनायझेशन’ ही बलुचिस्तानच्या विद्यार्थ्यांची संघटना आहे. कराचीमध्ये २६ नोव्हेंबर, १९६७ रोजी विद्यार्थी आंदोलनाच्या रुपात तिची स्थापना करण्यात आली. ही बलुची विद्यार्थ्यांची सर्वात मोठी जातीय संघटना आहे. या संघटनेने कितीतरी बलुची राष्ट्रवादी नेत्यांना उभे केले आणि प्रशिक्षितही केले. ही संघटना राष्ट्रवादी आंदोलनातील मध्यम वर्गाचा प्रवेशबिंदू मानली जाते. या संघटनेला ‘बलुच लिबरेशन आर्मी,’ ‘बलुच राष्ट्रीय आंदोलन,’ ‘नॅशनल पार्टी’ आणि ‘बलुचिस्तान नॅशनल पार्टी’चे समर्थन आहे. असे असूनही या संघटनेला स्वतंत्रपणे कार्य करण्यापासून कधीही रोखण्यात आलेले नाही. बहुराष्ट्रीय पाकिस्तान आणि बलुच राष्ट्रवादाच्या पुनर्जागरणासाठी चालवल्या गेलेल्या अभियानातून त्याची प्रचितीही आली. आज बीएसओ-स्वतंत्र गट, जो की बीएलएबरोबर सक्रिय गठबंधनात सामिल आहे, या संघटनेचा सर्वाधिक प्रभावी गट आहे. उल्लेखनीय म्हणजे, डॉ. अल्लाह नजर यांनी २००२ मध्ये एक निराळा गट तयार केला, जो ‘बीएसओ-आझाद’ नावाने ओळखला जातो. हा गटही ग्रेटर बलुचिस्तानच्या स्थापनेची उद्दिष्ट बाळगतो. ग्रेटर बलुचिस्तान म्हणजेच इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील बलुची प्रदेश होय. सोबतच हा गट या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सशस्त्र संघर्षाच्या बाजूने आहे. पाकिस्तानी सरकारने मात्र या गटाला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे. उल्लेखनीय म्हणजे पाकिस्तान सरकारने उचललेल्या या पावलाची आशियायी मानवाधिकार आयोगाने कडक शब्दांत निंदा केली होती.
बलुचिस्तानचा स्वातंत्र्यसंघर्ष एका नव्या वळणावर आला असताना हा गट आता अजूनच निर्णायक भूमिका घेण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. बलुचींनी आपल्या संघर्षात नेहमीच एखाद्या शक्तिशाली देशाच्या साहाय्यतेची अपेक्षा ठेवली आणि बांगलादेशाच्या स्वातंत्र्यात भारताच्या भूमिकेमुळे भारताकडच्या त्यांच्या अपेक्षांना जास्तच वाढवले. २०१६ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसंघर्षाला समर्थन देण्याचे म्हटले होते, ज्यामुळे जणू काही या संघर्षात नव्याने प्राण फुंकला गेला. बलुचिस्तानच्या बीहडांपासून जगभरात पसरलेल्या बलुच राष्ट्रवाद्यांमध्ये एका नव्या उत्साहाचा संचार झाला आणि हा विश्वासही पुन:स्थापित झाला की, तो पाकिस्तानच्या जाळ्यातून मुक्त होऊन एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राच्या रुपात बलुचिस्तानची स्थापना करण्यात यशस्वी होईल.
- संतोष कुमार वर्मा
(अनुवाद : महेश पुराणिक)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/