उत्तर पूर्व मुंबई, अनुलोम मित्रसंगम कार्यक्रमाचे उद्घाटन
उत्तर पूर्व मुंबई,
अनुलोम मित्रसंगम
रविवार, २० जानेवारी, २०१९ रोजी उत्तर-पूर्व मुंबईचा ‘अनुलोम मित्र संगम’ कालिदास नाट्यगृह , मुलुंड येथे संपन्न झाला. या संगमचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाचे विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, डॉ. भदंत राहुल बोधी, समतोल फाऊंडेशनचे विजय जाधव, ‘अनुलोम’ मुंबई विभाग प्रमुख जयंतराव कंधारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी ‘अनुलोम’चा उत्तर-पूर्व मुंबईचा उपभाग जनसेवक म्हणून मी प्रास्ताविक केले. ‘अनुलोम’च्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांच्या मूळ समस्येपर्यंत पोहोचताना ‘अनुलोम’चा घटक म्हणून मला जे अनुभव आले त्याचे सादरीकरण मी केले. ‘अनुलोम’मार्फत सरकारी योजना जनमानसात पोहोचवण्याचे कामे उद्बोधक आणि तितकेच आव्हानात्मक. पण ‘अनुलोम’च्या चौकटीत राहूनही ‘अनुलोम’ सदस्य म्हणून मी आणि माझे सहकारी उत्तर-पूर्व मुंबईचा ‘अनुलोम मित्रसंमग मेळावा’ आयोजित करू शकलो, ही ‘अनुलोम’ची पुण्याई. याप्रसंगी उद्घाटन सत्रात डॉ. जगदीश पाटील यांनी समाजस्वास्थ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी आपला वेळ, थोडा पैसा, थोडा विचार समाजासाठी नि:स्वार्थपणे द्यावा, अशी प्रेरणा समाजात निर्माण झाली तर समाजाचे स्वास्थ्य अधिक चांगले होईल, अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांनी स्वत: पालघर जिल्ह्यात कातकरी समाजासाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला व ‘अनुलोम’च्या मदतीने या कामाकरिता केलेल्या सहकार्याचे कौतुक केले.प्रमुख अतिथी डॉ. भदंत राहुल बोधींनी सेवाभावाचे महत्त्व , मनाची ताकद , मनपरिवर्तन याची आठवण करून समाजातील सेवाभाव अधिक कसा जागृत होईल, या संदर्भात मार्गदर्शन केले व ‘अनुलोम’च्या विचाराने सुरू असलेल्या उपक्रमांना शुभाशीर्वाद दिले.
मधु पवार
- मधु पवार, जनसेवक,
उत्तर पूर्व मुंबई
उत्तर मध्य मुंबई अनुलोम मित्रसंगम कार्यक्रमाचे उद्घाटन
उत्तर मध्य मुंबई
अनुलोम मित्रसंगम
१३ जानेवारी,रोजी उत्तर-मध्य मुंबईचा ‘अनुलोम मित्रसंगम’ कार्यक्रम दीनानाथ नाट्यगृहामध्ये पार पडला. ‘अनुलोम’चे सर्व संबंधितसुद्धा ९ वाजल्यापासून हजर होते. विभाग, उपविभाग व भाग जनसेवक सर्वच वेळेत आल्याने आत्मविश्वास द्विगुणित झाला होता. आदल्या दिवशी रात्री १:३० वाजता बाहेरच ‘सेल्फी पॉईंट’ उभा केलेला. दरम्यान अतिथी झाली. आधी संचित यादव, मग मिलिंद कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, ओमप्रकाश शेटे, सागर रेड्डी व यशोवर्धन बारामतीकर यांचा अतिथीगृहात आतिथ्य झाले. कार्यक्रमाला सुरवात झाली. मंदार खराडे यांनी सूत्रसंचालनास सुरुवात केली. यावेळी मान्यवरांना तुळशीचे रोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
उत्तर-मध्यचा उपविभाग जनसेवक म्हणून मी ‘अनुलोम’संबंधी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांनी प्रेरणादायी अनुभव कथन केले. सर्वप्रथम ‘बे एके बे’ चित्रपटातील अभिनेते आणि चित्रपटदिग्दर्शक संचित यादव यांनी आपल्या संघर्षाची व सामाजिक कार्याची माहिती सांगितली व त्यातून ‘बे एके बे’ चित्रपट करतानाचे अनुभवविश्व उलगडले. तसेच ‘नमस्कार फाऊंडेशन’तर्फे मुलांना कसे दत्तक घेतले जाते व त्यांचे शिक्षण कसे पूर्ण केले जाते याची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर दुसरे अतिथी सामाजिक कार्यकर्ते सागर रेड्डी यांनी आपला जीवनपट उलगडला. स्वत:चे बालपण अनाथाश्रमामध्ये गेल्यानंतर त्या आयुष्याचा अर्थ गवसत अनाथांसाठी नाथ होणारे सागर रेड्डी जेव्हा अनुभव सांगत होते. त्यावेळी व्यासपीठावरचे मान्यवर आणि समोर बसलेले श्रोते हलकेच आसवे टिपत होते. सागर यांनी १८ वर्षांनंतर अनाथाश्रमातून बाहेर आलेल्या मुलांसाठी त्यांनी केलेले कार्य कथन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षा’चे ओमप्रकाशजी शेटे यांनी आपल्या मनोगताच्या सुरुवातीलाच जयंत कंधारकर आणि मुंबईच्या ‘अनुलोम’ कार्याचे अभिनंदन केले व हा ‘अनुलोम मित्रसंगम’ अद्भुत आहे, असे म्हटले. पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री साहाय्यता कक्ष सक्रियपणे स्थापन केला. त्यामुळे पैशाअभावी आरोग्यसेवेचा लाभ न मिळू शकणाऱ्या आणि उपचारांच्याअभावी जीव जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.”
भास्कर देशमुख
त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमाचे साहाय्यक निर्देशक मिलिंद कुलकर्णी यांनी या योजनेंतर्गत येणाऱ्या योजनांचे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे याची चित्रफीत दाखवली. त्यात त्यांनी प्रोजेक्ट फाईल ऑनलाईन कशी तयार होते, ती ऑनलाईन पद्धतीने बँकेकडे कशी जाते व बँक कशाप्रकारे स्वयंरोजगारासाठी मदत करते व त्यानंतर PMEGP सबसिडी कशी देते, असे सांगून शेवटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करूनसुद्धा लाभ का मिळत नाही, हे सांगताना काही घटना सांगितल्या. या कार्यक्रमाचा समारोप ‘अॅरिस सिनरीज’चे संचालक सतीश कुलकर्णी यांनी केला. सतीश यांनी सर्व ‘अनुलोम’ मित्रांचे कौतुक केले. त्यांनी उत्तर-मध्य मुंबईमधील दोन एअरपोर्ट्स, वांद्रे-कुर्ला संकुल, डायमंड मार्केट अशा महत्त्वपूर्ण स्थानांची माहिती दिली व अशा अद्भुत उत्तर-मध्य मुंबईमध्ये आपण सगळे ‘अनुलोम’ मित्र आहोत, असे सांगून उत्तर-मध्य उपविभागाचे महत्त्व पटवून दिले. ‘अनुलोम’चे तळागाळातील प्रामाणिक कार्य, त्याचे पुढील भविष्य व त्यासोबत तुमची साथ याची त्यांनी योग्य प्रकारे सांगड घालत सत्राचा समारोप केला. शेवटी पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
- भास्कर देशमुख, जनसेवक,
उत्तर मध्य मुंबई
मुंबईतील ‘अनुलोम’च्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना, भेटीगाठी दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, ‘अनुलोम’च्या संघटनात्मक चौकटीपलीकडेही त्यांची संघटनात्मक ताकद मोठी आहे. ती संघटनात्मक ताकद आणि व्याप्ती एकत्रितरीत्या यावी म्हणून ‘अनुलोम मित्रसंगम’ कार्यक्रमाचा आयोजन केले आहे. मुंबईतील सर्व उपविभागांमध्ये ‘अनुलोम मित्रसंगम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अनुलोम’च्या संघटनात्मक शक्तीबरोबरच त्यांच्या जनसेवेमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन, सहकार्य, सूचना आणि शुभेच्छा देणाऱ्यांचा समाजशक्तीच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम म्हणून ‘अनुलोम मित्रसंगम’चे महत्त्व मोठे आहे.
- जयंत कंधारकर,
मुंबई अनुलोम जनसेवक
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/