सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या चौथ्या निर्णायक कसोटी सामन्यामध्ये भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३०३ धावा केल्या आहेत. यामध्ये भारताच्या चेतेश्वर पुजाराने १३० धावांची नाबाद खेळी केली. त्याचे हे मालिकेतील तिसरे आणि कारकिर्दीतील १८ वे कसोटी शतक आहे. तसेच मयांक अगरवालच्या ७७ धावांचे यामध्ये मोठे योगदान आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या कसोटीत भारताने कुलदीप यादव आणि लोकेश राहुल यांना संधी दिली. भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल ९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सावरला. त्यांनी ११६ धावांची भागीदारी केली. मयांकने ७७ धावांमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. नेथन लायनने मयांकची विकेट घेतली. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला साजिशी कामगिरी करता आली नाही. ते अनुक्रमे २३ आणि १८ धावांवर बाद झाले. पाचव्या विकेटसाठी आलेल्या हनमा विहिरीने ३९ धावांची नाबाद खेळी करत पुजारा चांगली साथ दिली. यामुळे भारताने पहिल्या दिवशी ४ बाद ३०३ धावांची मजल मारली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/