मंगळवारी पंतप्रधान मोदी यांचा ‘परिक्षा पे चर्चा-२’ हा कार्यक्राम टीव्हीवर दाखविण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे फेसबुक लाइव्ह करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमातून देशभरातील पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मूळच्या आसामच्या रहिवाशी असलेल्या आणि सध्या दिल्लीत राहणाऱ्या मधुमिता सेन गुप्ता यांनी या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला. “माझा मुलगा इयत्ता ९ वीत शिकतो. तो अभ्यासात आधी खूप हुशार होता. पण आता तो ऑनलाइन गेममध्ये रमू लागला आहे. त्यामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. यावर उपाय काय?”
या प्रश्नावर उत्तर देत पंतप्रधान मोदींनी या मधुमिता यांना प्रतिप्रश्न केला. “तुमचा मुलगा पबजी खेळतो का? फ्रंटलाइनवाला आहे का?” हे ऐकून सभागृहातील लोक हसायला लागले. परंतु याबाबतीत पंतप्रधान मोदींनी पुढे मोलाचा सल्ला सर्व पालकांना दिला. “तंत्रज्ञानाचा फायदा आहे, तसाच तोटाही आहे. तुमचा मुलगा मोबाईल गेम्स खेळत असेल. तर त्याला याच मोबाईलद्वारे माहिती मिळविता येते. हे पटवून द्या. एखाद्यावेळी त्याला नागालॅंडमधील तांदळाविषयी माहिती इंटरनेटवर शोधायला सांगावी. त्यामुळे मोबाईलवर चांगल्या गोष्टींची माहितीही मिळते, हे त्याच्या लक्षात येईल. पुढे जाऊन हेच तंत्रज्ञान तुम्हाला आणि तुमच्या मुलांना जोडेल.” असे मोदींनी म्हटले. प्ले स्टेशन चांगले असतात, पण मैदानावरील खेळ मुलांनी विसरता कामा नये. असे पंतप्रधान मोदींनी आवर्जून नमूद केले. तंत्रज्ञानाचा वापर मुलांना प्रेरणा देण्यासाठी करावा, प्रत्यक्षात आपली मुले तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करत आहेत, यावर आपण लक्ष ठेवायला हवे. तंत्रज्ञानाच्या अयोग्य वापरामुळे जर तुमचे विचार संकुचित झाले, तर तुमचे नुकसान होईल. तंत्रज्ञानाचा वापर हा ज्ञानाच्या विस्तारासाठी करावा. असा सल्ला पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमातून दिला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/