‘ठाकरे’ सिनेमाच्या
स्क्रीनिंगला नेमके काय घडले होते?
२३ जानेवारी रोजी वरळीतील आयनॅक्स येथे ‘ठाकरे’ सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग होणार होते. परंतु या स्क्रीनिंगला सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे आपल्या कुटुंबियांसोबत उशिरा पोहोचले. स्क्रीनिंगला उशिरा आल्यामुळे संजय राऊत यांचा पारा चढला. त्यांनी अभिजीत पानसे यांना सुनावले. असे घडले असल्याचे अनेक प्रसार माध्यामांकडून सांगण्यात येत आहे.
अभिजीत पानसे यांच्या कुटंबातील काही सदस्यांना बसण्यासाठी नीट जागा देण्यात आली नाही. त्यामुळे पानसे रागावून थिएटर बाहेर पडले. असे यामागील कारण काही वृत्तवाहिन्यांकडून दिले याप्रकरणी दिले जात आहे. अभिजीत पानसे आपल्या कुटुंबियांसोबत थिएटर बाहेर पडताना आणि संजय राऊत त्यांना समजविण्याचा प्रयत्न करतानाचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर फिरत आहे.
सिनेमाच्या म्युझिक लाँच कार्यक्रमाच्यावेळी अभिजीत पानसे गैरहजर होते. सिनेमाच्या डबिंगच्या कामात ते व्यस्त होत. असे कारण त्यांनी त्यावेळी दिले होते. त्यामुळेदेखील संजय राऊत हे पानसेंवर चिडले असल्याचे कारण काही माध्यमप्रतिनिधींकडून पुढे करण्यात येत आहे. तसेच ‘ठाकरे’ सिनेमाच्या बाबतीत सुरुवातीपासूनच पानसे यांना डावलले जात असल्याचा सूर काही प्रसारमाध्यमांनी कायम ठेवला होता. घडलेल्या प्रकारावरून संजय राऊत आणि अभिजीत पानसे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. अपमान सहन न झाल्यामुळे सिनेमा पूर्ण न पाहताच पानसे रागाने थिएटरच्या बाहेर पडले. असे सांगण्यात येत आहे.
परंतु ‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रीनिंगचा हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. याप्रकरणी सोशल मीडिया यूजर्सनी #Isupportabhijitpanse असा हॅशटॅग सोशल मीडियावर चालवला आहे. अनेकांनी हा हॅशटॅग वापरत अभिजीत पानसे यांना सोशल मीडियावरून पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही पक्षाची बाजू न घेता एका दिग्दर्शकाच्या बाजूने सोशल मीडिया यूजर्स उभे राहिले आहेत. या वादाकडे पाहताना लोकांनी एका सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये उद्भवलेला वाद असाच दृष्टिकोन ठेवला असून अभिजीत पानसे यांना एक दिग्दर्शक म्हणून अनेकांनी पाठिंबा दिला आहे. “तुम्हाला जर एक यशस्वी दिग्दर्शक व्हायचे असेल तर अशाच निर्मात्यांसोबत काम करा, ज्यांना तुमच्यातील कलेचा आदर असेल.” असे ट्विट एका फिल्ममेकिंगच्या विद्यार्थिनीने केले आहे.
“मी ‘ठाकरे’ हा सिनेमा फक्त बाळासाहेबांवर असलेल्या माझ्या प्रेमापोटी केला. बाकी कोणी कसे वागायचे हा ज्याचा त्याचा संस्काराचा प्रश्न आहे.” असे अभिजीत पानसे मला फोनवर म्हणाले, असे ट्विट मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केले.
दरम्यान, संजय राऊत यांनी याप्रकरणी ट्विट केले. “लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की, संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ‘ठाकरे’ या सिनमाचा हाच संदेश आहे.” असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. नाव न घेता संजय राऊत यांनी अभिजीत पानसे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. परंतु याच ट्विटखालील कमेंट्समध्ये सोशल मीडिया युजर्सनी संजय राऊत यांना ट्रोल केले आहे. “अभिजीत पानसे यांनी कालच्या प्रसंगाबाबत एक अवाक्षरसुद्धा काढले नाही. परंतु तुम्ही मात्र उतावळेपणा करून तुमच्या बुद्धीची अपात्रता दाखवून दिलीत.” असे एका ट्विटर यूजरने म्हटले आहे. ट्रोेलर्सच्या प्रतिक्रियांमुळे संजय राऊत यांनी हे ट्विट डिलीट केले. हा वाद आता कुठपर्यंत जाणार हे येणारा काळच ठरवेल. येत्या २५ जानेवारी रोजी ‘ठाकरे’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/