मुले कट्टरता शिकत आहेत; मदरसे बंद करण्यासाठी शिया वक्फ बोर्ड अध्यक्षांचे मोदींना पत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2019
Total Views |



लखनौ : देशात सध्या सुरू असलेले प्राथमिक मदरसे बंद करा अन्यथा १५ वर्षांनंतर देशातील अर्ध्याहून अधिक मुसलमान हे आयसीसचे समर्थक बनलेले असतील!हे वाक्य दुसऱ्यातिसऱ्या कुणाचे नसून खुद्द शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वासिम रिझवी यांचे आहे. रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत एक सविस्तर पत्रच लिहिले असून यात देशातील सर्व मदरसे बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

उ. प्र. शिया सेन्ट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील प्राथमिक मदरसे लवकरात लवकर बंद करण्यात आले नाहीत तर १५ वर्षांनंतर देशातील अर्ध्याहून अधिक मुसलमान हे आयसीसच्या विचारधारेचे समर्थक बनलेले असतील. रिझवी म्हणतात की, कोणत्याही मोहिमेला चालवण्यासाठी लहान मुलांना लक्ष्य केले जाते. सध्या जगभरात आयसीस ही एक अत्यंत धोकादायक दहशतवादी संघटना बनली आहे. ती हळूहळू जगातील मुस्लीम देशांत आपला प्रभाव निर्माण करत आहे. भारतात काश्मीरमध्येही मोठ्या प्रमाणात आयसीसचे समर्थक सापडू लागले आहेत. दुसरीकडे देशांत मदरशांत इस्लामचे शिक्षण घेणाऱ्या मुलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देऊन धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अन्य धर्मियांच्या विरोधात भडकावले जात असल्याचा आणि सामान्य शिक्षणापासून त्यांना दूर नेले जात असल्याचा आरोपही रिझवी यांनी केला आहे.

 

भारतात ग्रामीण भागांतील प्राथमिक मदरसे देणगीच्या मोहापायी आमच्या मुलांचे भविष्य खराब करत असल्याचाही गंभीर आरोप वासिम रिझवी यांनी केला आहे. मुलांमध्ये इस्लामच्या नावाखाली कट्टरपंथीय विचार पसरवले जात आहेत जे मुसलमान मुलांसाठी अत्यंत घातक असून देशासाठीही तो एक मोठा धोका असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे देशहितासाठी आणि मुस्लीम मुलांच्या भविष्यासाठी देशातील प्राथमिक मदरसे बंद केले जावेत, अशी आग्रही मागणी रिझवी यांनी केली आहे. तसेच, वाटल्यास माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जर धर्माचे शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना मदरशांमध्ये प्रवेश देण्यात यावा. यामुळे मुस्लिम मुले व्यवस्थितपणे इतर धर्मीय विद्यार्थ्यांसोबत आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करतील, अशीही सूचना त्यांनी केली आहे.

 

रिझवी हे कट्टरपंथी मुस्लिमांविरोधात रोखठोक भूमिका घेणारे मुस्लीम नेते म्हणून ओळखले जातात. अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभे राहण्याच्या बाजूनेही त्यांनी अनेकदा वक्तव्ये केली आहेत. त्यात आता त्यांनी थेट सबंध देशातील मदरशांवर हल्ला चढवत इतके गंभीर आरोप केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

काय म्हणतात रिझवी..

देशात मदरसे बंद करा अन्यथा १५ वर्षांनंतर देशातील अर्ध्याहून अधिक मुसलमान आयसीसचे समर्थक बनतील. मदरशांत शिक्षण घेणाऱ्या मुलांना आर्थिक मदत देऊन अन्य धर्मियांच्या विरोधात भडकावले जात आहे. ग्रामीण भागांतील प्राथमिक मदरसे देणगीच्या मोहापायी आमच्या मुलांचे भविष्य खराब करत आहेत. मुसलमान मुलांसाठी हे सर्व अत्यंत घातक असून देशासाठीही तो एक मोठा धोका ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@