भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019
Total Views |



नव्या जगाने संपत्तीनिर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही! तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते, तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त झाले आहे.


शेअर बाजाराविषयी आपले मत काय आहे? तो सट्टाबाजार आहे? तो पैसे कमावण्याचे भांडवलशाहीचे हत्यार आहे? तो श्रीमंतांचा पैसे कमवण्याचा डाव आहे? आपल्यापैकी अनेकांचे असेच मत असणार आणि माझेही तसेच होते. पण जेव्हा त्याची अधिकाधिक माहिती मिळत गेली, तसे माझे मत बदलत गेले. लाखो भारतीय नागरिकांनीही त्यांचे शेअर बाजाराविषयीचे आपले हे मत बदलले म्हणून गेले काही वर्षे आपल्या देशात त्या क्षेत्रात एक मोठा बदल होतो आहे. तो बदल असा आहे, ज्यात भारतीय गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या या मार्गाचा स्वीकार करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे जो भारतीय शेअर बाजार आतापर्यंत परकीय गुंतवणूकदार नियंत्रित करत होते, त्यावर २०१८ साली प्रथमच भारतीय गुंतवणूकदारांनी बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. ज्या भांडवली बाजारावर जगाचे आर्थिक व्यवहार ठरतात, त्याचा विचार करता हा फार मोठा बदल आहे. शेअर बाजारात काय होते, हे आधी समजूनघेतले पाहिजे. मोठ्या उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी जेव्हा भांडवल लागते, तेव्हा त्यांना आपल्या उद्योगाची चांगली प्रतिमा तयार करावी लागते. या उद्योगातून पुढे चांगला नफा मिळणार आहे, हे गुंतवणूकदारांना पटवून द्यावे लागते. यासाठी आधी पैसे रूपाने गुंतवणूक केली पाहिजे, म्हणून ते खुल्या बाजारात जातात, ज्याला ‘आयपीओ’ म्हणतात. ज्यांना या उद्योगाच्या भरभराटीची खात्री वाटते, ते नागरिक अशा कंपनीत गुंतवणूक करतात, म्हणजे त्या उद्योगाला भांडवल पुरवितात. अशा गुंतवणुकीतून उद्योग उभा राहातो. या उद्योगातून जसजसा नफा मिळतो, तसतसा गुंतवणूकदारांना त्यातील वाटा वेगवेगळ्या स्वरूपात दिला जातो. अर्थात, उद्योग सुरू करणे हे धाडस असते. त्यामुळे त्यात नफाच होईल, असे सांगता येत नाही. त्यामुळे त्यात जर तोटा झाला, तर त्या उद्योगाचे शेअर जवळ बाळगणाऱ्या शेअरधारकांना त्याचा तोटाही सहन करावा लागतो.

 

आज आपल्या देशातील रिलायन्स, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी, स्टेट बँक, विप्रो, महिंद्रा असे आणि सुमारे पाच हजार मोठे उद्योग या मार्गाने उभे राहिले असून त्यातून लाखो रोजगार निर्माण झाले आहेत. आपल्यातीलच ज्या नागरिकांना या उद्योगांचे आकलन आणि अपरिहार्यता लक्षात आली आहे, ते नागरिक अशा उद्योगात गुंतवणूक करतात आणि त्यातून पैसा मिळवितात. त्यातील काहीजण इतका पैसा मिळवितात की, तितका पैसा इतर कोणत्याच मार्गाने मिळू शकत नाही. अर्थात, त्यातील अनेकजण केवळ गुंतवणूक न करता त्यात जोखीम स्वीकारून ट्रेडिंग करतात, जी सट्टा खेळल्यासारखी असते. आपण ज्या गुंतवणुकीविषयी विचार करतो आहोत, त्यात शेअर बाजारातील ट्रेडिंग आपण गृहीत धरलेले नाही. एका दशकापूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करणारी मंडळी अतिलोभातून ट्रेडिंग करत असत आणि त्यात फटका बसला की, या गुंतवणुकीला बदनाम करत असत. पण गेल्या दशकात त्यात खूपच सुधारणा झाली, असून आता भारतीय गुंतवणूकदारांनी ‘म्युच्युअल फंडात’ म्हणजे शेअर बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा सुरक्षित मार्ग पत्करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम, म्हणजे गेल्या वर्षात परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसा काढून घेतला (८३ हजार कोटी रुपये) तरी शेअर बाजार पूर्वीसारखा कोसळला नाही, तर तो बऱ्यापैकी स्थिर राहिला. या बदलाचे महत्त्व यासाठी आहे की, हे आपल्या देशात प्रथमच होते आहे. हा बदल चांगला की वाईट, याचे हो किंवा नाही, असे उत्तर मात्र देता येत नाही. हा बदल अपरिहार्य आहे, एवढे मात्र खात्रीने म्हणता येते. भारतीय आतापर्यंत जमीन, सोने, घरे या मार्गाने गुंतवणूक करत होते आणि अजूनही करतात. पण जगाने विशेषत: विकसित जगाने आपल्याला ‘बार्टर’ पद्धत सोडून चलनाचा खेळ खेळण्यास भाग पाडले, त्याचा विचार करता हा खेळ जिंकणारा भौतिकदृष्ट्या सुखी होतो, हा आधुनिक जगाचा ठोकताळा झाला आहे. विकसित देशांत बँकिंगच्या आणि भांडवली बाजाराच्या मदतीने चलन सारखे फिरत राहिले. त्यामुळे त्या देशात संपत्तीची निर्मिती आपल्यापेक्षा कितीतरी वेगाने झाली आणि तेथे भौतिक समृद्धी आली. आपल्या देशात मात्र जमीन, सोने, घरे यात चलन अडकून राहिले. त्यामुळे काही मोजके नागरिक श्रीमंत झाले खरे, पण चलन फिरत नसल्याने ती भौतिक समृद्धी, हे बहुतांश नागरिकांसाठी साध्य होऊन बसले. त्यामुळे आपण आज भौतिक समृद्धीसाठी धडपडत आहोत. थोडक्यात, नव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही बनविले. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते, तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच पडली नसती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. तो त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त आहे. हा खेळ आणि त्याचे नियम विकसित देशातील नागरिकांनी स्वीकारले आणि आपले गुंतवणुकीचे मार्ग त्यानुसार बदलून केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर सार्वजनिक जीवनातही भौतिक समृद्धी प्राप्त केली. भारतीय समाज मात्र गेले किमान एक शतक, हा खेळ खेळायचा की नाही, या संभ्रमात आहे. २०१८ मध्ये भारतीय शेअर बाजारात भारतीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली, याचा अर्थ काही भारतीय नागरिकांच्या मनातील तो संभ्रम दूर झाला. त्यांनी आधुनिक जगासोबत जाण्याची अपरिहार्यता मान्य केली.

 

आपल्या देशात संपत्तीचे वितरण होत नाही, त्यामुळे आर्थिक विषमता वाढतेच आहे, याविषयी आपण नेहमीच बोलतो. पण हे वितरण कसे शक्य होईल, ते घडवून आणण्याचा मार्ग मात्र आपण सांगत नाही. तो मार्ग आहे, करपद्धती सुलभ करून जास्तीत जास्त नागरिकांकडून कमीत कमी कर घेणे! जितका कमी आणि सोप्या पद्धतीने कर घेतला जाईल, तितका कर महसूल वाढेल आणि ज्यांच्यापर्यंत संपत्ती पोहोचण्याची गरज आहे, ती सरकारच्या मार्गाने पोहोचेल. अर्थक्रांती त्यासाठी बँक व्यवहार कराची मांडणी करते. संपत्ती वितरणाचा दुसरा मार्ग आहे, तो आर्थिक व्यवहार अधिकाधिक संघटीत करणे. (अधिक मूल्याच्या नोटा कमी करणे, बँकिंगला आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, सोने, जमीन, घरे यातील पैसा फिरत नसल्याने त्यातील गुंतवणूक कमी करून विमा, निवृत्ती, म्युच्युअल फंड यातील गुंतवणूक वाढवून तो खेळता ठेवणे आणि या मार्गाने व्याजदर जगाच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करणे.) आर्थिक व्यवहार संघटीत यासाठी केले पाहिजेत की, तसे केल्यानेच ते पारदर्शी होण्याची आणि त्यांचे योग्य नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. अधिकाधिक भारतीय नागरिकांना ही गोष्ट कळू लागली आणि त्यानुसार ते आपल्या गुंतवणुकीच्या सवयीत बदल करत आहेत, हे त्यांच्या आणि देशाच्या दृष्टीने पुढचे स्वागतार्ह पाऊल आहे. (शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही शिफारस नव्हे, ज्याला हे पटले, त्याने योग्य सल्लागारामार्फत माहिती घेऊनच हा मार्ग अवलंबला पाहिजे.)

 

भारतीय गुंतवणूकदार बदलत आहेत...

 

> भारतीयांची शेअर बाजारातील सध्याची दरमहा गुंतवणूक दहा हजार ते १२ हजार कोटी रुपये. (म्युच्युअल फंडसह)

> म्युच्युअल फंडाच्या मार्गाने दरमहा (एसआयपी) होणारी गुंतवणूक सात हजार ते आठ हजार कोटी रुपये.

> २.६ ट्रिलियन डॉलर भारताच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांची जीडीपीच्या तुलनेत शेअर बाजारातील गुंतवणूक एक टक्का (विकसित देश - पाच टक्के)

> भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांचे एकूण मूल्य जीडीपीच्या ६० टक्के

> भारतीय नागरिकांच्या संपत्तीत शेअर बाजाराचा वाटा ४.६ टक्के (दशकात सर्वाधिक)

> भारतीय नागरिकांच्या संपत्तीत स्थावर संपत्तीचा वाटा ५३.८ टक्के

> भारतीय नागरिकांच्या संपत्तीत सोन्याचा वाटा ११.३ टक्के

> भारतीय नागरिकांच्या संपत्तीत बँक एफडीचा वाटा १५.९ टक्के

> भारतीय नागरिकांच्या संपत्तीत विम्याचा वाटा ६.१ टक्के

> भारतीय नागरिकांच्या संपत्तीत पेन्शन फंडाचा वाटा ५.१ टक्के

> भारतीय नागरिकांच्या संपत्तीत रोख रकमेचा वाटा ३.१ टक्के

 

- यमाजी मालकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@