१९९३ची पुनरावृत्ती?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2019   
Total Views |



१९९३ सालात सपा-बसपाचे संयुक्त सरकार सत्तेत येऊ शकले होते. पण, भाजपचे बहुमत हुकवण्यात यशस्वी झालेल्या त्या आघाडीला भाजपहून अधिक जागा मिळवता आल्या नव्हत्या आणि काँग्रेसची कुबडी घेण्याची वेळ आलेली होती. तितका तपशील मायावती सांगत नाहीत की पत्रकार शोधत नाहीत, म्हणूनच मग गल्लत होऊन जाते.


याच आठवड्यात उत्तरप्रदेशातील महागठबंधन पूर्ण झाले आहे आणि त्यातून काँग्रेसला कटाक्षाने बाहेर ठेवण्यात आले. मागल्या अनेक निवडणुकांत समाजवादी पक्षाने व बसपाने ज्या दोन जागा लढवायचे टाळले, त्या अमेठी व रायबरेली जागा या गठबंधनाने काँग्रेससाठी सोडलेल्या आहेत. त्यामागे तेवढ्यापेक्षा काँग्रेसची उत्तरप्रदेशात अधिक पात्रता नाही, असा त्यांचा निष्कर्ष असावा. तो वेगळा विषय आहे. पण, असे केल्याने काँग्रेसला अपमानित करीत आहोत आणि असली तडजोड झुगारून काँग्रेस स्वबळावर सर्व जागी उमेदवार उभे करणार हा धोका सपा-बसपालाही कळतो. पण, तो त्यांनी पत्करला आहे. त्याच्याही पुढे जाऊन मायावतींच्या वाढदिवशी लोकसभेच्या प्रचाराला आरंभ करताना, या नव्या आघाडीने बहनजींना भावी पंतप्रधान म्हणूनही घोषित करून टाकले. त्यामुळे त्यांना काँग्रेसची सोबत कशाला नको व राहुलशी काय बेबनाव आहे, तेही लक्षात येऊ शकते. पण, त्याहीपेक्षा या निमित्ताने मायावतींनी इतिहासाचे स्मरण करून दिले, ते विसरता येत नाही. त्यांनी सपा-बसपाच्या या नव्या आघाडी व मैत्रीने १९९३च्या इतिहासाची पुनरावृती होईल असे म्हटलेले आहे. त्याचा सविस्तर अर्थ फारसा कोणी समजून घेतलेला नाही. ते आपल्या राजकीय विश्लेषणाचे दुखणेच आहे. कारण, त्या १९९३च्या निवडणुकीत भाजपने बहुमत गमावले आणि बहुमत मिळाले नसतानाही मुलायमसिंह बसपा व काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले, असा घटनाक्रम आहे. तो खरा असला तरी, पुढल्या घटनाक्रमालाही महत्त्व आहे. किंबहुना, भाजपच्या जागी सपा-बसपा सरकार येण्यापेक्षा नंतरच्या घटनाक्रमाला अधिक महत्त्व आहे. पण, तो कोणाला आठवत नाही की त्यातली सूचकताही लक्षात येत नाही. सपा-बसपाची ती आघाडी मायावतींनीच मोडलेली होती व त्यासाठी भाजपची मदत घेऊन त्या प्रथमच औटघटकेच्या मुख्यमंत्री झालेल्या होत्या.

 

१९९३ नंतर मायावती उत्तरप्रदेश व पुढे राष्ट्रीय राजकारणात चमकत गेल्या. बाबरी ढाचा पाडला गेल्याने भाजपचे बहुमत असूनही नरसिंहराव सरकारने विधानसभा बरखास्त केली. त्यामुळे मध्यावधी विधानसभा निवडणुका झालेल्या होत्या. त्यात आधी फक्त १२ आमदार असलेल्या बसपाला सोबत घेण्याची चतुराई मुलायमनी दाखवलेली होती. कारण, आमदार १२ निवडून आले तरी अनेक मतदारसंघात बसपाने चांगली मते मिळवली होती आणि त्याच्या मदतीने मुलायमचा पक्ष बहुमत गाठण्याची शक्यता होती. दोन्ही पक्षांना अशा मैत्रीचा लाभ मिळणे शक्य असल्याने काशीराम यांनीही हातमिळवणी केलेली होती. तोपर्यंत मायावतींचे नाव प्रकाशझोतात आले नव्हते. परंतु, त्या निवडणुकीचे निकाल लागले, तेव्हा भाजपच्या तोडीस तोड या दोन पक्षांनी एकत्रित जागा मिळवल्या होत्या आणि राजकीय दबावाखाली काँग्रेसने त्यांनाच पाठिंबा दिला. म्हणून १९९३ सालात सपा-बसपाचे संयुक्त सरकार सत्तेत येऊ शकले होते. पण, भाजपचे बहुमत हुकवण्यात यशस्वी झालेल्या त्या आघाडीला भाजपहून अधिक जागा मिळवता आल्या नव्हत्या आणि काँग्रेसची कुबडी घेण्याची वेळ आलेली होती. तितका तपशील मायावती सांगत नाहीत की पत्रकार शोधत नाहीत, म्हणूनच मग गल्लत होऊन जाते. इथपर्यंतही ठीक होते, पण आपल्या मदतीने सत्तेत बसलेल्या मुलायमना मायावतींनी फारसे काम करू दिले नाही. आज सत्तेत सहभागी असतानाही शिवसेना रोजच्या रोज भाजप व मुख्यमंत्र्यांवर तोफा डागत असते, तसाच काहीसा प्रकार तेव्हा सपा-बसपामध्ये चालू होता. मुलायमसिंह कंटाळून जावेत, अशी स्थिती मायावतींनी आणलेली होती. अखेरीस एकेदिवशी सरकारी विश्रामधामात मायावतींवर समाजवादी कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यातून दोन्ही पक्षात कायमचे हाडवैर सुरू झालेले होते, अखिलेशने त्यावर पडदा टाकलेला आहे. असो.

 

पण, मुलायम वा समाजवादी पक्षाचे मायावतींशी हाडवैर वा भांडण होण्याचे कारण वेगळेच आहे. तेव्हा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधात बसायला लागल्याने भाजप नेते अस्वस्थ होते. त्यांना कसेही करून मुलायम सरकार पाडायचे होते आणि त्यात मायावतींची मदत होण्याची शक्यता दिसत होती. मुलायम सरकार पाडल्यास बहनजींना बाहेरून पाठिंबा देऊन मुख्यमंत्रिपदी बसवण्याचे आश्वासन भाजपने दिले आणि त्यांनी तो जुगार खेळला. ज्या १९९३च्या निवडणुकीचा दाखला मायावती देत आहेत, त्याची ही फलश्रुती होती. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन चांगले यश मिळवले. पण, सत्ता मिळाल्यावर ती टिकवणे वा सरकार चालवणे; यात मायावती अडसर बनल्या होत्या. त्यांना मनमानी करायची असते आणि कुठल्याही अन्य पक्ष वा नेत्यांशी जुळवून घेणे त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही. म्हणूनच ते सरकार पडलेले होते आणि तेच वारंवार होत आलेले आहे. मायावतींच्या शब्दावर विश्वास ठेवून कुणी कुठलेही राजकीय डावपेच खेळू शकत नाही आणि म्हणूनच अखिलेशना त्याचा अनुभव अजून यायचा आहे. गोरखपूर-फुलपूरच्या निकालांनी भारावून जाऊन त्यांनी दोन पक्षांची युती-आघाडी केलेली आहे. पण, प्रत्यक्ष कुठल्याही निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच त्यात मायावतींची अरेरावी सुरू झालेली आहे. योगायोग असा की, त्यांनी १९९३च्या निवडणुकीची आठवण करून दिलेली आहे. त्यातले फक्त निकाल बघून चालत नाही. त्यानंतरचा घटनाक्रमही खूप महत्त्वाचा असतो. तो बघितला तर मायावती कुठल्याही पक्षाशी जुळवून घेत नाहीत आणि मनमानी करताना मित्र पक्षालाही तोंडघशी पाडतात, हा इतिहास आहे. १९९९ सालात वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी प्रमोद महाजनांना दिलेले होते आणि ऐन मतदानाच्या प्रसंगी त्यांनी पाठ फिरवली व वाजपेयी एका मतानेच पराभूत झालेले होते.

 

त्यानंतरही दोनदा भाजपच्या मदतीने मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री झालेल्या होत्या. वारंवार त्या विधानसभेत त्रिशंकू अवस्था आल्याने कुठलेही सरकार बनू शकत नव्हते आणि मध्यावधी निवडणुका होत राहिल्या. अशाच काळात दीड वर्षासाठी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपद भोगून झाल्यावर उरलेल्या मुदतीसाठी भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देण्याचे सौजन्य मायावतींनी दाखवलेले नव्हते. अर्थात, त्यामुळे भाजपचे सरकार पडले नाही. उलट मायावतींचे आमदार मात्र त्यांना सोडून, वेगळा गट बनवून भाजपसोबत राहिलेले होते. मायावतींचा मतदार त्यांच्या सोबत राहिला असला तरी, त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी आमदार प्रत्येकवेळी साथ सोडून अन्य पक्षात गेलेले आहेत. त्यांनी कायम मायावतींची हुकूमशाही व अरेरावीचा आरोप केलेला आहे. आताही नुसती आघाडी झाली आहे आणि जागावाटपच झाले आहे, तर त्यांनी परस्पर आपल्या भूमिका समाजवादी पक्षावरही लादायला आरंभ केला आहे. उद्या निकालानंतर त्यांना कोण वेसण घालू शकणार आहे? समजा वेळ आली तर त्याच मायावती भाजपच्या सोबत जाऊ शकतात आणि काँग्रेसशीही हातमिळवणी करू शकतात. त्यांचे पुरोगामित्व सत्तापदे व मतलबाशी असते. त्यामुळे ही आघाडी प्रत्यक्ष निवडणुकांपर्यंत म्हणजे आगामी लोकसभेसाठी मतदान होईपर्यंत तरी टिकेल किंवा नाही; याचीच शंका आहे. कारण, सहमतीने निर्णय घेणे हा मायावतींचा स्वभाव नाही. मग विषय पक्षांतर्गत असो वा मित्रपक्षांच्या आघाडीचा असो. त्यामुळेच १९९३ सालातला इतिहास पुन्हा घडण्यातला व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे. तो निकालापुरता घेऊन चालत नाही. मुलायम वा कल्याण सिंग यांच्या इतके अखिलेश यादव अनुभवी नाहीत आणि नुसत्या जागावाटपात यश मिळवल्याने त्यांनी बहनजींना जिंकले, असेही समजण्यात अर्थ नाही. कारण, यह तो सिर्फ झांकी है, पुरा तमाशा बाकी है।

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@