आज कोलकात्यात ममतादीदींच्या नेतृत्वाखाली होणार्या ‘युनायटेड इंडिया’ रॅलीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पाठिंबादर्शक पत्र पाठविले. काँग्रेसच्या दिवसेंदिवस सत्तेसाठी वाढत जाणार्या अगतिकतेचेच हे आणखीन एक द्योतक म्हणावे लागेल.
एकाच्याही मनगटात धड बळ नसलेल्या देशभरातील मोदीविरोधकांमध्ये सध्या संचारलेले ‘एकीचे बळ’ दाखविण्याची जणू स्पर्धाच रंगलेली दिसते. चंद्राबाबू नायडू, फारूख अब्दुल्ला, महाराष्ट्राचे जाणते शरद पवार आणि बुवा-भतिजाची जोडी आणि इतर लघु राजकारणी. मग या सगळ्यात बंगाली अस्मिता कशी बरं मागे राहील म्हणा. म्हणूनच, आज ममता बॅनर्जींनी कोलकात्यात ‘युनायटेड इंडिया’ रॅलीचे भव्य आयोजन केले आहे. या रॅलीत गठबंधन म्हणा, महागठबंधनवाले काय किंवा तिसर्या आघाडीच्या चुलीवर आयती लाकडं शेकणारे असे सर्व हौसेनवसेगवसे एका व्यासपीठावर येऊन ‘एकीचे बळ’ दाखवणार आहेत म्हणे. या रॅलीचे फळ काही का असेना, पण ‘मोदी हटाव’ या उद्देशाने पछाडलेल्यांना आता त्यांच्याविरोधात वातावरणनिर्मितीची एकही संधी दवडायची नाही. शेवटी, राजकारणी म्हटलं की, हे सगळे तसे संधिसाधूच आणि मोदीविरोधकांचा तर याबाबतीत कुणीही हात धरू शकणार नाही. ममतादीदींच्या या रॅलीला राहुल गांधी, सोनिया गांधी प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसले तरी त्यांचे नेते व्यासपीठावरून हातांच्या साखळ्या करत विजयी आवेशात हात मात्र उंचावताना दिसतील. एवढ्या मोठ्या मोदीद्वेषी सोहळ्यात राहुल गांधी का सहभागी होणार नाहीत, कोणास ठाऊक; मात्र चार ओळींचे फुटकळ पत्र लिहून या रॅलीला आपला पाठिंबा त्यांनी घोषित केला. आता दीदींनी राहुलकडे पाठिंबा मागितला की, नेहमीसारखा उतावीळपणा करत या महाशयांनी तो न सांगताच तसा देऊ केला, कोण जाणे... पण, ‘मोदींच्या विरोधात लढण्यासाठी आपण एकत्र आलेच पाहिजे,’ ही बाब देशातील दुसर्या क्रमाकांच्या राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांना एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला लेखी द्यायची वेळ आली, यातच सर्व काही समजावे. खरं तर सत्तेसाठीचा हा काँग्रेसी लाळघोटेपणा अजिबात नवीन नाही. यापूर्वीही कर्नाटकात क्षुल्लक जागा जिंकलेल्या कुमारस्वामींच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकून काँग्रेसने आपली राजकीय अगतिकता दाखवून दिली होतीच. दीदींना काल घोषित केलेला हा पत्ररूपी पाठिंबाही त्याचीच पुढची कडी.
राजकारणात व्यक्ती, परिस्थिती कधीही कालच्यासारखी आज असेलच असे नाही. म्हणूनच राजकीय पक्ष, राजकारणी आणि त्यांच्या भूमिका या कालसापेक्ष बदलत असतात. काहींच्या राजकीय कोलांटउड्या तर अगदी तोंडात बोटं घालायला लावणार्या. ममतादीदीही त्यापैकीच एक. एकेकाळच्या काँग्रेसवासी आणि कोणे एकेकाळच्या भाजपच्याही सोबती. पण, अगदी छोट्या-छोट्या फुटकळ कारणांवरून त्यांनी संपुआ, रालोआला राम राम ठोकले. काँग्रेसी तृणावरच वाढलेल्या दीदींनी मग बंगालात तृणमूलची पेरणी केली. डाव्यांंचा गड उद्ध्वस्त करणारी ही खमकी बंगाली वाघीण मग राष्ट्रीय राजकारणाच्या आखाड्यातही डरकाळ्या फोडू लागली. पण, आज दुर्देवाने पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी दीदींनाच स्वत:हून पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेस अध्यक्षांवर आली. हा तोच काँग्रेस पक्ष ज्याला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींसारखे एकाच घराण्यातले वारस लाभले. पण, गांधी घराण्याचे आणि काँग्रेसचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल की, हा आयता मिळालेला राजकीय वारसा त्यांच्या आजच्या पिढीला टिकवताही आलेला नाही... आणि या कधीकाळी देशातील सर्वात मोठ्या पक्ष ठरलेल्या काँग्रेस अध्यक्षांना दीदींचा पदर पकडायची वेळ आली. हे असे का झाले? तर त्याचे एकमेव कारण म्हणजे, एकाच घराण्यातील नेतृत्व पक्षावर वर्षानुवर्षे लादले गेले. त्यामुळे आज गांधी घराण्याला काँग्रेसमधून वजा केले तर बाकी उरेल ती फक्त शून्य. आज याच घराण्यातल्या युवराजालाही साहजिकच घराणेशाहीच्या अहंगडाने ग्रासले आहे. आपण म्हणू ती पूर्व दिशा, या न्यायाने मग हे गणित कच्चे असलेले युवराज बेछूट आरोप करत मोकाट सुटतात. आसपासची चार डोकी या युवराजांना काय बोलावे, कसे बोलावे, किती बोलावे यासाठी कानात मग कुजबुजताना दिसतात. त्यामुळे राजकीय अपरिपक्वता आणि अपरिहार्यता यांचा संगम म्हणजे आजचा हा दुबळा काँग्रेस पक्ष.
ज्या दीदींना आज काँग्रेसच्या या युवराजाने पत्ररूपी पाठिंबा धाडला, त्या दीदींच्याच ‘पोरिबर्तोन’ची 2016 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यानेच खिल्ली उडविली होती. बंगालमध्ये तरुणांना हाताला काम नाही, नवीन उद्योगधंदे नाहीत, दीदींनी बंगाली जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, म्हणून काँग्रेस विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा संघर्ष तेव्हा पाहायला मिळाला. पण म्हणतात ना, ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी ही गत. आज पूर्ण बहुमत काय, जेवढ्या आहेत त्याही लोकसभेच्या जागा सुरक्षित ठेवायच्या असतील, तर प्रादेशिक पक्षांच्या जोडगोळीच्या गणिताशिवाय काँग्रेसला दुसरा पर्याय नाही, हे समजण्याइतपत राहुल गांधी दुधखुळे नक्कीच नाहीत आणि त्यासाठीच हा सारा खटाटोप. पण, या बंगालच्या दीदी जाम चलाख. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या विजयानंतरही त्यांनी काँग्रेसचे अभिनंदन तर केले, पण या विजयाचे श्रेय राहुल गांधींना मात्र दिले नाही. राहुलच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीलाही दीदी अनुकूल नाहीत. राहुलबाबा तर त्यांचा अगदी ज्युनिअर. एवढेच काय तर द्रमुकच्या स्टॅलिन यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याचे केलेले आवाहनही दीदींना रुचले नव्हतेच. म्हणूनच जेव्हा जेव्हा या मोदीविरोधी आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा तरी कोण, असे दीदींना विचारले तेव्हा ते निवडणुकांच्या निकालांनंतरच ठरेल, असे उत्तर देऊन त्यांनी वेळ निभावून नेली. शिवाय, बंगालमध्ये खुद्द काँग्रेसी कार्यकर्त्यांचाच काँग्रेस-तृणमूल काँग्रेस यांच्या आघाडीला विरोध आहे. बंगालात काँग्रेसीच काय, तर सर्वच स्तरातील नागरिक दीदींच्या गुंडगिरीला पार विटले आहेत. त्यात दीदींचे हिंदूंना डावलून मुस्लीम लांगूलचालनाचे धोरण काँग्रेसच्या हक्काच्या मुस्लीम मतपेढीलाही त्यांच्यापासून हिरावून घेणारेच. त्यामुळे एकवेळ भाजप चालेल, पण बंगालात ममतादीदी नको, अशी स्थिती. परंतु, कार्यकर्त्यांच्या भावना, मतं यांना काँग्रेसमध्ये स्थान असते, तर आज दीदींच्या दरबारी अशी समर्थनाचा खलिता पाठविण्याची युवराजांवर वेळच आली नसती.
आज बंगालात होणारे शक्तिप्रदर्शन हे निव्वळ मोदीद्वेषापोटी एकवटलेल्या असंतुष्ट आत्म्यांची जत्राच ठरेल. कारण, साम, दाम, दंड, भेद काहीही करून मोदींना पराजित करणे, हेच या असंतुष्टांचे लक्ष्य. खरं तर यापैकी कुणीही सुशासन, स्थिर सरकार देण्यासाठी कटिबद्ध नाही. एकीच्या बळावर निवडून आलेच तरी ते बहुमताचे फळ सर्वार्थाने किडकेच ठरेल. कारण, आज त्या बहुमतासाठी रक्त आटविणारे, खतपाणी घालणारेच, उद्या फळात मनासारखा वाटा मिळाला नाही म्हणून अळ्या बनून तेच फळ गिळंकृतही करायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत. अशी राजकीय स्थिती देशाला अराजकाकडे ढकलणारीच ठरेल. यापूर्वीही भारतीय मतदारांना असे कुबड्यांचे सरकार किती चालते, याची प्रचिती आहेच. म्हणून मतदार अज्ञानी नाहीत, सूज्ञ आहेत, त्यामुळे ते निश्चितच नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपल्या देशाचे सुरक्षित भवितव्य सुपूर्द करतील, यात तीळमात्रही शंका नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/