मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका २ - १ अशी खिशात घातली. ही मालिका जिंकत विराटसेनेने ऐतिहासिक कामगिरी केली. महेंद्र सिंग धोनी आणि केदार जाधवच्या अर्धशतकाच्या दमावर भारताने २३१ धावांचे लक्ष सहजरित्या पार केले. त्यापूर्वी, युझवेंद्र चहलच्या फिरकीने ६ विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव २३० धावांमध्ये गुंडाळला. पहिले कसोटी मालिका आणि आता एकदिवसीय मालिका जिंकून विराटसेनेने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३१ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. भारताचा सलामीवीर अवघ्या ९ धावांवर, तर शिखर धवन २३ धावांवर तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि धोनीने डाव सावरण्याचा प्रयन्त केला. ३०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कोहली ४६ धावांवर बाद झाला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. त्यानंतर धोनीला सोबत देण्यासाठी आलेल्या केदार जाधवने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. धोनीने ८७ धावांची नाबाद तर जाधवने ६१ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद १२१ धावांची भागीदारी रचली.
भारताने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार कोहलीचा निर्णय सार्थ ठरवताना गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २३० धावांवर सर्वबाद केले आहे. युझवेंद्र चहलने चांगली गोलंदाजी करताना ४२ धावा देताना ६ गडी बाद केले. तर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ विकेट घेतले. ऑस्ट्रेलियाकडून पीटर हॅंड्सकॉम्बने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. त्यामुळे भारतासमोर २३१ धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाला भारतासमोर ठेवता आले. अखेरचे ४ चेंडू राखत भारताने हे लक्ष साध्य केले आणि मालिका जिंकून इतिहास रचला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/