जनरल करिअप्पा आणि ७० वा सेना दिवस सेना दिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |


भारतात दरवर्षी १५ जानेवारी रोजी लेफ्टनंट जनरल (पुढे फील्ड मार्शल) के. एम. करिअप्पा यांच्या भारतीय लष्कराच्या शीर्षपदाचा कारभार हाती घेण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी इंग्रज काळातील भारतीय लष्कराचे अंतिम ब्रिटीश शीर्ष अधिकारी जनरल रॉय बुचर यांच्याकडून हा पदभार स्वीकारला होता. सेना दिनानिमित्त भारतीय लष्कराची माहिती देणारा हा लेख...

 

१५ जानेवारी, १९४९ या दिवशी भारताचे शेवटचे इंग्रज सरसेनापती जनरल रॉय बुचर यांच्याकडून भारतीय अधिकारी जनरल करिअप्पा यांनी सरसेनापतीपदाची सूत्रे स्वीकारली.

 

सेना दिवसाच्या परंपरेचा इतिहास

स्थलसेना म्हणजेच भूदल किंवा लष्कर हे कोणत्याही सैन्याचे सगळ्यात महत्त्वाचे अंग असते. आधुनिक काळात नौदल आणि हवार्ईदल हीसुद्धा महत्त्वाचीच आहेत, पण भूदलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण, आपल्या देशाची भूमी प्रत्यक्षात ताब्यात ठेवणे, संरक्षण करणे हे काम भूदलच करीत असते. हवाईदल शत्रूची भूमी बॉम्बवर्षावाने भाजून काढेल, शत्रूची ठाणी उद्ध्वस्त करेल, नौदल शत्रूच्या व्यापाराची नाकेबंदी करून त्याला गलितगात्र करेल, पण यानंतरचा टप्पा म्हणजे शत्रूची भूमी ताब्यात घेणे. ते काम भूदलच करते.

 

प्राचीन परंपरा

भारताची लष्करी परंपरा फार प्राचीन आहे. आमचे सगळे देव हे शस्त्रधारी आहेत. भगवान विष्णू हा शारंग धनुष्याने किंवा सुदर्शन चक्राने, भगवान शिव हा पिनाक धनुष्याने किंवा त्रिशूलाने, माता जगदंबा ही खड्गाने किंवा भाल्याने युद्ध करतात. रामायण-महाभारत काळातले रथी, अतिरथी, महारथी हे महान योद्धे चतुरंग दळासमवेत युद्ध करीत होते. सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य, सम्राट शालिवाहन या दिग्विजयी राजांनी ग्रीक-शक-हूण-कुशाण आदी परकीय आक्रमक पराभूत करून पचवून टाकले. छत्रपती शिवरायांनी आपल्या भवानी तलवारीच्या तेजाने पाचही पातशाह्या थरथरा कापविल्या, तर बाजीराव पेशव्याने आपल्या तुफानी घोडदौडीने मुघल पातशाही खिळखिळी करून टाकली.

 

आधुनिक लष्कर

स्वतंत्र भारताच्या आजच्या अत्याधुनिक लष्कराचा पाया मात्र इंग्रजी राजवटीत घातला गेला. इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने पगारी सैनिक म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक आपल्या सैन्यात भरती केले. इंग्रजी सेनापतींच्या तालमीत या जवानांनी युरोपातले अत्याधुनिक युद्धतंत्र आत्मसात केले. मूळचाच शूर असलेला भारतीय सैनिक आधुनिक युद्धतंत्रात पारंगत झाल्यावर युरोपीयनांनाही भारी ठरतो, याचा प्रत्यय १९१४ ते १८ च्या पहिल्या महायुद्धात आला. इंग्रजी पलटणीने मार खाल्लेल्या रणक्षेत्रात भारतीय पलटण उतरविण्यात आली. या पलटणीने संयम, चिकाटी आणि योग्यवेळी जबरदस्त आक्रमण यांचा मिलाफ करून समारेच्या कडव्या जर्मन सैन्याला माघार घ्यायला लावली. ही घटना फ्रान्समध्ये घडली. फ्रेंच जनता भारतीय सैनिकांच्या या पराक्रमावर एवढी खुश झाली की, यानंतर कुठेही भारतीय सैनिक दिसले की, ‘हिंदू आले, हिंदू आले,’ या शब्दांनी त्यांचे स्वागत केले जात असे.

भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे जाणते नेतृत्व इंग्रजांची नोकरी करणार्‍या भारतीय सैनिकांकडे कोणत्या दृष्टीने पाहत होते, त्याचा एक फार सुंदर किस्सा लेफ्टनंट जनरल शंकरराव पाटील-थोरात यांनी आपल्या आत्मचरित्रात दिला आहे. इंग्लंडच्या सँडहर्स्ट मिलिटरी अ‍ॅकेडमीतून आपले प्रशिक्षण पूर्ण करून थोरात भारतात परत येत होते. त्यांच्याच जहाजात योगायोगाने लाला लजपतरायही होते. दोघांची खूप मैत्री झाली. लालाजींच्या व्यक्तिमत्त्वानेे तरुण थोरात अगदी भारावून गेले. ते लालाजींना म्हणाले, “भारतात पोहोचल्यावर मी ही इंग्रजांची नोकरी सोडून देतो आणि तुमच्यासोबत स्वातंत्र्य आंदोलनात येतो.” त्यावर लालाजी उत्तरले, “छे, छे! अहो, हा इंग्रज आज ना उद्या भारतातून जाणारच आहे. त्यानंतर स्वतंत्र भारताला तुमच्यासारख्या कुशल, तरबेज सेनानायकांची अत्यंत गरज आहे. तेव्हा त्या क्षणावर दृष्टी ठेऊन तुमची गुणवत्ता सतत वाढवित राहा.”

 

१९४७ ची कसोटी

गुणवत्ता वाढवित राहण्याचा लालाजींचा हा आदेश थोरातांसकट सगळ्याच भारतीय सेनापतींनी पाळला. याचा प्रत्यय स्वातंत्र्यानंतर लगेचच आला. कारण काश्मीर हिसकावून घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या वेशात काश्मीरवर आक्रमण केले. दुसर्‍या महायुद्धात गाजलेले ब्रिटिश सेनानी जनरल क्लॉड ऑकिनलेक हे यावेळी भारताचे सरसेनापती होते. पण ते निवृत्तीच्या वाटेवर होते. त्यामुळे अतिशय त्वरेने लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांना लष्कराच्या पश्चिम विभागात प्रमुखपदावर आणण्यात आले. करिअप्पा वेगाने कामाला लागले. परिस्थिती कमालीची प्रतिकूल होती. फाळणीमुळे सैन्याची रचना विस्कळीत झाली होती. साधनसामुग्री अपुरी होती. निसर्ग प्रतिकूल होता.

 

सगळ्यात मुख्य म्हणजे राजकीय नेतृत्त्वाला सैनिकी पराक्रम म्हणजे ‘युद्धखोरपणा’ असे वाटत होते. पण अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीतून पुढे सरसावतो, तोच खरा सैनिक, हे जनरल करिअप्पा आणि त्यांच्या सहायक अधिकार्‍यांनी दाखवून दिले. पाकिस्तानी मगराने जवळजवळ पूर्ण गिळलेले काश्मीरचे माणिक यांनी पराक्रमाची शर्थ करून खेचून आणले. करिअप्पांचे सहायक सेनानी मेजर जनरल थिमय्या यांनी तर जगातल्या सर्वोच्च उंचीवरच्या (११ हजार ५७५ फूट) झोजिला खिंडीत ‘७ वी लाईट कॅव्हेलरी’ ही रणगाडा तुकडी नेऊन उभी केली. जगभरचे सर्व सेनापती आश्चर्याने थक्क झाले, कारण कोणत्याही सेनापतीने इतक्या उंचीवरच्या ठिकाणी रणगाडा नेण्याचे धाडस केलेले नव्हते आणि हे रणगाडे तरी कोणते तर दुसर्‍या महायुद्धाअखेर ब्रिटनने जुनाट म्हणून काढून टाकलेले.

 

लष्कराचे मुख्य विभाग

भूदलाचे मुख्यतः दोन विभाग असतात. पहिला झुंजी विभाग म्हणजे ‘कॉम्बॅट आर्म्स’. यात इन्फन्ट्री, एअरबोर्न इन्फन्ट्री, मॅकेनाईज्ड इन्फन्ट्री, पॅराशुट रेजिमेंट, आर्मर्ड कोअर, एव्हिएशन कोअर, आर्टिलरी, एअर डिफेन्स आर्टिलरी, इंजिनिअर्स कोअर, सिग्नल कोअर असे उपविभाग असतात. दुसरा विभाग म्हणजे मदतगार विभाग किंवा ’सपोर्टिंग सर्व्हिसेस’. यात आर्मी सर्व्हिस कोअर, मेडिकल कोअर, ऑर्डनन्स कोअर, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड मेकॅनिकल कोअर, मिलिटरी पोलीस हे उपविभाग असतात. झुंजी विभागाइतकाच मदतगार विभागही महत्त्वाचा असतो. १९४७-१९४८ च्या युद्धात हे दोन्ही विभाग समन्वयाने उभे ठाकले किंवा जनरल करिअप्पांच्या उत्कृष्ट नेतृत्वाने त्यांचा उत्तम समन्वय घडवून आणला. म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करीत भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला खडे चारले. राजकीय नेतृत्वाने कचखाऊपणा केला नसता तर, भारतीय सैन्य काश्मीर पूर्ण मुक्त करूनच थांबले असते.

 

१९६२ च्या भारत-चीन युद्धात मदतगार विभागाला आपले काम नीटपणे करता आले नाही. त्याचा दोष राजकीय नेतृत्त्वाकडेच जातो, पण त्याचा परिणाम असा की, नेफा सरहद्दीवरच्या आपल्या सैनिकांना गरम कपडे, अन्नधान्य, दारूगोळा याचा नीट पुरवठाच झाला नाही. असो. १९४७-४८ च्या या भारत-पाक युद्धादरम्यान भारताच्या सरसेनापतीपदी तीन इंग्रज सेनापती येऊन गेले. जनरल क्लॉड ऑकिनलेक जाऊन त्यांच्या जागी जनरल रॉब लॉकहार्ट आणि मग जनरल रॉय बुचर हे आले. खरे म्हणजे हे तिघेही उत्तम सेनापती होते. दुसर्‍या महायुद्धात पराक्रम गाजवलेले होते. पण अखेर ते इंग्रज होते. ते भारत सरकारच्या हुकूमाप्रमाणे नव्हे तर लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांच्या हुकूमाप्रमाणे वागत होते आणि माऊंटबॅटन यांचे धोरण उघडउघड भारतविरोधी व पाकिस्तानी पक्षपाती होते. अखेर तो पक्षपात सहन करणे सर्वोच्च राजकीय नेतृत्त्वालाही अशक्य झाले. जनरल रॉय बुचर यांना नारळ देण्यात आला आणि जनरल कोदंडेरा मदाप्पा करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनापती बनले. तो दिवस होता १५ जानेवारी १९४९.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@