दीडशहाणी स्वरा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018   
Total Views |

 

 

 
आता ही कोण म्हणून विचारू नका! सामाजिक क्षेत्रातील तिच्या योगदानाबद्दलही चकार शब्द काढायचा नाही हं कुणीच. तिच्या नैतिक अधिकारांबाबतही प्रश्नचिन्ह उभे करायचे नाही. भीमा-कोरेगाव प्रकरणातून घडलेल्या दंगलीसंदर्भात पाच जणांना अटक झाली म्हणून मनातली गरळ ओकायला सिद्ध झालेल्या या सन्माननीय कलावंत, त्याच मुद्यातून उफाळलेल्या दंगलीत सारा महाराष्ट्र पेटत असताना कुठे झोपा काढत होत्या, असा बोचरा सवालही विचारायचा नाही. अगदी चुकूनसुद्धा. हो! हा, लोकशाही व्यवस्था अनुसरलेला सर्वात मोठा देश आहे. इथला प्रत्येक नागरिक अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा धनी आहे. कुणाहीविरुद्ध काहीही बरळण्याचा अधिकार खिशात घेऊन फिरतो इथे प्रत्येक जण. सामाजिक कार्यात, देशहितार्थ आपले योगदान किती, हा प्रश्न महत्त्वाचा नसतोच कधी. स्वत:च्या कर्तबगारीच्या मापदंडांचा विचार न करता, पंतप्रधानांपासून टाटा-बिर्लांपर्यंत कुणावरही तोंडसुख घेण्याचे स्वातंत्र्य तर सर्वांच्याच बाबतीत अबाधित राहिले असलेला देश आहे हा. त्याचा परिणाम असा आहे की, वर्तमानपत्रातल्या अग्रलेखापासून तर सोशल मीडियातल्या स्वत:च्या अकाऊंटचा उपयोग-दुरुपयोग करीत वाट्टेल तसे बरळणार्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. आपण काय बोलतोय्‌, कुणाबद्दल बोलतोय्‌, तसले बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे काय, असलाच तर त्याचा किती मर्यादेपर्यंत वापर करायचा, असले प्रश्न तर उद्भवतही नाहीत मनात कुणाच्या. कन्हैयाकुमार, राहुल गांधींनी संघाविरुद्ध चालवलेल्या अपप्रचार मोहिमेपासून तर परवा स्वरा भास्कर नावाच्या एका अभिनेत्रीचे मन मानेल तसे बरळण्यापर्यंत... सर्वांचा समावेश या एकाच वर्गवारीत व्हावा...
 

बरं, स्वत:च्या वैचारिक बैठकीपलीकडेही एक विश्व आहे, याची साधी जाण जपण्याचीही गरज वाटत नाही इथे कुणलाच. आपल्याला न पटणार्या विचारांचाही आदर केला जाऊ शकतो, नव्हे, तो केला पाहिजे, याची जाणीव तर कल्पनेपलीकडची ठरतेय्आताशा. अभिव्यक्तिस्वातंत्र्य फक्त स्वत:पुरते मर्यादित असल्याचा गैरसमज करून बसलीय्काही मंडळी तर! संघ असो वा मग भाजपा, त्याचे विचार न पटणारे लोकही असू शकतात. आहेत. मोठ्या संख्येत आहेत. त्यांची स्वत:ची स्वतंत्र अशी वैचारिक बैठक आहे. ती संघालाही मान्य आहे. म्हणूनकाही, स्वयंसेवक काठ्या घेऊन धावत नाहीत त्यांच्यामागे. पण, केंद्रात भाजपाचे सरकार स्वबळावर सत्तारूढ झाल्यापासून जो पोटशूळ त्याच्या विरोधकांना उठला आहे, तो केवळ राजकीय नाही. द्वेष आणि दु:स्वासाचा दुर्दैवी गंध त्याला येऊ लागला आहे आताशा. सरकारच्या बदनामीच्या षड्यंत्रापासून तर त्याला खाली खेचण्यासाठीच्या विविधांगी क्लृप्त्यांपर्यंत... राजकारणाच्या सारिपाटावरचे सारेच डाव एकदम खेळून घेण्याची घाई झालेली दिसते आहे सगळ्यांना. ‘आमीर खानची बायकोएवढ्या एका बिरुदाच्या भरवशावर आयुष्य जगणार्या किरण रावला राहण्याकरिता हा देश असुरक्षित वाटणे असो, की रोहित वेमुलाच्या निमित्ताने मागासवर्गीयांवरील अन्यायाचे अख्खे नाटक उभे करण्याचा प्रयत्न असो... खून होण्यापूर्वी गौरी लंकेशची, एक पत्रकार म्हणून किती ख्याती होती, कुणास ठाऊक! पण, त्यांच्या दुर्दैवी हत्येचे जे राजकारण त्यांच्या पश्चात संपूर्ण देशभरात रंगले, ते बघितल्यानंतर त्यामागील डोकी आणि त्या सुपीक डोक्यातला विखार लपून राहिला नाही.

 

पण करता काय? लोकशाहीव्यवस्था स्वीकारून बसलेला देश आहे हा. कुणालाही, कसेही वागण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे इथे. परवा ती स्वरा भास्कर नावाची एक चित्रपट कलावंत केवढी मोठमोठी विधाने करून गेली? म्हणाली, गांधीहत्येचा आनंद साजरा करणारी मंडळी आज सत्तेत बसली आहे, त्यांना अटक करून जेलमध्ये टाकायचे काय, खालिस्तानच्या आंदोलनादरम्यान काहींनी भिंद्रानवालेंना संतपद बहाल केले होते. त्यांनाही टाकायचे का गजाआड, मग आज भीमा-कोरेगाव प्रकरणात हात असल्याच्या आरोपावरून डाव्या विचारांच्या लोकांना का अटक केली जाते आहे... असल्या कित्येक प्रश्नांचा भडिमार केला बाईसाहेबांनी. आता ही स्वरा भास्कर कोण, असा सवाल आपसूकच सर्वांच्या मनात उभा राहिला असणार एव्हाना! स्वाभाविकच आहे ते. कारण हे नाव तसे फार जगप्रसिद्ध नाही. बरं, ते जगप्रसिद्ध व्हावे एवढी कर्तबगारीही नाही त्या व्यक्तिमत्त्वाची. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तिच्या दखलपात्र योगदानाचीही नोंद झालेली आढळत नाही कुठेच. पण क्रिकेट, राजकारण आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांच्या कुठल्याच प्रकारच्या कर्तबगारीचा, योगदानाचा विचार न करता त्याला डोक्यावर घेऊन बेधुंद नाचण्याच्या भारतीय जनतेच्या अफलातून वागण्याचा हा परिणाम आहे.

 

काही चित्रपटांत सहायक कलावंत म्हणून आणि बोटांवर मोजण्याइतक्या चित्रपटांत मुख्य कलावंताच्या भूमिकेत वावरण्याची संधी मिळताच स्वरा भास्करसारख्या अभिनेत्रीला राजकारणापासून तर समाजकारणापर्यंतच्या सर्वच क्षेत्रांवर भाष्य करण्याचा अधिकार आपल्याला आपसूकच प्राप्त होत असल्याचा भास होतो. थेट सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची हिंमत तिला होते. खरंतर गेल्या काही दिवसांत केवळ डाव्या विचारांच्याच लोकांना अटक झालेली नाही. ‘सनातनच्याही काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याही घरात धाडसत्र आरंभण्यात आले आहे. पण, स्वराने अश्रू ढाळले ते तिच्या पसंतीच्या निवडक लोकांसाठी. त्यातही डाव्या विचारसरणीच्या धुरीणांसाठी. सनातनचे कार्यकर्ते काय, मेले काय नि वाचले काय. फरक काय पडतो कुणाला! वाचले पाहिजे ते कॉंग्रेसचे कार्यकर्ते. बचाव केला पाहिजे तो, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षणाच्या नावाखाली बिनधास्त धिंगाणा घालणार्यांचा. स्वराही चिंता वाहतेय्ती त्याच धाटणीतल्या लोकांची. भीमा-कोरेगावच्या मुद्यावरून पेटलेल्या दंगलीची झळ ज्यांना बसली त्यांच्याशी काय नाते तिचे? तसे तर भीमा-कोरेगाव प्रकरणात आतापर्यंत निदान 10 जणांना अटक झाली आहे. पण, कालपर्यंत स्वराला कंठ फुटला नव्हता. सापाची शेपटी वळवळली ती सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, वरवरा राव, अरुण फरेरा, वरनॉन गोन्सॉल्वीस यांना पोलिसांनी हात लावल्यावर! मग आधीच्या पाच जणांना अटक झाली तेव्हा मूग गिळून गप्प का बसली होतीस बये, असा सवाल विचारायला हवा तिला खरंतर! ती शहाणी तर थेट गांधीहत्येपर्यंत जाऊन पोहोचली. एका षड्यंत्रातील सहभागाचे, अटकेची कारवाई करण्याइतपत पुरावे हाती लागल्यानंतर या चार-पाच जणांना हात लावला पोलिसांनी, तर केवढा गहजब झाला! गांधीहत्या आणि आणिबाणीचा काळ आठवा जरा. पुरावे गेले उडत, असे म्हणत निरपराधांची जी धरपकड चालवली गेली, कायद्याची खिल्ली उडवत जी मुजोरी तत्कालीन सत्ताधार्यांनी त्या वेळी केली, ती विसरू शकेल हा देश कधीतरी? पण, त्याविषयी स्वरा भास्कर नावाची ही अभिनेत्री कधी काही बोलल्याचे स्मरत नाही.

 

भिंद्रानवालेंना संतपद बहाल करणार्यांवर कारवाई करणार का, हा सवाल करण्यापूर्वी एकदा जरा आपल्या कर्तबगारीचा, यापूर्वीच्या कोणकोणत्या प्रकरणात आपण असले काही बरळलो होतो, याचाही मागोवा घ्यावाच तिने कधीतरी. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अपवाद वगळता, अन्य कुठल्या अधिकारांतर्गत आपल्याला या संदर्भात बोलण्याचा हक्क पोहोचतो, याचाही अदमास कधीतरी घ्यावाच तिने. आणि इतरांनीही. केवळ रुपेरी पडद्यावर झळकण्याच्या निकषांवर आपण कोणत्या कुवतीच्या लोकांना डोक्यावर घेऊन मिरवतो, हेही ध्यानात येईल सर्वांनाच या निमित्ताने. रसिकांच्या जिवावर, त्यांच्याच खिशात हात घालून अमाप पैसा कमावणारी ही मंडळी, वेळ आली की रंग बदलते! धर्मनिरपेक्षतेचा त्यांच्या चेहर्यावरचा बुरखा फक्त चित्रपटात काम करण्यापुरताच मर्यादित असतो. तिथनं बाहेर पडलं की त्यांचे चेहरे अन्संकुचित विचार, दोन्ही उघडे पडलेले असतात. या देशातले कित्येक अर्थतज्ज्ञ नोटबंदीनंतरच्या काळात उदयाला आलेत! आता सार्वत्रिक निवडणुकीचा मुहूर्त जसजसा जवळ येतोय्‌, तसतशी स्वरासारख्या दीडशहाण्यांची गर्दीही वाढत जाणार आहे...

@@AUTHORINFO_V1@@