भारताच्या अंतर्गत बाबींच्या अशा संदर्भांना भारत नेहमीच नाकारत आला आहे आणि यापुढेही नाकारेल. तसे पाहता भारताने यापूर्वीदेखील स्पष्ट केले आहे की, भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा ‘ओआयसी’ला कुठलाही अधिकार नाही आणि ओआयसी तसेच तिच्या सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या अंतर्गत बाबींच्या संदर्भात चर्चा करण्याची अजिबात गरज नाही. आता प्रश्न राहतो की, स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांत सांगूनही पाक असे का वागतो? तर बहुदा त्याचे कारण पाकच्या काश्मीरबाबत भूमिकेला अथवा जी कथा पाकिस्तान रंगवत आहे त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने केव्हाच नाकारले आहे, हे असावे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतदेखील काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता आणि सवयीप्रमाणे भारतावर अनेक आरोप केले होते. भारताने शांततेऐवजी राजकारणाला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे चर्चा रखडल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद कुरेशी यांनी केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत शनिवारी पाकिस्तानने आपली बाजू मांडली, त्यावेळी ते बोलत होते. “भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणारी चर्चा दोन्ही देशांमध्ये शांतता नांदण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली संधी होती, पण भारताच्या हेकेखोरपणामुळे त्यांनी ती संधी तिसर्यांदा गमावली. भारताकडून शांततेऐवजी राजकारणाला प्राधान्य दिले गेले,” असे ते म्हणाले. काश्मीर वादामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थिरता निर्माण होण्यास अडचणी येत आहेत. गेल्या ७० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबितच आहे. हे सगळे कोण बोलत आहे, हे न समजण्याइतके जग आणि भारतीय खुळे नाहीत. सर्व मुद्दा विस्तृतपणे उल्लेखित करण्याचे कारण इतकेच की, पाकच्या या सर्व भाष्यामागे दोन शक्यता असू शकतात.
१) सिपेककोंडीमुळे पाक आजमितीस चीनच्या विळख्यात सापडला आहे. तसेच, अमेरिकेनेदेखील पाकच्या संरक्षण निधीत सुमारे १५० कोटी डॉलर्सची कपात केली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेने जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पाकला कर्ज देण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाकची मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडी झाली आहे. तसेच, दुसरीकडे अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीन व अमेरिका यांच्यात व्यापारयुद्धाचा भडका उडाला आहे. आता जर चीन-अमेरिका व्हाया पाक असा त्रिकोणी विचार केला तर जाणवते की, अमेरिकेने पाकला कोंडीत पकडले आहे. इकडे भारत व अमेरिका संबंध सुदृढ झाले आहेत. अमेरिकेने चीनला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे ‘शत्रूचा मित्र आपला शत्रू आणि तोही शेजारी’ असे समीकरण बांधून पाकच्या तोंडून चीन काश्मीर मुद्दा जागतिक पटलावर आणण्याचा प्रयत्न करत असावा, ही शक्यता नाकारता येत नाही. चीनच्या अशा खेळीमुळे पाकला त्यांच्या समस्यांपासून देशांतर्गत चर्चा आणि जागतिक नेतृत्वाचे लक्ष विचलित करण्याचे साधन सहज उपलब्ध झाले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/