नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षली कनेक्शनप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना केलेल्या अटकेचे सर्वोच्च न्यायालयाने समर्थन केले आहे. या पाच जणांच्या अटकेत मध्यस्थी करण्यास न्यायालयाने नाकार दिला. या पाच जणांच्या अटकेत कोणतेही राजकारण नसल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर पाच जणांना पोलीस कोठडी मिळावी ही पोलिसांची मागणी फेटाळून लावली असून त्यांच्या नजरकैदेत ४ आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे.
वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे व पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या सर्वांना त्यांच्याच घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या या कारवाई विरोधात रोमिला थापर, देवकी जैन, प्रभात पटनायक, सतीश देशपांडे व माया दारुवाला यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/