नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपासून निकालांचा धडाकाच लावल्याचे दिसत आहे. गेल्या २ दिवसांपासून अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहेत. आजही सर्वोच्च न्यायालायने सबरीमाला मंदिराबाबत ऐतिहासिक निर्णय दिला असून केरळमधील या मंदिरातील महिलांची प्रवेश बंदी न्यायालायने उठवली. सबरीमाला मंदिरात महिलांना पूजा करण्याचा अधिकार देखील यावेळी देण्यात आला. ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने चार विरुद्ध एक अशा फरकाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला.
करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात मासिक पाळीचे कारण पुढे करून १० ते ५० वर्षाच्या महिलांना प्रवेश बंदी होती. याविरोधात इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने २००६ साली याचिका दाखल केली होती. यावेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा म्हणाले की, "आस्थेच्या नावावर लिंगभेद केला जाऊ शकत नाही. कायदा आणि समाजातील सर्वांना बरोबरीने पाहिले जावे. महिलांसाठी दुहेरी मापदंड असता कामा नये कारण यामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी केली जाते. महिलांना देखील समानतेची वागणूक मिळाली पाहिजे."
गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर अखेर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या घटनापीठाने महत्वपूर्ण निर्णय सुनावला. या घटनापीठामध्ये न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. न्या. दीपक मिश्रा, न्या. चंद्रचूड, न्या. नरिमन, न्या. खानविलकर यांनी महिलांच्या बाजूने निर्णय दिला तर तर न्या. इंदू मल्होत्रा यांनी सबरीमाला मंदिराच्या बाजूने निकाल दिला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/