समाजही करेल ‘साईड ट्रॅक’
थोरली पात कोण, हे आतापर्यंत सूज्ञ वाचकांनी ओळखले असेलच. या थोरल्या पातीने ज्याच्याशी दोस्ती केली, तोही स्वतःला मुस्लिमांचा स्वयंघोषित अजिम-ओ-शान-शहेनशहा समजतो. या दोन स्वयंघोषित अजिम-ओ-शान-शहेनशहा म्हणे हिंदुस्तानचे तख्त जिंकायचे आहे. आता त्यासाठी धाकली पाती राजकुमार राहुलची ‘आय काँग्रेस’ म्हणे थोरल्या पातीला पसंत आहे. मात्र, राष्ट्रवादी पक्ष नापसंत आहे. कारण काय तर म्हणे, काँग्रेस निधर्मी आहे. राष्ट्रवादी निधर्मी नाही.(वर शरद पवार निधर्मी आहेत, अशी मखलाशीही थोरल्या पातीने केली आहे). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाज विसरला नाही. स्वातंत्र्यानंतर रझाकारांच्या कृत्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही समर्थन केले नसेल किंवा जर ते आता असते तर धार्मिक विद्वेष वाढविणाऱ्या आणि ५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा २५ कोटी- १०० कोटी काय करतील अशी दुष्ट, हिंसात्मक देश आणि समाजविद्रोही भाषा बोलणाऱ्या सध्याच्या एमआयएम पक्षालाही त्यांनी दारात उभे केले नसते. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला डावलण्याची एकही संधी सोडली नाही. बाबासाहेब हे मत्सर किंवा वैर मनात ठेवून वागणारे नव्हते. ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’ असा मंत्र जपणाऱ्या डॉ. बाबासाहेबांना काँग्रेसचे वास्तव रूप माहिती होते म्हणूनच ते काँग्रेसला ‘जळकेघर’ म्हणाले. (डॉ. बाबासाहेब द्रष्टा होते. खरेच काँग्रेसच्या जळक्या घरामुळे देश विविध समस्यांनी होरपळला.) मात्र, महामानवाचे नाव आहे म्हणून आणि केवळ त्यामुळेच समाजात, देशात इज्जत मिळत असलेले प्रकाश आपल्या थोर आजोबांचे विचार विसरले आहेत. अर्थात, प्रकाश यांनी काँग्रेसला साथ दिली काय किंवा कोलांटउडी घेत भाजपलाही साथ दिली काय, त्यामुळे काही फरक पडत नाही. कारण, सत्तेसाठी वाट्टेल ती समीकरणे जुळवताना प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ देशप्रेमी आणि समाजशील विचारांना सरळसरळ साईड ट्रॅक दाखवला आहे. त्यामुळे प्रकाश ज्यांच्याशी युती करतील, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून मानणारा समाजही निश्चितपणे साईड ट्रॅक करेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/