सणांतील विकृतीला खतपाणी नकोच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |




हिंदूंनीच आपल्यातल्या वाईट चालीरितींवर कोरडे ओढले नाहीत, तर त्याचा फायदा घेत हिंदूविरोधी, नास्तिक, हिंदू श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणणारे लोकच या मोहिमेचे, प्रबोधनाचे नेतृत्व आपल्या हाती घेतात आणि हिंदूंना, हिंदुत्वाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. म्हणूनच अशा लोकांना आपल्यातल्या वाईटपणाचा, अवगुणांचा फायदा घेता येऊ नये, असे वाटत असेल तर आपणच अशा गोष्टींना मनापासून विरोध केला पाहिजे.


गेल्या काही वर्षांत गणपती विसर्जन मिरवणुकांना डीजेच्या दणदणाटाने निराळेच वळण लागल्याचे वारंवार निदर्शनास आले. नवजात शिशू, लहान मुले, गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांच्याच आरोग्याशी खेळणाऱ्या या डीजेच्या दणदणाटाला वेळोवेळी विरोधही झाला. १०० डेसिबलपासून आवाज सुरू होणाऱ्या डीजेच्या विरोधात त्यामुळेच न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या, तर डीजे हवाच असा आग्रह धरणाऱ्यांनीही न्यायालयात आपले म्हणणे मांडले. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भातला निकाल देत गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावरील बंदी कायम ठेवत डीजेची बाजू घेणाऱ्यांना झटका दिला. राज्यात एका बाजूला ही घटना घडत असतानाच तिकडे साताऱ्यात खा. उदयनराजे भोसले यांनी डीजे वाजवणारच, अशी आडमुठी भूमिका घेतल्याचेही दिसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनीच डीजे वाजविण्याचा हट्ट धरणे, हा खरे म्हणजे शिवरायांनी घालून दिलेल्या रयतेच्या हिताच्या आणि कायद्याच्या राज्याच्या आदर्शांचा अपमानच. अर्थात, स्वतःचीच मर्जी गाजवणाऱ्यांकडे हे समजण्याइतका विवेक असेलच, असे नाही. दुसरीकडे गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यावर अडून बसणाऱ्यांचे याबाबत अनेकानेक युक्तिवाद असतात. म्हणजे, हे हिंदूंच्या सणांवरील आक्रमण असल्यापासून ते इतरांच्या सणांवेळी असे बंदीचे आदेश का देत नाहीत, इथपर्यंत निरनिराळे आरोप केले जातात. पण, हिंदूंच्या उत्सवांना, सणांना मागील काही काळात मिळालेले विकृत स्वरूप पाहता, हे खरेच आपलेच सण आहेत का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे या लोकांच्या गावीही नसते.

 

डीजेचाच मुद्दा घेतला तर आज या दणदणाटातून नेमके कोणते हिंदू धर्मसंवर्धनाचे, धर्मसुधारणेचे, धर्माचरणाचे काम केले जाते, याचे उत्तर डीजेसमर्थकांनी नक्कीच द्यावे. उलट डीजेच्या वापरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणची राजकारणी मंडळीच उतरल्याचे दिसून येते. कोणताही सण आला की, त्याचा वापर सवंगतेसाठी करणे, पैशांची उधळपट्टी करत झुंडीच्या झुंडी उभ्या करणे आणि आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेणे, हा शिरस्ताच या लोकांनी निर्माण केला. धर्म, शास्त्र, सण, उत्सव राहिला बाजूलाच, उलट दुसऱ्याच कुठल्या तरी विकृततेचा सोहळा करण्याचे नापाक कृत्य राजकारण्यांच्या पुढाकाराने सर्वत्र सुरू झाले. हिंदू धर्माचे नाव घेऊन याच लोकांनी हिंदू सणांना अन् उत्सवांना बदनाम करण्याचे धोरण अवलंबले. हिंदू धर्मात सगळ्याच किंवा प्रत्येक वा कोणत्याही नव्या गोष्टींचा समावेश करण्याची मुभा वा लवचिकता असली तरी त्याचा अर्थ अपप्रवृत्तींनीही धर्माच्या नावाने कल्ला करत त्यात पाय रोवावे, असे होत नाही. आजकाल गणेशोत्सव असो वा नवरात्री वा दहीहंडी, हिंदूंच्या या प्रत्येकच उत्सवात अपप्रवृत्ती शिरल्याचे आणि या अपप्रवृत्ती म्हणजेच धर्माचे अधिष्ठान होऊन बसल्याचे सगळीकडेच दिसते. अचकट-विचकट गाणी, अंगविक्षेप, डीजे, डॉल्बी म्हणजेच हिंदू सण असाच एकूण मामला झाला, ज्यातून कित्येकांनी आपले अंतस्थ हेतू साधण्याचा प्रयत्न केला. उल्लेखनीय म्हणजे, या प्रकाराला कोणताही एक पक्ष जबाबदार आहे, असे नव्हे, तर सर्वच पक्षांतल्या राजकारण्यांनी एकाला झाकावे आणि दुसऱ्याला दाखवावे, असे वर्तन केले. राजकारण्यांव्यतिरिक्त बाकी संस्था, संघटनांनीही याचा उपयोग आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी करून घेतला. गणपती-दहीहंडीत डीजे आणि गणपती वाहत्या पाण्यातच विसर्जित करण्याचा अट्टाहास या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आणि स्वतःभोवती हितसंबंधीयांचा गोतावळा निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती. ज्यांचा सण-उत्सव आणि धर्म सोडून अन्य प्रत्येक गोष्टींशी संबंध असतो, ज्यातून फक्त वाईटाची रुजवण होते.

 

गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी वा इतर कुठलाही सण समाजाला एकत्र आणण्यासाठी, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात समूहभावनेची जाणीव निर्माण करणारी, तसे संस्कार देणारी परंपरा. पण, या सगळ्यालाच तिलांजली देत हितसंबंधीयांकडून त्याचे स्वरूपच विचित्र आणि विकृत केले गेले. राजकीय पुढारी आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणारे गट, अशा दोघांनीही एकमेकांना पूरक वर्तणूक करत ‘तुम्ही द्या, आम्ही घेतो’, ‘आम्ही मागतो, तुम्ही द्या,’ अशीच भूमिका घेतली. सण-उत्सवांत टी-शर्ट छापण्यापासून ते मंडप उभारणे, मिरवणुकीसाठीचा ट्रक देण्यापर्यंतच्या सवंग मागण्या केल्या गेल्या आणि या लोकांनी त्या पुरवल्याही. यातूनच मंडळांमध्ये परस्परातील एकतेची भावना लोप पावत त्याची जागा स्पर्धेने घेतली अन् कोणाचा गणपती मोठा, कोणाचा आव्वाज मोठा, अशी चढाओढ सुरू झाली. राजकीय पुढाऱ्यांनी यासाठी गल्लीबोळातल्या पोरांना, तरुणांना, कार्यकर्त्यांना हाताशी धरले आणि सण-उत्सवांनंतर याच लोकांचा मतदानात, निवडणुकीत वापर करून घेतला. परिणामी, डीजे-डॉल्बीच्या समर्थनातले राजकारण हे असेच लोकानुनयी आणि लोकमान्य टिळकांच्या मूळ हेतूलाच हरताळ फासणारे होत गेले. आपला समाज एक व्हावा म्हणून टिळकांनी घरातला गणपती बाहेर आणला, पण आज नेमके याच उद्देशाला फाट्यावर मारत मंडळांनी, राजकारण्यांनी गणेशोत्सवाचाच तमाशा केला. त्यामुळेच या विकृतीचे, अपप्रवृत्तीचे विसर्जन करण्याची आणि आपले सण-उत्सव विशुद्ध स्वरूपात साजरे करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे म्हणावे लागते.

 

काही मंडळांकडून, व्यक्तींकडून, संस्था, संघटनांकडून अशी जबाबदारी हिंदूंकडूनच निभावण्याची अपेक्षा का केली जाते, असा आक्षेप घेतला जातो. याचे कारण म्हणजे हिंदू समाजच या देशातला मुख्य प्रवाह आहे आणि हिंदूंनीच आपल्यातल्या वाईट चालीरितींवर कोरडे ओढले नाहीत, तर त्याचा फायदा घेत हिंदूविरोधी, नास्तिक, हिंदू श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणणारे लोकच या मोहिमेचे, प्रबोधनाचे नेतृत्व आपल्या हाती घेतात आणि हिंदूंना, हिंदुत्वाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, हे आहे. म्हणूनच अशा लोकांना आपल्यातल्या वाईटपणाचा, अवगुणांचा फायदा घेता येऊ नये, असे वाटत असेल तर आपणच अशा गोष्टींना मनापासून विरोध केला पाहिजे. त्यातूनच डीजे, डॉल्बीसारख्या कुप्रथांचे उच्चाटन होऊ शकते. विशेष म्हणजे आपल्याकडे ढोल-ताशांसारखी पारंपरिक वाद्ये आणि ती वाजवणारे शेकडो लोकदेखील आहेतच की, ज्याचा वापर आपल्याला सण-उत्सवांत करता येतोच! ज्यातून सण-उत्सवांचा आनंदही घेता येईल आणि डीजेच्या दणदणाटाला, ध्वनिप्रदूषणाला आळा घालत कायदापालनही होईल व हिंदू सणांचे हिंदूपणही टिकून राहील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@