क्रमश: विकसित संघकार्याचे प्रकटीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2018
Total Views |


 

 

मूळ विचार आणि मूल्यांना कायम ठेवत हिंदू जीवनाचे ज्याप्रमाणे कालानुरूप प्रकटीकरण होत राहिले, तसेच संघकार्याचेही कालानुरूप प्रकटीकरण होत आहे. संघाच्या ९२ वर्षांच्या प्रवासात अनेक चढउतार आले. विरोध, दुष्प्रचार, कुठारघाताचे अनेक प्रयत्न झाले. या सर्वातून संघकार्य आणि संघविचार सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी होत आहे, वाढत आहे. या सर्वांमागे, मूळ हिंदू चिंतनाने प्रेरित युगानुकूल परिवर्तनशीलता आणि लवचीक कट्टरता’च कदाचित कारणीभूत आहे...
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


परिवर्तन, बदल हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या शाश्‍वत मूलतत्त्वाचा त्याग न करता कालानुरूप परिवर्तन करणे ही भारताची म्हणा किंवा हिंदुत्वाची परंपरा राहिली आहे आणि म्हणून, हजारो वर्षांपासून अनेक आक्रमणे, आघात सहन केल्यावरदेखील या समाजाचा सांस्कृतिक विचारधारेचा प्रवाह अविरत सुरू राहिला आहे. डॉ. राधाकृष्णन् यांनी म्हटले आहे- ‘‘There has been no such thing as a uniform stationary unalterable Hinduism whether in point of belief or practice. Hinduism is a movement, not a position; a process, not a result; a growing tradition, not a fixed revelation. It's past history encourages us to believe that it will be found equal to any emergency that the future may throw up, whether in the field of thought or of history.’’
हिंदुत्वाच्या याच वैचारिक अधिष्ठानावर आधारित असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, 90 हून अधिक वर्षांच्या प्रवासात आपल्या मूळ अधिष्ठानाच्या आधारे, आपल्या ध्येयाला साकार करण्यासाठी क्रमश: विकसित होत, समयानुकूल परिवर्तन करित राहिला आहे.
 
 
संघाचे कार्य, राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत संपूर्ण समाजाचे सक्रिय संघटन करणे आहे. संपूर्ण समाजाची एकता, परस्पर आत्मीयता आणि नि:स्वार्थ भावाने समाजाच्या हितास्तव कार्य करणार्‍या अनुशासित स्वयंसेवकांच्या माध्यमातून हे कार्य साकार होत आहे. अशा कार्यकर्त्यांना घडविण्यासाठी नियमित संस्कारांची आवश्यकता असते. म्हणून त्यासाठी संघशाखा आणि सम्बंधित कार्यपद्धती विकसित होत गेली.
 
 
 
संघ संस्थापक डॉ. हेडगेवार अत्यंत आधुनिक विचारांचे होते. त्यामुळेच त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीत अनेक नव्या गोष्टींचा समावेश केला. हिंदू समाजाचे संघटन करणे हे कार्य स्पष्ट होते. गणवेषाची कल्पना हिंदू समाजात नव्हती. पण संघटनेत एकता हवी म्हणून त्यांना गणवेष (युनिफॉर्म) आवश्यक वाटला. आणि गणवेषाची कल्पना पाश्‍चात्त्य असली तरीही त्यांनी संघात ती लागू केली. धोतर, कुडता, टोपी, गंध, माळ, शेंडी असा गणवेष स्वीकारण्याऐवजी, काहीसा ब्रिटिश सेनेसारखा, त्या काळातली अत्याधुनिक गणवेष संघात स्वीकारण्यात आला. हिंदू समाजात परेड किंवा कवायतीची परंपरा नव्हती. परंतु, ब्रिटिश सेना परेड करायची. अनुशासनासाठी ही बाब चांगली आहे हे बघून, संघातही ही कवायत सुरू करण्यात आली, ज्याला संघात आज समता असे म्हणतात. सुरुवातीची पंधरा वर्षे या कवायतीच्या सर्व आज्ञा इंग्रजी भाषेतील होत्या. 1940 साली त्या संस्कृत झाल्या. हीच गोष्ट घोष (बॅण्ड) आणि घोषाच्या तालावर संचलनाची आहे. संघाच्या कार्यपद्धतीत पहिले परिवर्तन 1939 सालच्या सिंदी येथील ऐतिहासिक बैठकीत आले. ते 1940 सालच्या संघ शिक्षा वर्गापासून लागू करण्यात आले. यात हिंदी व मराठीत असलेली संघाची प्रार्थना संस्कृतमध्ये आली, गणवेषाचा खाकी सदरा पांढरा झाला आणि समतेच्या (कवायतीच्या) आज्ञा इंग्रजीऐवजी संस्कृतमध्ये आल्या.
 
 
प्रारंभी संघाच्या प्रतिज्ञेत म्हटले जायचे- ‘हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे.’ भारत स्वतंत्र झाल्यावर प्रतिज्ञेत परिवर्तन करत- ‘हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे’, असे म्हटले जाऊ लागले.
 
 
 
प्रारंभीच्या 25 वर्षांपर्यंत, केवळ संघटनेसाठी संघटन, संघटनेशिवाय दुसरे काहीही नाही, याचा आग्रह राहिला. परंतु, समाजाचे स्वरूप खूपच व्यामिश्र (सरमिसळ) असते. त्यात विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, शिक्षातज्ज्ञ, सुरक्षा कर्मचारी, व्यापारी, इतर कर्मचारी अशा अनेक श्रेणी असतात. म्हणून, संघकार्यासाठी आवश्यक पाया तयार झाल्यावर, 1950 पासून संघाच्या योजनेनुसार स्वयंसेवक विविध क्षेत्रात जाऊन, समाजजीवनाच्या एका विशिष्ट क्षेत्रात राष्ट्रीय विचारांवर आधारित संघटन उभे करण्यासाठी जाऊ लागले. संघाचे क्रमश: विकसित (progressive unfoldment) होण्याचे हे पहिले चरण होते. श्री गुरुजींनी विविध क्षेत्रात सक्रिय झालेल्या या स्वयंसेवकांना, क्रमशः त्या क्षेत्रातील संघाचे गटनायक, राजदूत तसेच सेनापती म्हटले. आज 35हून अधिक संघटनांच्या माध्यमातून स्वयंसेवक शिक्षण, कृषी-शेतकरी, विद्यार्थी, श्रमिक-कामगार, इतिहास, कला, आर्थिक, क्रीडा, सहकार क्षेत्र, आरोग्य, वकील, विज्ञान, दिव्यांग, सेवा, सीमा सुरक्षा, सुरक्षा, वैचारिक इत्यादी अनेक क्षेत्रात केवळ सक्रियच नाही तर अग्रेसर आहेत. या सर्व संघटना एकाच राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असल्या तरी, स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. या संघटना संघाचा भाग किंवा शाखा नाहीत.
संपूर्ण समाजाप्रति असीम आत्मीयतेचा संस्कार असल्यामुळेच, कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकटांच्या वेळी स्वयंसेवक तत्परतेने सेवा कार्यात सहभागी होत राहिले आहेत. म्हणून RSS म्हणजे Ready for Selfless Service असे संघाचे वैचारिक विरोधकही मान्य करतात.
 
 
आपल्याच समाजाचा एक फार मोठा भाग- उपेक्षित, वंचित व त्यामुळेच मागासलेला एक वर्ग अनेक प्रकारच्या अभावांनी ग्रस्त होता. त्यांच्याजवळ जाऊन आत्मीयतापूर्वक त्यांच्या कष्टांना दूर करुन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूने, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीनंतर (1990 पासून) ‘सेवा विभागा’चे निर्माण झाले. संघकार्याच्या विकास-प्रवासाचे हे दुसरे चरण होते. झोपडपट्टीत राहणारे वंचित वर्गातील बांधवांमध्ये स्वयंसेवकांचा संपर्क, सेवा विभाग गठित झाल्यानंतर व्यापक स्तरावर सुरू झाला. अनेक ट्रस्ट्सच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, सुरक्षा आणि संस्कार आदी क्षेत्रात एक लाख सत्तर हजाराहून अधिक सेवा प्रकल्प स्वयंसेवक चालवीत आहेत.
 
 
संपूर्ण समाजचे संघटन तर करायचे आहे; परंतु संपूर्ण समाज काही संघस्थानावर म्हणजेच शाखेत येऊ शकत नाही. म्हणून त्यांच्यापर्यंत संघाचा राष्ट्रनिर्माणाचा विचार आणि कार्याची माहिती पोहचविणे तसेच समाजातील प्रमुख, प्रभावी सज्जन-शक्तीपर्यंत संघाच्या नाते स्वत: पोहचणे आवश्यक होते. या हेतूने 1994 साली प्रचार व संपर्क विभाग सुरू करण्यात आला.
संघस्थापनेपासूनच वृत्तपत्रात संघाचा विचार, म्हणणे कुणी प्रकाशित करीत नव्हते. वृत्तपत्रांचा संघाबाबतचा दृष्टिकोण काहीसा भेदभावपूर्ण होता. (या भेदभावाला राजकीय आश्रय होता, असेही म्हणता येईल.) म्हणून लोकांना तसेच स्वयंसेवकांनाही विविध विषयांवर राष्ट्रीय दृष्टिकोन काय आहे, हे सांगण्यासाठी 1946 ते 1950 या काळात इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मलयालम्, उडिया, बंगाली इत्यादी भाषांमध्ये स्वयंसेवकांनी साप्ताहिक नियतकालिक सुरू केले. संघाचा विचार, संघाचा दृष्टिकोन इतर कुठलेहि माध्यम देतच नव्हते. केवळ या साप्ताहिकांमध्येच ते यायचे. म्हणून लोक यांना संघाचे मुखपत्र मानू लागले. खरे म्हणजे, संघाचे कुठलेच मुखपत्र नाही. परंतु, 1994 साली प्रचार माध्यमाचे स्वरूपच बदलले. त्यात जनसंवाद (Mass communication) हा एक नवा आयाम जुळला. तेव्हा संघाचा ‘प्रचार विभाग’ सुरू झाला.
 
 
संघकार्य सतत वाढत होते. परंतु, समाजाच्या सर्व सज्जन आणि प्रभावी लोकांपर्यंत संघाची योग्य माहिती पोहोचली नव्हती. तेदेखील समाजाच्या हितास्तव अनेक चांगल्या रचनात्मक कार्यांमध्ये सक्रीय होते; असे असूनही संघाचा त्यांच्याशी संपर्क नव्हता. There was no connect. संघाचे लक्ष्य राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करणे हे असले तरी, हे कार्य केवळ स्वयंसेवक करतील अशी संघाची कल्पना पण नाहीय. समाजातील सज्जन आणि सक्रिय शक्तीला सोबत घेऊनच हे शक्य आहे. म्हणून समाजाच्या हितार्थ सक्रिय अशा या सज्जन शक्तीचा संघाशी आणि संघाचा या सज्जनशक्तीशी परिचय वाढण्याच्या दृष्टीने ‘संपर्क विभागा’चा प्रारंभही याच वर्षी झाला.
 
 
संघाची वाढती शक्ती आणि स्वयंसेवकांची संख्या बघून, काही विशिष्ट कार्यांमध्ये समाजाच्या सहकार्याने स्वयंसेवकांची विशेष सक्रियता वाढ़ावी, याची गरज भासू लागली. यादृष्टीने 1995 पासून काही निवडक सामाजिक कार्यांमध्ये स्वयंसेवक सक्रिय झालेत. या कार्यांना ‘गतिविधी’ म्हटले गेले.
लक्षात आले की, काही कारणास्तव अनिच्छेने सामूहिक कन्वर्जनला (conversion) बळी पडलेल्या अनेक लोकांना आपल्या मूळ परंपरेबद्दल आस्था अजून जिवंत आहे आणि ते पुन्हा आपल्या ‘घरी’ परत येऊ इच्छितात. म्हणून हिंदू समाजाच्या ज्या वर्गातून ते कन्वर्ट (convert) झाले होते, त्या समाजानेही त्यांना पुन्हा स्वीकारावे यासाठी त्या समाजाचे मन तयार करणे तसेच ‘घरी’ परत आल्यानंतर त्यांची सुयोग्य सामाजिक व्यवस्था लावून देण्यासाठी ‘धर्मजागरण’ ही गतिविधी सुरू करण्यात आली.
 
 
सरकारवर आश्रित न राहता, स्वत:च्याच योजनेने व परिश्रमाने आपल्या गावाचा विकास आम्हीच करू शकतो, असा विश्‍वास उत्पन्न करून संकल्प, योजना, प्रयत्न आणि परिणामापर्यंत प्रवास सुरू करण्याच्या दृष्टीने ‘ग्रामीण विकास’ गतिविधी सुरू झाली. आज 550 गावांमध्ये या अशा स्वावलंबी विकासाचे प्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहेत. आसपासच्या गावातील लोक तिथे जाऊन हे परिवर्तन प्रत्यक्ष बघतात आणि नंतर त्यांच्या गावात तसेच प्रयत्न करताना दिसून येत आहेत. याशिवाय सुमारे एक हजार गावातही स्वयंसेवक या दिशेने सक्रिय झाले आहेत आणि त्याचेही परिणाम दिसू लागले आहेत.
अस्पृश्यतेसारखा कलंक आणि जातिभेदाचा व्यवहार समाजात अजूनही दिसून येतो, हे अत्यंत वेदनादायक आहे. हा भेदभाव दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. काही राजकीय शक्ती, समाजात विद्वेष पसरवून या भेदभावाचा राजकीय फायदा घेण्यासाठी कार्य करताना दिसतात. यामुळे समाजातील सामंजस्य बिघडते. या कुप्रथांना दूर करून, समाजाची मूलभूत एकता जागृत करण्याच्या हेतूने ‘सामाजिक समरसता’ ही गतिविधी सुरू झाली.
 
 
भारतीय वंशाच्या गाईचे वैज्ञानिक व औषधी महत्त्व समजावून सांगत, भारतीय शेतीला गोआधारित बनविले तर शेतकर्‍यांचे अनेक प्रश्‍न सुटू शकतात. असे अनेक प्रयोग सफल झाले आहेत. या हेतूने गौसंवर्धन, जागरण, प्रशिक्षण आणि प्रयोग करण्यासाठी ‘गौ संवर्धन’ ही गतिविधी सुरू आहे. भारतात एक हजारहून अधिक नव्या गोशाळा आणि गो अनुसंधानासह अनेक प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत.
 
 
तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे जगण्याची साधने व सोयी तर वाढल्या आहेत; परंतु कुटुंबात परस्परांशी संवाद कमी होत चालला आहे, नात्यांतील ओलावा कमी होत आहे, आपसी तणाव वाढत आहे, मनुष्यांमधील संबंध र्‍हास पावत आहेत, कुटुंबव्यवस्थेची आधारशिला असलेली आत्मीयता हळूहळू कमी होत चालली आहे आणि कुटुंबाला सामाजिक जबाबदारीचे विस्मरण होताना दिसत आहे. भौतिकवादाचा पगडा वाढल्याने मानवी मूल्यांचा र्‍हास होताना दिसत आहे. म्हणून ‘कुटुंब प्रबोधन’ ही गतिविधीदेखील समाजाच्या सहयोगाने स्वयंसेवक चालवीत आहेत.
 
 
समाज-परिवर्तनाच्या कुठल्या ना कुठल्या कार्यात सक्रिय होऊन, स्वयंसेवक राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीचा वाहक (Carrier) बनावा, असा संघाचा आग्रह राहिला आहे. सतत विकसनशील (progressively unfolding) असे संघकार्य करण्यासाठी सर्वांत आवश्यक असे स्वयंसेवक निर्माण करणारे स्थान म्हणजे संघशाखा. तिच्या माध्यमातून व्यक्तिनिर्माणाचे कार्य अविरत चालावे, यासाठीही संघात गेल्या काही वर्षांत जागरण आणि संघटन अशा दोन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. समाज जागरण आणि परिवर्तनाच्या कार्यात समाजाला सोबत घेऊन अधिकाधिक स्वयंसेवक सक्रिय व्हावे या हेतूने जागरण श्रेणी (सेवा, संपर्क आणि प्रचार विभाग) आणि व्यक्तिनिर्माणाच्या कार्याला अधिक सघन बनविण्यासाठी संघटन श्रेणी (शारीरिक, बौद्धिक व व्यवस्था विभाग) असे कार्याचे विभाजन करण्यात आले आहे.
 
 
व्यक्तिनिर्माणात दैनिक संघशाखेचे विशेष महत्त्व आहे. म्हणून दैनिक शाखेचा आग्रहही आहे. संपूर्ण भारतात 58 हजार दैनिक शाखा आहेत. परंतु, संघकार्याचा परीघ अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने साप्ताहिक मिलन आणि विशेषत: ग्रामीण भागात मासिक मिलन (संघ मंडली) यांच्या माध्यमातून संघाचा विस्तार वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवी पिढी तंत्रज्ञानाचा (technology) अधिक वापर करते. म्हणून ती जगाच्या संदर्भातही स्वत:बद्दल, आपल्या सांस्कृतिक ओळखीबाबत अधिक जागृत आणि जिज्ञासू होत आहे. तिला आपल्या सांस्कृतिक, राष्ट्रीय ओळखीबाबत (National identity) अधिक जाणून घ्यायचे आहे, त्याबाबत गौरव अनुभवायचा आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत अधिकाधिक तरुणांशी संपर्क आणि संवाद ठेवण्याच्या हेतून वेबसाईट www.rss.org - 80,000 followers per month, फेसबूक rssorg - 55 lakh likes, ट्विटर Twitter@rssorg - 10 lakh followers इत्यादी माध्यमांचा उपयोगही उचित प्रमाणात होत आहे.
 
 
नव्या बदलत्या वातावरणात, समाजात संघाची वाढती स्वीकारार्हता, अपेक्षा आणि कार्य करण्याची अनुकूलता लक्षात घेऊन, मूळ तत्त्वाला कायम ठेवून, नवनवे प्रयोग करण्याची प्रयोगशीलता वाढविण्याची आवश्यकता आहे. या आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी संघ शिक्षा वर्गांतून होणार्‍या नियमित प्रशिक्षणाशिवाय, जिल्हा तसेच विभाग स्तराच्या कार्यकर्त्यांच्या क्षमतावर्धनासाठी ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ आणि प्रांत तसेच क्षेत्र स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी पाच दिवसीय ‘योजक वर्गा’चीही रचना करण्यात आली आहे.
 
 
प्रत्येक आव्हानाला संधी मानून त्यानुरूप प्रशिक्षण तसेच संघटनात्मक रचना उभी करण्याची संघाची परंपरा, आपल्या मूळ शाश्‍वत तत्त्वाचा त्याग न करता, बाह्य रचना आणि बांधणीत युगानुकूल परिवर्तन करण्याच्या भारताच्या परंपरेनुरूपच आहे.
मूळ विचार आणि मूल्यांना कायम ठेवत हिंदू जीवनाचे ज्याप्रमाणे कालानुरूप प्रकटीकरण होत राहिले, तसेच संघकार्याचेही होत आहे. संघाच्या 92 वर्षांच्या प्रवासात अनेक चढाव-उतार आलेत. विरोध, दुष्प्रचार, कुठाराघाताचे अनेक प्रयत्न झालेत. या सर्वांतून संघकार्य आणि संघविचार सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी होत आहे, वाढत आहे. या सर्वांमागे, मूळ हिंदू चिंतनाने प्रेरित संघाची युगानुकूल परिवर्तनशीलता आणि ‘लवचिक दृढ़ता’ च कदाचित कारणीभूत आहे.
... ... ...
-सह सरकार्यवाह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 

डॉ. मनमोहन वैद्य

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@