रायगड : कोकणातील गौरी-गणपतींचे विसर्जन करून मुंबईकला परतणाऱ्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही मोठे हाल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर दुपारपासून माणगावनजीकच्या भागातील वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक निजामपूर-पाली मार्गे वळवण्यात आली आहे. पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे गौरींसह सोमवारी विसर्जन झाले. त्यानंतर चाकरमानी मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर निघाल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवाला जाताना कोकण रेल्वेचा खोळंबा झाला होता. परतीच्या प्रवासाचे बुकींगही फुल झाले आहे. त्यामुळे अनेकांनी खासगी बस, एसटी आदी पर्याय स्वीकारले मात्र अनेकजण दुपारपासून खोळंबले आहेत. पावसाने दडी मारल्याने उकाड्यात प्रवाशांची दैना होत आहे. रात्रीपर्यंत ऐरोली, वाशी टोलनाक्यावर मोठ्या रांगा लागण्याची शक्यता आहे.