नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी करारावरुन काँग्रेसची नेते मंडळी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत असताना आता हवाई दल प्रमुखांनी राफेलची गरज अधोरेखित केली आहे. यामुळे विरोधकांच्या प्रश्नाला आपसूकच उत्तर मिळाले आहे. "देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने राफेलची कामगिरी महत्त्वाची असणार आहे'', असे हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंग धनोआ म्हणाले आहेत. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी असलेले सध्याचे तणावपूर्ण संबध पाहता राफेल करार महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.
'शेजारील राष्ट्रे अण्वस्त्र संपन्न आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या हवाईदलाचे अत्याधुनिकीकरण सुरू आहे', असे हवाई दल प्रमुख म्हणाले. राफेलच्या मदतीने आम्ही संकटांचा सामना करु शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच वाईस चीफ एअर मार्शल एस. बी. देव यांनीही राफेल कराराचे समर्थन केले होते. या करारावर टीका करणाऱ्यांनी आधी खरेदी प्रकिया समजून घ्यायला हवी, असे देव म्हणाले होते. राफेल आणि एस-४०० विमानांच्या मदतीने सरकारकडून हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याचे धनोआ म्हणाले. 'भारतीय हवाई दलाला ४२ स्क्वॉड्रन्सची गरज आहे, मात्र सध्या आमच्याकडे ३१ स्क्वॉड्रन्स आहेत. आपल्या हवाई दलाकडे ४२ स्क्वॉड्रन्स असल्या, तरी त्यांचे प्रमाण चीन आणि पाकिस्तानच्या एकत्रित स्क्वॉड्रन्सपेक्षा कमीच असेल,' असे धनोआ म्हणाले आहेत. गेल्या दशकभरात चीनने सीमावर्ती भागात रस्ते आणि रेल्वेचे जाळे उभारले आहे. याशिवाय चीनचे सामर्थ्यही वाढवल्याचे ते म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/