पोळा अन् जीव झाला गोळा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |

 
 
 
 
आता सणांची गाडी सुसाट सुटली आहे. ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ असे म्हणतात. पर्यावरण चांगले होते तोवर पाऊस कसा शिस्तीत वागत होता. म्हणजे उन्हाळ्यात ऊन पडायचे, हिवाळ्यात थंडी असायची अन् पाऊस कसा मृगनक्षत्रावर बरसायचा अन् पोळ्याच्या काळात श्रावण संपत असताना, ‘क्षणात पडते शिरशिर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे...’ असे बालकवींच्या कवितेतले वातावरण जिवंत असायचे. आता लहानपणी ही कविता हमखास एका पिढीने वर्गात म्हटली आहे. या दिवसांत पिके वर आलेली असतात. कपाशीला बोंडे फुटलेली असतात. फूल-पात्याच्या पलीकडची ही स्टेप असते. तुरीच्या नाकातही पिवळीधम्म बेसरिंबदी घातली गेली असते. या दिवसांत कोंदट वातावरण असले, तर ही फुले गळून पडतात अन् मग तुरीला शेंगा धरत नाहीत. आता सोयाबीनचे तसे होते.
‘काल टोंग्या टोंग्या होती
आज छातीमांड्या झाली
परकरातली पर्हाटी आता
लुगड्यात आली...’
असे आमचे विठ्ठल वाघ म्हणतात. अशा वातावरणात पिकांना थोडे ऊनही हवे असते अन् मातीचा ओलावा संपू नये म्हणून पावसाचे तुषारही हवे असतात. आता क्षणात फिरूनी ऊन पडे... ही अवस्था नसते, त्यामुळे ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ असे होत नाही. गावात जनावरांची संख्या कमी झाली असल्याने, पोळ्याचीही मजा पूर्वीसारखी राहिली नाही.
‘एका बानाचा बानाचा
बैल मानाचा...’
हे गाणे आताही म्हणता येते, मात्र त्यातली गंमत आता गेली आहे. अटाळ्या पायाचे अन् फटाळ्या शिंगांचे बैल आता फारसे दिसत नाही. आम्ही चौथ्या वर्गात, ‘ओला चारा बैल माजले, शेतकरीमन प्रफुल्ल झाले’ ही कविता नुसतीच शिकलो नाही, तर ती प्रत्यक्षातही दिसत होती. ओला चारा होता अन् बैलांचे माजणे काय असते, तेही कळत होते. नारायण कुळकर्णी-कवठेवर यांच्या कवितेतला, आपल्या मैत्रिणीवर कुण्या परक्या सांडाची पडलेली नजर बघून बिथरलेला अन् पायाने माती उकरणारा, शिंगांवर ओल्या मातीचे पेंड दागिन्यांसारखे मिरवीत फुरफुरणारा बैल आता दिसत नाही.
खूप काळ गेला असेही नाही, पण अगदी 30-40 वर्षांत हे चित्र पालटले आहे. पाठीवर नुसता हात ठेवला तरीही थरथरणारी संवेदनशीलता असलेले बैल आता राहिले नाहीत. त्यामुळे आता पोळ्यात बैलांच्या रांगा दिसत नाहीत. तान्हा पोळा मात्र जोरात असतो. त्यासाठी लाकडाचे बैल लागतात अन् ते शहरातही भेटतात. मातीशी काडीमोड घेऊन अन् जमिनी विकून नोकर्या विकत घेतलेले शहरी झालेले मायबाप आता आपल्या मुलांना गाय कळावी, बैल कळावे यासाठी शहरात तान्हा पोळा साजरा करतात...
परवा गावाकडे जमीन मोडून शहरात पोटाची खळगी भरायला टेम्पो चालविणारा मित्र त्याच्या मुलाला घेऊन बोजारा मागायला आला अन् त्याने पोळ्यात म्हणतात त्या झडत्या म्हटल्या. त्या म्हणताना त्याच्या आवाजाला धार चढली होती अन् त्याचा आवाज थोडा ओलसर झाला होता. त्याच्या डोळ्यांत गावाच्या आठवणी दाटून आल्या होत्या. त्याच्या गावाच्या मारुतीच्या मंदिराच्या मैदानात भरलेला पोळा अन् रांगेत उभ्या असलेल्या बैलांच्या जोड्या दिसल्या. बाशिंग रंगविलेल्या, नव्या झुली घातलेल्या अन् पुरणपोळी-वड्याचा नैवेद्य खाऊन खुशीत आलेल्या बैलांच्या शंभरेक जोड्या...
‘चाकचाडा बैलगाडा, बैल गेला पवनगडा, पवनगडाहून आणली माती, थे दिली गुरूच्या हाती, गुरूने बनविली चकती, दे माझ्या बैलाचा झाडा, मग जा आपल्या घरा, एक नमनगौरा पार्बती हरहर महा देवऽऽऽ’
तुम्हाला सांगतो ही फडकती झडती ऐकल्यावर आपसूक हात खिशात गेला अन् मित्राच्या हातात शंभराची नोट ठेवली कधी गेली, हेही कळले नाही! त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आलेले अन् हातातल्या लाकडाच्या चाकं असलेल्या बैलाला काळजाशी लावून तो ढसाढसा रडला...
 
‘आभाळ गडगडे, शिंग फडफडे
शिंगात पडले खडे, तुझी माय काढे, तेलातले वडे, तुझा बाप खाये पेढे, एक नमनगौरा पार्बती हरहर महाऽदेवऽऽऽ’
 
मित्र रडवेल्या आवाजात ही झडती म्हणत होता. आता शेतकर्याच्या तोंडी पेढा कुणी भरवीत नाही अन् तेलातले वडे काढण्याइतकीही डाळ त्याच्या घरात असत नाही.
शेती यांत्रिक झाली अन् शेतकर्याचाच बैल झाला आहे. रासायनिक शेती झाली. माती मेली. खर्च वाढत गेला शेतीचा. एकरी उत्पादन आणि खर्च यांचा मेळ जुळत नाही. शेतमालाला भाव मिळत नाही अन् मग गोठेही आटत गेले आहेत. शेतं आता ट्रॅक्टरने नांगरली जातात. बैल ठेवणे अल्पभूधारक शेतकर्याला शक्य नाही. बैलांना खायला काय द्यायचे, हा सवाल असतो. त्यांच्यासाठी आधीच्या काळात जितके मोठे गोठे असायचे त्याहीपेक्षा लहान शेतकर्यांची घरे असतात. आताच्या शेतकर्यांच्या बापाने गोठ्याचे टीन अन् मयाली विकून शेतीची वास्तपुस्त लावली कधीकाळी अन् बैलही विकले एखादा हंगाम साजरा करण्यासाठी... कुठून येणार बैल? अन् कोण म्हणणार झडत्या?
‘गणा रे गणा, गण गेले वरच्या राना, वरच्या रानातून आणली माती, ते देल्ली गुरूच्या हाती,
गुरूनं घडविला महानंदी, ते नेला हो पोळ्यामंदी, एक नमन गौरा पारबती हर बोला हरऽहरऽऽऽ महाऽदेवऽऽऽ’
आधी बैल होते, मातीतून घडविले जायचे. पोळ्याच्या दिवशी मातीचे बैल करायचे अन् त्यांना ज्वारीचे डोळे लावायचे. हे बैल शेतमालकच घडवायचा अन् पोळ्याच्या आदल्या दिवशी त्यांची पूजा करून त्यांना आवतन द्यायचा- ‘‘आज आवतन घ्या, उद्या जेवाऽऽऽले याऽऽऽ.’’
असे म्हणून माथा टेकवून नमस्कार करायचा. बैलांना नदीवर नेऊन त्यांच्या आंघोळी अन् मग लोणी-हळद लावून त्यांची खांदशेकणी करायचा. ही कृतज्ञता होती बैलांच्या प्रती.
त्यांच्या झुली सजविताना घरच्यांनाही हुरूप यायचा. दरवर्षी नव्या झुली नाही, तर मण्यांच्या नव्या माळा आणल्या, नाहीतर आपल्या लेकरांना सणवाराला नवी कापडं नाही घेऊन देऊ शकल्याचे दु:ख शेतकर्यांच्या उरात दाटून यायचे.
‘बळी रे बळी लिंब बनी, अशी कथा सांगेल कोणी, राम-लक्ष्मण गेले हो वनी, राम-लक्ष्मणाने आणली वनफुले, ते दिले महादेव-पारबतीच्या हाती, तीनशेसाठ नंदी
एक नमन गौराऽऽ पार्वतीऽपतेऽऽऽ हरऽहरऽऽऽ महाऽदेवऽऽऽ’
या अशा परंपरागत झडत्या असायच्या. त्यात महादेवाच्या गाथा सांगितल्या जायच्या. आताही गावात पोळा भरतो, पण ते सबमिशन असते. बाकीचे सण कसे कार्पोरेट झाले. त्याचे व्यापारीकरण झाले. पोळ्याचे तसे झाले नाही. कारण त्यातून कमाई नाही. बैलच राहिले नाही. ट्रॅक्टर आले. त्यात शेतकर्यांकडे पैसा राहिला नाही. त्यामुळे ते खर्च करू शकत नाहीत. आता गावांचीही शहरं झाली आहेत. पोळ्याला गर्दी नसते अन् म्हणून मग दहीहंडीसारखा त्याला राजकारणी भाऊ-दादांचा पािंठबाही लाभत नाही. ‘आम्ही जल्मलो मातीत किती होनार गा माती, खापराच्या दिव्यातनी कवा पेटनार वाती...’ अशी शेतकर्यांची अवस्था झाली आहे. बैलाच्या गळ्यातल्या घंट्यांचा आवाज पोळ्याच्या सांजेला दारात निनादला नाही, त्यालाही बरीच वर्षे होऊन गेली. गावाच्या बाजारातून त्या घंट्या आणून दारावर डोअर बेल म्हणून लावल्या होत्या. केव्हाही वाजतात हवेने अन् दारात कुणीच नसते, म्हणून त्याही कुणीतरी काढून टाकल्या. आता पोळ्याच्या दिवशी या घुंगरमाळांचा आवाज दाराशी होत नाही. फ्लॅट स्कीमच्या वरच्या मजल्यावर बैल चढू शकत नाही अन् खाली आलेच कधीमधी बैल, तर लिफ्ट बंद असल्याने पायर्यांनी खाली जाववतही नाही... माणसे मातीला फितूर झालीत अन् माणसांची मने सिमेंटची झाली आहेत. मनाचा बैल झाला आहे अन् त्याचा माणसांवर अजीबात विश्वास राहिला नाही. माणसांची अदृश्य शिंगं कधी आपल्या पोटात खुपसली जातील, अशी भीती वाटते.
‘छातीवर दगडही ठेवून पाहिला
पण,
 
ही कोवळी हिरवी पालवी
कधी फुटते कळतच नाही!’
@@AUTHORINFO_V1@@