नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील बँकांच्या बुडीत कर्जाबाबत (एनपीए) बँका आणि आर्थिक मंदीसोबतच तत्कालीन काँग्रेस सरकारवर जबाबदार असल्याचे म्हटले आहे. रघुराम राजन यांनी संसदीय समितीला दिलेल्या उत्तरात म्हटले की, ‘‘घोटाळ्यांच्या चौकशीत होणारा विलंब व तत्कालीन सरकारने निर्णय घ्यायला वेळ केल्यामुळेच बुडीत कर्ज वाढली आहेत.’’
२००६ ते २००८ या काळातच जास्त कर्ज बुडाल्याचे राजन म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीने रघुराम राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यावर संसदीय समितीने एनपीएबाबत पाठविलेल्या उत्तरात रघुराम राजन यांनी एनपीए वाढण्यात तत्कालीन युपीए सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
‘‘बँकांनी विविध कारणांसाठी कर्ज घेतले, कर्ज भरण्यासाठी पुन्हा कर्ज घेतले. कर्ज देताना कोणत्याही प्रकारची सावधगिरी बाळगली नाही. बँकांकडून मोठ्या कर्जांवर योग्य कारवाई करण्यात आली नाही. त्यातच २००६ नंतर विकासाचा वेग कमी झाल्याने बँकांच्या वृध्दीची आकडेवारी अवास्तविक झाली. घोटाळे आणि चौकशींच्या फेऱ्यांमुळे सरकारची निर्णय घेण्याची गती मंदावली होती. त्यामुळे थकीत कर्ज म्हणजेच एनपीए वाढत गेल्याचे रघुराम राज यांनी सांगितले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/