नवी दिल्ली : उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत ठाणे जिल्हयातील मिरारोड येथील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना काल वीरमरण आले. राणे यांच्या हौतात्म्यावर देशभरातून सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी रात्रीपासूनच घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी भारतीय जवानांचा लढा सुरू होता. आज सकाळी मेजर कौस्तुभ राणेंसह मनदिपसिंग रावत, हमीरसिंग आणि विक्रमजीतसिंग हे तीन जवान शहीद झाल्याचे तर दोन दहशतवादी ठार झाल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. शहीद मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे राहणारे असून त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी व अडीच वर्षांचा मुलगा आहे. मेजर राणे मुळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून मीरारोड परिसरात वास्तव्यास होते.
राणे यांच्या वीरमरणावर सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कौस्तुभ राणे यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. जम्मू काश्मीरमधील घुसखोरांना हुसकावून लावताना त्यांना वीरमरण आले आहे. राणे कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना ट्वीटरवरून व्यक्त केल्या आहेत.