दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य’ योजनेंतर्गत घरोघरी सुरू असलेल्या वीजजोडणी प्रगतीचा आढावा घेतला. देशाची ऊर्जानिर्मिती क्षमता आता ३४४ गिगावॅट इतकी झाली असून, २०१४ मध्ये असलेला विजेचा चार टक्के तुटवडा आता अवघ्या एक टक्क्यावर आला आहे, अशी माहिती या बैठकीत नीती आयोगातर्फे पंतप्रधानांना देण्यात आली.
ही बैठक मंगळवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी ऊर्जा, अक्षय ऊर्जा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कोळसा आणि खाण यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत क्षेत्रांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नीती आयोगासह अन्य विभागांतील अधिकार्यांनी पंतप्रधानांपुढे सादरीकरण केले. सुमारे दोन तास ही बैठक चालली. या बैठकीत पंतप्रधान कार्यालय, नीती आयोग आणि अन्य विभागांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांनी ‘सहज बिजली हर घर योजना - सौभाग्य’ चा प्रारंभ केला होता. या योजनेंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत प्रत्येक घरात वीजजोडणी उपलब्ध करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड २०११ च्या सामाजिक-आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेतील आकडेवारीतून करण्यात आली होती.