आज दि. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. हा दिवस म्हणजे नाशिक जिल्ह्यासह राज्यात आदिवासींचा उत्सव म्हणून साजरा होणारा दिवस. या दिवशी आपल्या कला, संस्कृतीचे सादरीकरण मोठमोठ्या पारंपरिक वाद्यांसह मिरवणुका काढून केले जाते. या दिवसाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या विषयी महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा लेख...
आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, डोंगरदऱ्यांत राहणारा, जंगलात राहणारा, तोकड्या कपड्यात वावरणारा, आधुनिक जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज डोळ्यासमोर येतो. असे म्हटले जाते की, जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत, त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणाऱ्यां रानमेवाव्यावर करीत आहे. आजही नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, किनवट या भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’ असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे, अशी शिफारस केली आहे.
-पद्माकर देशपांडे/हेमंत चंद्रात्रे