‘तरुण भारत’च्या वर्धापनदिनी सत्कारप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांची ग्वाही
जळगाव:
जळगाव महापालिकेतील नवनिर्वाचित सर्वपक्षीय नगरसेवकांचा पहिला जाहीर सत्कार ‘जळगाव तरुण भारत’च्या २२ व्या वर्धापनदिनी (दि.५) अर्थपूर्ण स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. त्यावेळी जळगावच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबध्द असून, रखडलेली विकासकामे वेगाने करून जळगावला पूर्ववैभव प्राप्त करून देऊ, अशी ग्वाही सत्कारार्थींनी ‘तरुण भारत’च्या व्यासपीठावरून जळगावकरांना दिली.
जळगाव महापालिका निवडणुकीत ‘जळगाव तरुण भारत’ने शहराच्या रखडलेल्या विकासाचा मुद्दा मांडणारी वृत्तमालिका आणि अन्य स्तंभातून परखडपणे रखडलेल्या आणि नागरिकांना त्रस्त करणार्या समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. याद्वारे नागरिकांसाठी समर्थ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जळगावकरांनी ‘तरुण भारत’च्या या उपक्रमाचे उत्स्फूर्तस्वागत केले.
‘तरुण भारत’च्या जळगाव आवृत्तीला १ ऑगस्ट २०१८ ला २१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त रविवारी (दि.५) हितचिंतक आणि स्नेहीजनांसाठी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे औचित्य साधून १९ प्रभागात निवडून आलेल्या भाजपा, शिवसेना आणि एएमआयएमच्या नगरसेवकांचा हृद्य जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ‘तुम्हीच आहात जळगावनगरीचे शिल्पकार-विकासपर्वाच्या घोडदौडीसाठी शुभेच्छा...’ अशा अर्थपूर्ण, मोजक्या आणि सूचक शब्दात त्यांनी दिलेल्या विकासाच्या आश्वासनांची पूर्तता करण्याची आठवण ‘तरुण भारत’ने करून दिली. यावेळी सर्वसामान्य जळगावकरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.