मराठा आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्री जनतेसमोर येणार असून राज्यभर सुरु असलेल्या मराठा आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांचा हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज जनतेशी काय संवाद साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारी वाहिनी असलेल्या सह्याद्री आणि आकाशवाणी या दोन्ही वाहिन्यांवरून मुख्यमंत्र्यांच्या या संवाद कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील सूचना जारी करण्यात आली असून संध्याकाळी बरोबर ७.३० वाजता कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जनतेनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आले आहे.
राज्यामध्ये सध्या मराठा आंदोलनाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आरक्षणासाठी मराठा समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. या आंदोलनामध्ये आतापर्यंत अनेक आंदोलकांचे प्राण गेले आहेत. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून मराठा समाजाला वारंवार शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु त्याचा देखील काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.