विना परवानगी एकही मंडप कार्यक्षेत्रात उभा राहू नये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018
Total Views |


 
 
मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मंडप विषयक परवानग्या देण्यात याव्यात. तसेच विना परवानगी एकही मंडप आपल्या कार्यक्षेत्रात उभा राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी सहाय्यक आयुक्तांना मासिक आढावा बैठकीत दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, आय. ए. कुंदन, विजय सिंघल, आबासाहेब जऱ्हाड, रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, साहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
 

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या अनुषंगाने मंडप / प्रवेशद्वार उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी बाबत ‘ऑनलाईन प्रक्रिया’ यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांवर निर्धारित वेळेत कार्यवाही करून मंजूरी द्यावी; तर अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या बाबी सुस्पष्टपणे नमूद करुन अर्ज फेटाळावा. अर्ज फेटाळण्याची कारणे संबंधितांना सुस्पष्ट कळवावीत, कुठलाही अर्ज प्रलंबित ठेवू नये, असे आदेश सर्व विभागस्तरीय साहाय्यक आयुक्तांना आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मंडपविषयक परवानग्या देण्यात याव्यात. तसेच विना परवानगी एकही मंडप आपल्या कार्यक्षेत्रात उभा राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी असेही आदेश दिले.

 

मंडप / प्रवेशद्वार परवानग्यांची प्रक्रिया या वर्षीपासून पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अर्जदारांना काही अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेता सर्व विभाग कार्यालयांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरुन घ्यावेत. यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये परवानग्यांशी संबंधित काम बघणाऱ्यांनी त्यांच्या कामकाजातील दररोज एक तास राखून ठेवावा व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना यथायोग्य सहकार्य करावे, असेही आदेश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले.
 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप व प्रवेशद्वाराची उभारणी ही अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करुन केली असल्याची खातरजमा करवून घ्यावी. तसेच सर्व मंडपांना अग्निसुरक्षा विषयक बाहेर जाण्याची दारे उभारली असल्याची व त्याचा इतर बाबींसाठी उपयोग होत नसल्याचीही खात्री करवून घ्यावी. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मुंबई मेट्रोची / एमएमआरडीएची कामे सुरु आहेत. या अनुषंगाने गरजेनुसार मुंबई मेट्रो / एमएमआरडीएचे अधिकारी आणि पोलीस दलाशी सुयोग्य समन्वय साधावा.

 

स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व पोलीस दल यांच्या आवश्यकतेनुसार संयुक्त बैठका आयोजित करुन सुसमन्वय साधावा. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्यादीं सारख्या श्रीगणेश मूर्ती विसर्जनाच्या महत्त्वाच्या ठिकाणी परदेशी पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी.

 

कचरा कमी करा

महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये कचरा कमी करण्यासाठी जनजागृतीसह विविधस्तरीय प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रातील दैनंदिन कचऱ्याचे वर्ष २०१५ मध्ये असणारे सरासरी प्रमाण हे ९ हजार ५०० टनांवरुन आता ७ हजार २०० टनांपर्यंत खाली आले आहे. हे प्रमाण आणखी खाली आणण्याच्या दृष्टीने जनजागृतीसह सर्वस्तरीय प्रयत्नांची व्याप्ती वाढविण्याचे आदेश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@